शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे निधन
Newsworldmarathi Pune : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झालं आहे. भारती पवार यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे पवार कुटुंबात शोककळा पसरली आहे.
भारती पवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे.
भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.
सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.
महाबँक कर्मचार्यांचे ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन
Newsworldmarathi Pune : शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्यांशी केलेल्या करारांचे पालन व्हावे, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सोमवारी महाबॅंकेचे मुख्यालय ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, संघटन सचिव शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. ५१ झोनल ऑफिसमधील सुमारे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
याच मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे देशभरातील कर्मचारी २० मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जात आहेत. हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने २०२१ साली सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले. हे काम आऊटसोर्स केले. त्यांना किमान वेतनदेखील दिले जात नाही. कायमस्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा, मेडिकल, सुट्टया कांहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत.
बँकेत ७०० पेक्षा अधिक शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेत ३१८ शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नेमण्यात आला नाही. १२९० शाखा आहेत जेथे केवळ एक क्लार्क आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ संपली, तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागते. आजारपण असो की सांसारिक जबाबदाऱ्या यासाठी आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत. याचा ग्राहकसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढते आहे, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की, बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी, जेणेकरून समाधानकारक ग्राहकसेवा देता येऊ शकेल.
याशिवाय कमी कर्मचाऱ्यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत. त्यातूनच फ्रॉडस होण्याची शक्यता निर्माण होते, नव्हे होत आहेत. यात बँकेचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? बॅंक यावर संवेदनशील नाही म्हणूनच २० मार्चला महाबँकेत संप अटळ बनला आहे.
याशिवाय बॅंक कर्मचारी संघटनांशी केलेले कायदेशीर करार, हायकोर्टाचे आदेश सगळेच धाब्यावर बसवून बँक व्यवस्थापन मनमानी करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे. महाबँकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिबा द्यावा, असे आवाहन कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी केले.
लाडक्या बहीणींसाठी मागास, आदिवासींचा निधी पळवणे घटनाबाह्य : सुनील माने यांची टीका
Newsworldmarathi Pune: विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी घेतला जाणार नाही याबाबत सरकारने आश्वासन दिले होते. मात्र हे सांगणाऱ्या सरकारने या निधीसाठी मागास आणि आदिवासी समाजाचा ७ हजार कोटींचा निधी वळता केला आहे. हे पूर्णपणे घटनाबाह्य असून मागासवर्गीय समाजाच्या हक्क आणि अधिकाराबाबत अन्यायकारक आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने लाडक्या बहिणीची निधी वाढवणार असल्याचे सांगितले होते. निवडून आल्यानंतर मात्र काही लाडक्या बहीणींच्या सवलती बंद केल्या आहेत. हे ही कमी की काय म्हणून सरकारतर्फे मागासवर्गीय समाजासाठी उपयोगात आणला जाणारा समाजकल्याण विभागाचा ३ हजार कोटी आणि आदिवासी समाजाचा हक्काचा ४ हजार कोटी असा एकूण ७ हजार कोटींचा निधी लाडक्या बहीणीकडे वळवला जात आहे.
मागासवर्गीय आणि आदिवासी विभागाचा निधी काढून लाडकी बहीण योजनेला देणे ही बाब केवळ या दोन समाजघटकांच्या अधिकारांवर गदा आणणारीच नाही तर ती संविधानविरोधी आहे. ही अर्थसंकल्पीय तरतूद राज्यघटनेनुसार केली जाते. ती अशी मनमानी पद्धतीने वळवता येत नाही. सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे या समाजघटकांच्या तोंडातील घास पळवण्याची कृती केली आहे.
मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या लोकसंख्येनुसार ही निधी अर्थसंकल्पात द्यावा लागतो. तो असा पळवता येत नाही. पण सरकारने याचा मुलाहिजा बाळगलेला नाही. त्याचवेळी सामाजिक न्याय विभागाचा निधी कमी करून तो लाडकी बहीण योजनेसाठी पळवताना या खात्याचे मंत्री संजय शिरसाठ यांना त्याबाबत माहितीही दिली गेलेली नाही. सामुदायिक जबाबदारी ही सरकारची जबाबदारी असताना सरकारचे हे बेजबाबदार वर्तन राज्यासाठी अतिशय गंभीर आहे.
सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा हा निधी सरकारने पुन्हा एकदा या विभागाला वर्ग करावा अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सरकार आज पैसे देत नाही आणि हे पैसे अशा प्रकारे वेगवेगळ्या योजनांसाठी वापरले जात आहेत ही चिंतेची बाब आहे.
वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र काम : उपमुख्यमंत्री शिंदे
संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी (दि. १६)आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.
वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठीचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला.
तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली
आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
Newsworldmarathi Pune: जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ व आदर्श महिला पुरस्कार देण्यात आले. हॉटेल ऋतुगंध येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या रूपाली ठोंबरे-पाटील व सामाजिक कार्यकर्त्या आरती जमदाडे-साठे उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका व आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा अनुपमा जाधव-कुसाळकर, सुषमा भालेकर, वर्षा कुदळे, अपर्णा दुबे, राधा पांगारे, प्रीती विचारे, गीता गाटूळे, अंजली रानडे, पल्लवी शिंदे, सिद्धिका जाधव, दंताळे ज्वेलर्सचे क्षितीज दंताळे, राधिका जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्या महिलांचा यावेळी मान्यवरांची उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली विशेष मुलांसोबत होळी साजरी
महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. होलिका दहनानंतर आज दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते.
दरम्यान, पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे‘ चे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीदेखील सहभाग घेत भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी गेली तीस वर्ष झाले पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, मतिमंद, दिव्यांग, रेल्वे फलटावर बूट पॉलिश करणारे, देवदासी भगिनींची मुलं, डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या मुलांचाही सहभाग असतो.
भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक मुरली अण्णांकडून कौतुक
पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो. संवेदनशीलपणाने असे उत्सव साजरे गेले जातात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीम च्या माध्यमातून विशेष मुलांसाठी त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात.
अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांचे आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत नाही नशिबाने त्यांच्यावरती ही परिस्थिती असते. पण भोई प्रतिष्ठान गेली तीस वर्षे झाले त्यांच्यासोबत अनेक उत्सव साजरं करत आहे.
मी दरवर्षी या सोहळ्याला उपस्थिती लावतो. आमच्या शहराचे एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये एक समता आहे विश्वबंधुत्व आहे. त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि विशेष करून डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीम कौतुक केलं पाहिजे. पण समाजात ज्यांना कोणी त्यांच्यासोबत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न भोई करतात आणि आम्हालादेखील संधी देतात. त्यासाठी त्यांचे आभार. अशा शब्दात मंत्री मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दगडूशेठ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
Newsworldmarathi Pune: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे.
सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हापरिषदेच्या मुख्य दालनात लाचलुचपत विभागाची धाड; महिला इंजिनीयर आणि दोन अधिकारी अडकले..
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हा परिषदेच्या दालनात भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदाराच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितलेल्या पैशाने त्यांचा कारभार लाच लुचपत विभागाने अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एक वरिष्ठ त्यानंतर त्याचा कनिष्ठ आणि तिसरी त्यांची महिला इंजिनीयरचा यात समावेश आहे. बुधवार दि १३ रोजी सायंकाळी दरम्यान हा प्रकार जिल्हा परिषदेच्या दालनांत घडल्याने विकासाच्या नावाखाली अधिकारी लूट कोणत्या मार्गाने करतात याचा हा भक्कम पुरावा मिळाला आहे.होळी सणाच्या मुहूर्ता वर भ्रष्ट कारभाराची बोंबा-बोंबच या निमित्ताने झालेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यातील गलांडवाडी गाव येथील एका विकास कामाचे टेंडर तक्रारदार प्रवीण शिवाजी कदम यांनी घेतलेले होते चाळीस लाखाचे त्यांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येणे होते हे बिल काढण्यासाठी या तीन अधिकाऱ्यांनी टक्केवारी प्रमाणे पैशाची मागणी केली होती अखेर तडजोड करायची म्हणून ७८ हजार रुपये देऊन बिल काढण्याचा फार्मूला ठरला आणि हाच फार्मूला या बिल काढण्याच्या भानगडीने उघड झाला आहे.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला अगोदरच कळविले होते ठरल्याप्रमाणे हा सापळा रचण्यात आला आणि संध्याकाळी होळी पेटण्याच्या टायमालाच भ्रष्टाचाराची ही बोंबाबोंब विभागाने उघड केली आणि मोठी बोंबाबोंब झाली आहे .
जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी सामाजिक विकास कामांसाठी मोठा निधी खर्च केला जातो यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाणी विभाग जलसंधारण छोटे पाटबंधारे एकात्मिक बाल विकास अशा विविध स्वरूपाने छोट्या छोट्या विभागातून कोट्यावधी रुपयांचा सामाजिक कामे करण्यासाठी निधी खर्च केला जातो सामाजिक कामे करण्यासाठी या प्रत्येक विभागातून ठेकेदारी स्वरूपाने कामे करण्यासाठी सुरुवातीला ठेका तयार करण्याचे प्रोसेस केले जाते याला गोंडस नाव टेंडर असे म्हणतात.
हे टेंडर सुद्धा या विभागातून मॅनेज करण्याचा प्रताप केला जात आहे हे सर्वश्रुत असताना सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकून बहिरे दिसून आंधळे अशी भूमिका बजावत असतात याचा विपरीत परिणाम या प्रकाराने उघडा झालेला आहे.
ठेकेदारी ही राजकीय आशीर्वादात केली जात असली तरी ती अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची गुलाम बनलेली असते टक्केवारीच्या वसुली शिवाय अधिकाऱ्यांकडून कुठल्याही स्वरूपाची कागदी कारवाई पूर्ण केली जात नाही आणि म्हणून देणे-घेणे हे नित्याचेच इथे ठरलेले असते आणि हा सर्व प्रकार कार्यालय सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत केला जातो आज खऱ्या अर्थाने होळी सण आहे.
होळी पारंपारिक सण असून होळीच्या कडेने बोंबाबोंब करीत गावामध्ये ती साजरी केली जाते आज जिल्हा परिषदेमध्ये ही होळी भ्रष्टाचाराला पकडले म्हणून बोंबाबोंब करून झालेली आहे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने जिल्हा परिषदेमध्ये मोठा सावळा गोंधळ असून भ्रष्टाचाराचे आगारच आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
दोन व्यक्ती आणि एक महिला अधिकारी एकाच वेळी जाळ्यात पकडण्याची ही किमया लाच लुचपत विभागाला करण्यासाठी गेले पाच दिवस झगडावे लागलेले आहे गेले पाच दिवसापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून होळीच्या मुहूर्ता वरती तिला अंतिम स्वरूप मिळाले आहे.
लाचलुचपत विभागाने अशा स्वरूपाची कारवाई प्रथमच केलेली नसून राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अनेक कार्यालयातून अशा स्वरूपाच्या मागील काळात घटना घडलेल्या आहेत पण या या घटनांचा अखेर आणि शेवट काय झाला हे मात्र सविस्तर रित्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे एखाद्या लाचलुचपत विभागात सापडलेल्या अधिकाऱ्यांची कारवाई ही शेवटच्या क्षणी काय झाली याची माहिती सुद्धा प्रसारमाध्यमातून मिळावी अशा स्वरूपाची मागणी या कारभाराच्या प्रश्नाकडे पाहून जनसामान्यात होणे साहजिकच आहे
तळजाई टेकडीवर रंगली राजकीय होळी…
Newsworldmarathi Pune: आज धुलीवंदन निमित्त तळजाई टेकडी येथे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर यांनी सहकाऱ्यांसह रंगांच्या सणाचा आनंद घेतला. यावेळी खेळताना उपस्थितांनी कोरड्या रंगांचा वापर करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन धुळवड खेळला आणि या सणाच्या आनंदात रंगबेरंगी वातावरण निर्माण केले. ‘आनंदाने होळी खेळा, पण पर्यावरणाचा विचार करा’ असे आवाहन करत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी स्थानिक सहकार्याच्या मदतीने एकत्रित येत सण साजरा करण्यात आले होते, आणि सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची महत्त्वाची भूमिका ठरली
अजित पवारांच्या घरी शुभमंगल सावधान! जय पवार चढणार बोहल्यावर….
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता सासरे होणार आहे. अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सून होणार आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पवार घरात सनईचे सूर घुमणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. जय पवार तसे राजकारणापासून दूरच राहिले आहे. उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचं सांगितलं जातं. परंतु गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचं सांगितलं जातं. त्यांचं लग्न हे ऋतुजा पाटील यांच्याशी ठरलं आहे.

