गदिमांच्या ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन
Newsworldmarathi Pune : आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर लिखित ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन् डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला.
‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे श्रीराम लागू रंगअवकाश येथे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील संगीत नाटकांच्या दरबारामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी साकारलेल्या या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. यातील नाट्यपदे, संवाद वेगळ्या धाटणीचे असून त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण युद्धभूमीवर मर्दुमकी गाजविण्यासाठी आतूर झालेला असून त्याच्या परिवाराचे तसेच गावातील इतर वातावरणाचे वर्णन गदिमांनी अतिशय चपखलपणे दर्शविलेले जाणवते. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या नाटकामधून त्या काळातील समाजव्यवस्था, एकोपा, वर्णव्यवस्था, शिक्षण, कौटुंबिक रचना तसेच सावकारी पाशानी पिचलेला समाज या वास्तवतेचे अनुरूप दर्शन घडते.
या नाट्यविषयाला समर्पक असलेली ‘मनात माझ्या बहुरुनी आले शिवार हिरवे शब्दांचे’ ही नांदी प्रभावीपणे सादर करून निनाद जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रधाराच्या भूमिकेत असलेल्या वर्षा जोगळेकर यांनी नाटकाचे कथानक गोष्टी रूपाने उलगडत नेले. ‘खेळीमेळीने करू न्याहरी’, ‘परतल्या घरट्याला पक्षीणी’, ‘त्या ओढ्याच्या पैलथडी एक असावी झोपडी’, ‘सुटला गं सांजवारा’, ‘परतेल शिपाई माझा’, ‘हरि तुझे नाम गायीन अखंड’, ‘उजळले भाग्य आता’ ही पदे भाग्यश्री काजरेकर आणि निनाद जाधव यांनी सुमधूर आवाजात सादर केली.
सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन यांनी अभिवाचन केले तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे यांची संगीत साथ लाभली. नाटकातील पदांच्या मूळ चाली उपलब्ध न झाल्याने निनाद जाधव यांनी पदांना नव्याने समर्पक चाली लावल्या आहेत. या अनोख्या सांगीतिक नाट्य अभिवाचनाच्या प्रयोगाला पुणेकर रसिकांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून दाद दिली.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात कल्पकतेला वाव : केन झुकरमन
Newsworldmarathi Pune : संगीत क्षेत्र अमर्याद असून गायन हा संगीताचा आत्मा आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे हे संगीत केवळ नोटेशन पाहून सादर केले जात नाही तर एकाग्र चित्ताने ऐकून त्यात स्वत:च्या कल्पकतेची भर घालत आत्मसात केले जाते. हा विचार माझ्यातील कलाकाराला भावला. गुरूंच्या सान्निध्यात राहून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात मी रममाण झालो, अशा भावना स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक, ग्रॅमी नामांकनप्राप्त केन झुकरमन यांनी व्यक्त केल्या.
वाद्यसंगीत शिकताना स्वत:ला एकाच वाद्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. मुख्यत: गायन शिका, कारण कुठलेही वाद्य वाजविताना तुम्ही खरे तर मनातून गात असता. संगीत शिकणे व शिकविणे यासाठी वयाचे बंधन नाही. शेवटच्या श्वासापर्यंत संगीत शिकता आणि शिकविताही येऊ शकते. मला वारशातून मिळालेले भारतीय शास्त्रीय संगीत मी शिकवत राहणार आहे, असेही त्यांनी आवजूर्न सांगितले.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, मॉर्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुणेकरांना केन झुकरमन यांचे सरोद वादन आणि त्यांच्या सांगीतिक क्षेत्राविषयीचे अनुभव ऐकावयास मिळाले. केन झुकरमन यांच्याशी पुण्यातील प्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी संवाद साधला.
भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया गायन शिकल्याने पक्का होतो, असे आपल्या गुरूंचे मत होते असे सांगून झुकरमन म्हणाले, एकाग्र चित्ताने गुरूंकडून ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे, कारण शिष्याने नेहमी एकाग्रचित्त राहून उत्तम श्रोता होणे आवश्यक असते. परंतु आजच्या काळात ही एकाग्रचित्त वृत्ती स्मार्ट फोनच्या अतिवापराने कमी होत चालली आहे. शिष्य कोण आहे, कुठला आहे याला महत्त्व नसून सुजाण पालक व उत्तम गुरू लाभल्यास पुढच्या पिढीतील गायक-वादक निर्माण करणे शक्य आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मला लहानपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती. लहानपणी मी गिटारवादन शिकलो. त्यातही गुरूंनी सांगितलेले साचेबद्ध वादन न करता नाविन्य शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होतो. अशातच भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांचे वादन ऐकले. त्यातून प्रभावित होऊन मी सुरुवातीस सतार वादनाकडे वळलो. परंतु सरोद हे वाद्य मनाला अधिक भावल्याने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सरोद वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. उस्ताद अली अकबर खान यांच्यातील सांगीतिक दृष्टीकोन आणि कौशल्य मला आवडल्याने मी नेटाने सरोद वादन शिकण्यास सुरुवात केली. नवनिर्मितीच्या ध्यासातून मी सतत सरोद वादनात काही ना काही प्रयोग करीत राहिलो. त्यातूनच पहिल्या वादन मैफलीत जनसंमोहिनी रागाबरोरबच माझी स्वत:ची रचना वाजविण्याचे धाडस केले. गुरूंनी मला योग्य दिशा दाखवत नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहितच केले, हे मी माझे भाग्य समजतो.
भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा जाणून घेताना राग विस्ताराचे स्वातंत्र्य असल्याचे जाणवल्याने भारतीय अभिजात संगीताला मी वाहून घेतले आहे. मैहर घराण्याच्या सरोद वादनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली, त्यातील बारकावे सांगताना केन झुकरमन यांनी झमझमा, सिधा झाला, उलटा झाला आदी प्रकार वादनातून ऐकविले. तंत्राची नक्कल करता येते परंतु वादनातील अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी कलाकारामध्ये कल्पकता असण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
वादन मैफलती केन झुकरमन यांनी गुरू उस्ताद अली अकबर खान यांचा आवडता बागेश्री कानडा हा पारंपरिक राग अतिशय प्रभावीपणे सादर केला. गुरूंची निर्मिती असलेल्या चंद्रनंदन या सुरेल, सुमधूर रागाच्या निर्मितीमागील कथा उलगडत त्यांनी हा राग ऐकवून रसिकांना अचंबित केले. त्यांना पुण्यातील युवा तबला वादक महेशराज साळुंके यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्चे संस्थापक प्रविण कडले, चेतना कडले आणि मॉडर्न महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्चे विभाग प्रमुख पुष्कर लेले यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी वाठारे यांनी केले तर आभार श्रुती पोरवाल यांनी मानले.
अजित पवार आज अधिवेशनात सक्रिय होणार
Newsworldmarathi Nagapur : मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी न होणारे अजित पवार बुधवारी विधिमंडळ कामजात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सहभागी झाले नव्हते. अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.
अजितदादांना घशाचा संसर्ग झाल्यामुळे ते दोन दिवस अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. या काळात ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी आराम करत होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अजित पवार यांनी मात्र भाग घेतला नव्हता. या काळात अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याची चर्चा सुरू होती.
महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याच्या बातम्या या काळात येत होत्या. त्यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं ाहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
Newsworldmarathi Pune : बारामतीच्या प्रसन्न गुलाबी थंडीने सजलेली पहाट, हिरवाई नटलेले सुंदर रस्ते , एसआरपीएफ च्या शिस्तबद्ध बँड पथकाने रनर्सचे फिनिश पॉईंटवर केलेले अविस्मरणीय स्वागत आणि बारामतीचा विकास पॅटर्न न्याहाळत रनर्सने विक्रमी वेळेत साधलेली दौड यांमुळे पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी पुनीत बालन-धारिवाल, युवा नेते पार्थ पवार, अभिनेता जॅकी भगनानी यांनी पहाटे चार वाजता झेंडा दाखवून या मेरोथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला. वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यतेने आणि तालुका स्तरावर आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने संपन्न होणारी बारामती पॉवर मॅरेथॉन ही कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅरॅथॉनसाठी पात्रता निकष गणली जाते. त्यामुळे देशभरातून अनेक ख्यातनाम रनर्स या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत असतात. सलग दुसऱ्या वर्षी पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कृष्ट नियोजन , ट्रॅक वर असणारी हायड्रेशनची आणि एनर्जी पॉईंटची उत्तम व्यवस्था , मैदानावर जागोजागी उभारलेले सेल्फी पॉईंट आणि फोटोसेशन बूथ , चिंकाराच्या ब्रँडिंगने साधलेले वातावरण यांमुळे प्रोफेशनल रनर्ससोबतच यंदा बारामती आणि परिसरातील आरोग्यस्पर्धकांची संख्या वाढलेली बघायला मिळाली. एकूण २८०० हुन अधिक रनर्स मॅरेथॉन मध्ये विविध रनिंग कॅटेगरीसाठी सहभागी झाले होते. बारामती रेल्वे स्टेशन ग्राउंड येथे विविध पाच गटांमध्ये ही मॅरेथॉन पार पडली. खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी त्यांनी मॅरेथॉन आणि त्याचे आयोजन करणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे.
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्यांनी हे आव्हान लीलया पेलले असल्याचे सांगितले. तर बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष सतिश ननवरे म्हणाले , “पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाला रनर्सने दिलेला प्रतिसाद आम्हा सर्व आयोजकांचा उत्साह वाढविणारा आहे. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी ज्यांचे पाठबळ लाभलेल्या युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह सर्वच प्रमुख प्रायोजकांचे आभार व्यक्त केले.
अजित पवारांकडून पुनीत बालन यांचे कौतुक स्पर्धकांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , “बारामतीची प्रगती चहुबाजूंनी होत असताना, त्याला क्रीडा क्षेत्र देखील अपवाद नाही. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धा महत्वाच्या ठरतात आणि या प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनात पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती जान्हवी या नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी रित्या सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. सतिश ननवरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेऊन ही मॅरेथॉन यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून विविध खेळाना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करत आहोत. बारामती पॉवर मॅरोथॉन स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि निटनेटके असे होते. या स्पर्धेत हजारो नागरिक-तरुण भल्या पहाटे उपस्थित राहून सहभागी झाले. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
मॅरोथॉन स्पर्धेतील विजेते
ही मॅरोथॉन तीन गटात झाली. ४५ किमी, २१ किमी, १० किमी, या रनिंग कॅटेगरी मधील , प्रथम तीन विजेते आणि मॅरेथॉन मध्ये सहभागी टॉप ५ क्लब्स आणि स्कुल रन मध्ये जास्तीत जास्त संख्येने स्पर्धक देणाऱ्या टॉप ०३ स्कुलला सुद्धा रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये ४२ किमी पुरुष (प्रथम -लते चांदेव , द्वितीय – गायकवाड दयाराम , तृतीय – पंकज सिंग ) ४२ किमी स्त्री (प्रथम -मनीषा जोशी , द्वितीय – उर्मिला बने , तृतीय – सिंधू उमेश) २१ किमी पुरुष (प्रथम -धोंडिबा गिरदवा , द्वितीय – आबासाहेब राऊत , तृतीय -डॉ.मयूर फरांदे ) २१ किमी स्त्री (प्रथम -शीतल तांबे , द्वितीय – शिवानी चौरसिया , तृतीय – स्मिता शिंदे ) १० किमी पुरुष (प्रथम -अमूल अमुने , द्वितीय -सुजल सावंत , तृतीय – आर्यन पवार ) १० किमी स्त्री (प्रथम -आरती बाबर , द्वितीय – सोनाली मटने , तृतीय -रोशनी निषाद )
