जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू

जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये ११ प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदतकार्यक केले जात आहे. ११ मृत्यू ४ जण गंभीर जखमी गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत. तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत. तसेच चार लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ७ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोकांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत.

बेटी बचाओ, बेटी पढाओच्या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी डूडी यांच्या हस्ते कार्यक्रमांचा शुभारंभ

0
Newsworldmarathi Pune : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना अभियानाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, मोनिका रंधवे तसेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी डूडी यावेळी म्हणाले, बाल लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, बालिकांच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांचे अधिकार आणि विकासाच्या संधी त्यांना मिळाव्यात यासाठी देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बाल लिंग गुणोत्तराचे पुणे जिल्ह्याचे प्रमाण वाढावे याकरिता पुढील सहा आठवड्यांमध्ये सर्व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना करा : आ.हेमंत रासने

0
Newsworldmarathi Pune :शहरात काही भागामध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome – GBS) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रमावस्था आहे. या आजारामुळे रुग्णांवर होणारा परिणाम पाहता त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे असून महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आल्याने पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जावी तसेच पाणी शुद्धीकरण मोहिम राबवावी, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांची भेट घेत केली आहे. नागरीकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे. रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये GBS साठी स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली याविषयी बोलताना हेमंत रासने म्हणाले, गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं पुढे आल्याने उकळून घेऊनच पाणी प्यावे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महापालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून टास्क फोर्सच्या माध्यमातून उपायोजना केल्या जात आहेत. यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे , सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कसब्यातील प्रश्ना संदर्भातही चर्चा…. कसबा मतदारसंघातील विविध प्रश्न संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. कचरा मुक्त कसबा अभियान यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपायोजना. मुख्य रस्त्यांवर असणारी अतिक्रमणे हटवणे, तसेच मतदारसंघात काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने सुरळीत व प्रेशरने पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

पालकांनी मुलांना वेळ देण्याची गरज : ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर

0
Newsworldmarathi Pune : समाजात आज विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. शहर असो की ग्रामीण भाग पालकांना मुलांना देण्यासाठी पैसा आहे मात्र वेळ नाही. परिणामी मुलं, मुली नक्की काय करतात, त्यांचे मित्र – मैत्रिणी कसे आहेत याचा आई – वडिलांना पत्ता नसतो. आपलयांवर कोणाचे लक्ष नाही, कुणी आपल्याला काही बोलत नाही यातून युवा पिढीच्या मनामध्ये वाईट प्रवृत्ती वाढीस लागत आहेत.  आपल्याला सुसंस्कारी समाज निर्माण करायचा आहे, यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी केले.  श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच संलग्न संस्थेच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे हा महोत्सव सुरु आहे. ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर बोलत होते. यावेळी कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वांजळे, सामजिक कार्यकर्ते भोला वांजळे, रमेश वेडे पाटील (माजी अध्यक्ष), गजानन महाराज जंगले, शरद गडेकर, गणेश काटे, निलेश वाघमारे, संतोष मेदनकर, संजय दांडगे, विजय बोत्रे (माजी अध्यक्ष),बाळासाहेब कदम, दौलत आबा भुजबळ, संजय पाटील, राहुल येमुल आमोल येमुल, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या आवाजातली दिव्य भक्ति आणि ते ज्या सहजतेने जीवनाच्या गोडीच्या आणि साध्यतेच्या मार्गावर भाष्य करतात, त्यामुळे उपस्थित श्रोत्यांना एक अद्वितीय अनुभव मिळाला. त्यांचं कीर्तन भगवान श्रीराम, श्री कृष्ण आणि विठोबा यांची महिमा गात, भक्तिरसात सर्व श्रोत्यांना तल्लीन करत होते. भक्तिरस आणि भावुकतेने भरलेल्या या कीर्तनात निवृत्ती महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या गजरात ‘रामकृष्णहरी’ चा गजर करत, जीवनातील साधेपणा, प्रेम आणि श्रद्धेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. तसेच, समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातुन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करताना इंदूरीकर महाराज यांनी  मुलांनी आई – वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीर असे दोन्हीचेही नुकसान होते असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजित करा : सुनील माने