आणि टॉप ५ क्लब्स प्रथम – फलटण रनर्स , द्वितीय – सनराईज सायकल ग्रुप , तृतीय – एन्व्हायरमेंटल हेल्थ क्लब , चतुर्थ – बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन , पाचवा क्रमांक -सासवड रनर्स या क्लबला तसेच , टॉप ०३ स्कूल प्रथम – एस.व्ही.पी.एम. शारदानगर , द्वितीय – विनोद कुमार गुजर विद्याप्रतिष्ठान स्कूल , तृतीय -कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन स्कूल यांना गौरविण्यात आले.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत दबंग दिल्ली संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश
Newsworldmarathi Pune : कर्णधार आशु मलिक याच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने बंगाल वॉरियर्सवर ४७-२५ अशी मात केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मध्यंतराला सतरा गुणांची आघाडी घेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दबंग दिल्ली संघाने आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी दहा सामने जिंकले होते. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांनी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत ठेवला होता. आजचा सामना जिंकून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. त्यांच्या तुलनेमध्ये बंगाल वॉरियर्स संघाची कामगिरी निराशा जनक झाली आहे त्यांनी आतापर्यंत १८ सामने खेळले त्यामध्ये केवळ त्यांना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. आजची लढत जर त्यांनी गमावली तर त्यांचे प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्नही भंगले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही संघांसाठी आजची लढत महत्त्वपूर्ण होती.
प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याच्या दृष्टीने दिल्ली संघाने सुरुवातीपासूनच आघाडी कशी राखता येईल हीच रणनीती आखली होती. दहाव्या मिनिटापर्यंत त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती. अर्थात बंगालच्या खेळाडूंनीही जिद्दीने त्यांना लढत दिली. बाराव्या मिनिटाला त्यांनी दिल्लीच्या अशू मलिक याची पकड करण्याचा आततायी प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि परिणामी कर्णधार फाजल अत्राचेली याच्यासह त्यांचे चार खेळाडू बाद झाले. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच लोणही बसला. या लोणमुळे दिल्ली संघाने आघाडी दहा गुणांपर्यंत वाढवली. मध्यंतराला त्यांनी २६-९ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच दिल्ली संघाने दुसरा लोण चढविला आणि आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे २९-१० अशी आघाडी होती. त्यानंतर त्यांनी आपली आघाडी आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे २३ गुणांची आघाडी होती.
दिल्ली संघाच्या विजयामध्ये आशु मलिक याच्या चढायांबरोबरच योगेश याने पकडी मध्ये केलेली अव्वल कामगिरी याचाही मोठा वाटा होता. बंगाल संघाकडून एस विश्वास व नितेश कुमार यांची लढत अपुरी ठरली.
जहाँ नही चैना, वहाँ नही रहना : छगन भुजबळ
Newsworldmarathi Nagpur नाराजीच्या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ यांनी जहाँ नही चैना, वहाँ नही रहना असं सूचक विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ आता काही मोठा निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छगन भुजबळ यांनी म्हटलं की, अजित पवार जेव्हा शरद पवार यांना सोडून बाहेर पडले तेव्हा सर्व म्हणत आहेत तर मी तुमच्यासोबत राहीन असं म्हणाले. पण मी अजित पवार यांच्यासोबत राहूनही पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान, त्यांनी एक सूचक विधान केल्यानं खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाचाही आधीच राजीनामा दिला होता. त्यावेळी राजीनामा दिल्यानंतरही आमदार माझ्याविरोधात बोलले असल्याचं भुजबळ म्हणाले.
पुणे जिल्हा लोकअदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल
Newsworldmarathi Pune : शनिवारी (14 डिसेंबर) रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील ४थ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून तडजोड रक्कम जमा करण्यात आली.
विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांचे हस्ते लोकअदालतचे उद्धघाटन पार पडले. याप्रसंगी न्यायालयातील अशोक हॉल येथे विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.के. महाजन म्हणाले की, लोकअदालत सर्वांसाठी जलद न्याय, सुलभता आणि न्याय विवाद निराकरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. लोकअदालतला आपल्या न्याय व्यवस्थेत नेहमीच एक अनन्यसाधारण आणि विशेष स्थान आहे. यामुळे विवादांचे जलद निराकरण करण्यासाठी आणि आपल्या न्यायालयांवरील ओझे कमी करण्यासाठी एक प्रगल्भ आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
लोकअदालतमध्ये एकूण 366 कोटीची 27 लाखाची तडजोड करण्यात आली. यावेळी 1 लाख 87 हजार 63 प्रकारणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 87 हजार 486 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे तडजोडीची प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश
लोकअदालतमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश प्राप्त झाले असून एकूण 52 कोटी 3 लाख 27 हजार रक्कमेची तडजोड झाली आहे. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) 1 लाख 45 हजार 179 प्रकरणे तडजोडीची दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 51 हजार 328 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय एकूण दाखल दाव्यात (पोस्ट लिटिगेशन) 314 कोटी 24 लाख 58 हजार 502 तडजोड रक्कम प्राप्त झाली. यामध्ये एकूण 41 हजार 884 प्रकरणे तडजोसाठी हाती घेण्यात आली होती तर त्यापैकी 36 हजार 158 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत.
विधी सेवा प्राधिकरणाच्या व्हिजन अंतर्गत आयोजित राष्ट्रीय लोकअदालत हे सर्वांसाठी न्याय, कार्यक्षमता आणि निष्पक्षतेचे प्रतिक म्हणून कार्य करीत असताना उत्कृष्ट कामगिरी भविष्यासाठी भारतीय न्यादानातील आशेचा किरण आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरीका पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन न्यायाधीश डी जे पाटील यांनी केले.
डान्सबार विरोधातील कारवाईचा हिरो, डॉ. राहुल गेठेंना सरकारकडून भेट!”
Newsworldmarathi Mumbai : नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या बेधडक कारवाईच्या शैलीमुळे त्यांना नव्या सरकारकडून मोठे प्रमोशन मिळाले आहे. बेकायदेशीर डान्सबारवर कठोर कारवाई करत, थेट इमारतींवर बुलडोझर फिरविण्याचे धाडसी पाऊल उचलणारे गेठे आता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहेत.
डॉ. गेठे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत चालणाऱ्या बेकायदेशीर डान्सबारवर कठोर कारवाई करून स्थानिक प्रशासनाची ताकद दाखवली. रातोरात डान्सबारच्या इमारती पाडून कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला.
त्यांच्या कामगिरीची दखल घेत एकनाथ शिंदे सरकारने त्यांना अतिरिक्त आयुक्तपदावर बढती दिली आहे. यापूर्वी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD (Officer on Special Duty) म्हणूनही कार्यरत होते, ज्यामुळे सरकारमधील त्यांचा दरारा वाढला आहे.
गेठेंच्या कठोर धोरणामुळे बेकायदेशीर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे बेकायदेशीर डान्सबार आणि इतर अतिक्रमण करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा आहे.
फडणवीस सरकार अशा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे, जे कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करत आहेत. बेकायदेशीर अतिक्रमण आणि व्यवसायांविरोधातील कारवाईला आणखी वेग मिळणार आहे.
पुण्यात पोर्श प्रकरण घडताच बेकायदा विशेषतः अमली पदार्थ, डान्सबार आणि रात्री-अपरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा पवित्रा घेत, शिंदेंनी काळे धंदे बंद करण्याची ताकीद प्रशासनाला दिली. याचा फायदा उठवून डॉ. गेठेंनी नवी मुंबई महापालिकेतील बेकायदा डान्सबार पाडले. त्यावरून संतापलेल्या डान्सबार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना भेटून, डॉ. गेठेंच्या वर्किंग स्टाइलवर बोट ठेवले. त्यानंतर आपल्या पध्दतीने कारवाई सुरू ठेवून डॉ. गेठेंनी बारमालकांना धडा शिकवला. हेच गेठे आता नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. डॉ. गेठेंच्या या प्रमोशनमुळे आता पुन्हा बारमालकांची नशा उतरणार, हे नक्की.
नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरील मुत्सद्दी राजकारणी : जावडेकर
Newsworldmarathi Pune : अफाट कार्यक्षमता, कामकाजातील पारदर्शकता, सूत्रबद्ध नियोजन, दूरदृष्टी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कल्पक विचारसरणी आणि विकसित भारताचे स्वप्न उराशी बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू आहे. गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यातही अमूलाग्र बदल झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविराम करून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणले आहे. या मुळेच नरेंद्र मोदी हे केवळ देश पातळीवरील नेते नसून जागतिक पातळीवरील मुत्सद्दी राजकारणी आहेत हे सिद्ध होते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या ‘मोदी 3.0’ या कार्यक्रमाचे रविवारी (दि. 15) आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे, सचिव अमृता कुलकर्णी, माजी अध्यक्ष दीपक शिकारपूर मंचावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, विचारप्रणाली, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, समन्वयाची भूमिका आदी वैशिष्ट्यांसह व्हिजन 2047 या विषयी प्रकाश जावडेकर यांनी मते मांडली. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नरेंद्र मोदी संन्यस्त कर्मयोगी आहेत. त्यांनी काळाची गरज ओळखून सुरू केलेला समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभावी वापर, ऑनलाईन पेमेंट पद्धती, मन की बात, परीक्षा पे चर्चा, हर घर शौचालय, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, संविधान सन्मान आदी क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य या मुद्द्यांकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले.
मोदी यांच्या कार्यकाळात संविधानाचा योग्य सन्मान झाला असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 23 वर्षे कार्यरत असणारे मोदी हे एकमेव राजकीय व्यक्तीमत्व आहे. मोदींच्या पारदर्शी कारभाराची माहिती देताना त्यांच्या कार्यकालावधीत एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दैनंदिन व्यवहारात सरकारची गरज कमी करत मोदी यांच्या विविध योजनांमुळे जनतेच्या जगण्यात अमूलाग्र बदल होऊन सुलभता आली आहे. जागतिक पातळीवर घेतलेल्या आर्थिक निर्णयांमुळे देशाला झालेल्या लाभांविषयी जावडेकर यांनी माहिती दिली.
मोदी यांच्या आवडीनिवडी सांगताना जावडेकर म्हणाले, योगासने, व्यायाम, सतत कार्यमग्नता, शुद्ध शाकाहारी जेवण आवडीचे आहे. मोदी यांना गुजराती पद्धतीचे जेवण अधिक पसंत असून महाराष्ट्रातील मेतकुटही मनापासून आवडते.
व्हिजन 2047 अंतर्गत आर्थिक महासत्ता, नदी जोड प्रकल्प, सौरउर्जा, पवनउर्जा, वक्फ बोर्ड, शैक्षणिक धोरण याविषयी सुरू असलेल्या कार्याचा उहापोह केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मंजिरी शहाणे यांनी तर स्वागत डॉ. शंतनू देशपांडे यांनी केले. आभार विशाल कुलकर्णी यांनी मानले.
आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन
Newsworldmarathi Nagpur : नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा महत्त्वाचा काळ असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्याबळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ताधारी बाकांवर दिसतील. महायुतीचा विजय आणि सरकारच्या धोरणांवर चर्चा होणार आहे.
विरोधी बाकांवरील संख्याबळ कमी असूनही, महाविकास आघाडी जोरदार भूमिका मांडण्याची शक्यता आहे. ईडी, शेतकरी प्रश्न, महागाई, आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर आक्रमक विरोध होऊ शकतो.
या अधिवेशनत शेतकरी कर्जमाफी आणि पिकविमा योजना यावर चर्चा होईल. राज्याच्या विकासासाठी अपेक्षित निधी, खासगीकरण, आणि इतर आर्थिक धोरणांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आणि आदिवासी विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसाठी दिशा ठरवणारे ठरणार आहे.