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दावोस येथे होणाऱ्या जागतिक अर्थ परिषदेत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादिवशी केलेल्या करारांमध्ये बहुतांश कंपन्या भारतीय असल्याचे दिसून येते. भारतीय कंपन्यांशी दावोस मध्ये करार करण्यापेक्षा ‘व्हायब्रंट गुजरातच्या’ धर्तीवर महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी पुण्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजित करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले आहे. याबाबत अधिक बोलताना माने म्हणाले, महाराष्ट्र सध्या आर्थिक विपन्नावस्थेत आहे. राज्य सरकारने २०२३-२४ मध्ये ८२,०४३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचा कर्जाचा बोजा ७.११ लाख कोटीवर नेऊन ठेवला आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी करण्यात आला आहे. ९६,००० कोटींच्या अतिरिक्त भारासह महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत आणखी बिकटता येऊ शकते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक होती म्हणून हात ढिला सोडला होता, त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. पुढील पाच वर्ष काटेकोरपणे आर्थिक नियोजन करावे लागेल अशी कबुली दिली आहे. त्यामुळे राज्याला दावोस दौरा परवडण्यासारखा आहे का ? याचा सरकारने विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात रोजगार वाढीसाठी परकीय गुंतवणूक आवश्यकच आहे. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र दावोसमध्ये केले जाणारे गुंतवणूक करार प्रामुख्याने भारतीय कंपन्या आणि भारतीय उद्योजक यांच्याबरोबर केल्याचे दिसत आहे. असे करार करण्यासाठी दावोसला जाण्यापेक्षा मुंबई किंवा पुण्यात हे करार करता येतील. कारण या कंपन्या मुंबई-पुण्यात नक्कीच येऊ शकतात. पुढील वर्षी राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. गुजरातमध्ये दरवर्षी जागतिक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी यासाठी व्हायब्रंट गुजरात म्हणून भव्य कार्यक्रम घेतला जातो. तसा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम महाराष्ट्रात का होत नाही. गुजरातमध्ये गुंतवणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी तर मॅग्नेटिक महाराष्ट्र मोहीम कमी करण्यात आली नाही ना अशी शंका या निमित्ताने येते. मुख्यमंत्र्यांनी यापुढेही गुंतवणुकीचे धोरण निश्चितपणे आक्रमक पद्धतीने राबवावे त्यासाठी आम्ही सर्व पाठिंबाच देऊ मात्र मॅग्नेटिक महाराष्ट्र दिमाखात सुरू करून खरोखरची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येईल असे काम करण्याची आवश्यकता असल्याचे माने यांनी म्हटले आहे.

इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना खेळणी व खाऊ वाटप

0
Newsworldmarathi Pune : इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या वतीने आज बालवाडीच्या ५० मुलांना पौष्टिक खाऊ वाटण्यात आला, तसेच साने गुरुजी प्राथमिक शाळेस आठ हजार किंमतीची दर्जेदार खेळणी भेट म्हणून देण्यात आली. क्लबच्या सदस्या मंजुश्री उपासनी ह्यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अमेरिकेत वास्तव्य असणारा मुलगा अभिषेक ह्याने ही भेट दिली. ह्यावेळी मुख्याध्यापिका मीना काटे यांनी क्लबच्या अध्यक्षा प्रिती शिरुडकर ,मंजुश्री उपासणी आणि अभिषेक यांचा सत्कार व शाळेच्या वतीने स्वागत केले. इनरव्हील क्लब सदस्या संगिता गोवळकर , सोपान बंदावणे, मोनिका पोटे, शीतल रूपनूर, नीशा नाईकनवरे उपस्थित होते. सदर खेळणी आणि खाऊ पाहून या बालचमूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी चिरंजीव आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

पुण्यात दिवसाढवळ्या दहशत; महिलेचे मंगळसूत्र हिसकावलं!

पुण्यातील कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत.कोथरूडमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. कर्वेनगरमध्ये एका सोसायटीच्या आत प्रवेश करून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून दोन्ही घटनांची चौकशी सुरू असून चोरट्यांचा तपास केला जात आहे. पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावल्याची (Crime News) घटनी घडली आहे. पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेऊन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले आहे. वृध्द महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे शक्य नव्हते. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी ता-22) सकाळी 6.42 वाजता ही घटना घडली आहे. नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्‍या जेष्ठ महिलांचे खुलेआम मंगळसूत्र चोरून (Crime News) हिसकावून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला. चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता या ठिकाणी व्यक्त होते आहे.

जिल्हा परिषदेतील मोठी कारवाई; कनिष्ठ अभियंता अक्षय झारगड निलंबित!

0
Newsworldmarathi Pune : जिल्हा परिषदेने जनसुविधाअंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसातील दुसरी कारवाई आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई करून आणखी एक दणका दिला आहे. बांधकाम विभागामध्ये अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या चौकशी सुरू आहेत मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या प्रलंबित ठेवून एक प्रकारे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. झारगड हे बारामती पंचायत समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वाघळवाडी येथे जनसुविधा अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते, ते काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तसेच संपूर्ण कार्यवाही ही कनिष्ठ अभियंता म्हणून झारगड यांच्याकडे होती

काका-पुतण्या पुन्हा येणार एकाच व्यासपीठावर

0
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी, 23 जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. कार्यक्रमादरम्यान वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासह अन्य पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमावर सहकार आणि साखर क्षेत्रातील व्यक्तींनी लक्ष ठेवले आहे, कारण हा कार्यक्रम सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे संकेत देऊ शकतो. सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण, राज्यस्तरीय ऊसभूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊसविकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले. सन 2023-24 वर्षामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 13 सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यांतील अधिकाऱ्यांना वैयक्तिक सात बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाच वैयक्तिक बक्षिसे या वेळी देण्यात येतील, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ आजपासून तीन दिवस बंद राहणार

0
Newsworldmarathi Mumbai : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील डोंगरगाव/कुसगाव येथे गर्डर्स बसविण्याच्या कामामुळे वाहतुकीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत असेल. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. तरी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या वेळेत प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करावे, तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डोंगरगाव/कुसगाव येथे गर्डर्स बसविण्याच्या कामामुळे 22, 23, आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे. वळवण (किमी 54/700) ते वरसोली टोल नाका मार्गे ही वाहतूक देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवली जाईल. दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा एक्सप्रेसवेच्या पुणे वाहिनीवरून सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेसवेवर नियमितपणे सुरू राहणार आहे. प्रवाशांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रवासाचे नियोजन करावे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.