Manikrao Kokate : कोकाटेंच्या ‘ढेकळांचे पंचनामे’ विधानावर वाद; कृषीमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Newsworldmarathi Nashik : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात नुकसानीची पाहणी करताना त्यांनी विचारले, “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” या विधानामुळे शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “ज्या शेतात काहीच नाही, त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत.” कोकाटे यांच्या या विधानामुळे विरोधकांनीही टीका केली आहे. कृषीमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत आणि भरपाई देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नेमकं काय म्हणाले कोकाटे ? कृषीमंत्र्यांना नुकसानीसंदर्भात विचारले असता, नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे शेतात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. शेतात जी काही पिके असतील त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असेही मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.

मेट्रोच्या विस्तारीकरणाला मिळणार गती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी चर्चा

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे तसेच खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासलासोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या टप्प्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची मान्यता मिळविण्यासंदर्भात मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महा मेट्रोने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारचीदेखील मंजुरी मिळालेली आहे. तसेच पब्लिक इनव्हेसमेंट बोर्डाचीही मान्यता ११ मार्च २०२५ रोजी मिळाली असून आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी प्रतीक्षात आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी मोहोळ यांनी खट्टर यांच्याकडे केली. तसेच मेट्रोच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्गही दृष्टीक्षेपत असून सोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग हा जोडमार्गही प्रस्तावित आहे. याही प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून पीआयबीची मान्यता प्रतीक्षेत आहे .तसेच पीआयबीच्या मान्यनंतर मान्यतेनंतर सदर प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात यावा, याबाबत मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याची मोदी सरकारची भूमिका असून नवे प्रस्तावित मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरभर मेट्रोचे जाळे तयार करताना त्याला आणखी वेग यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही विषयांबाबत खट्टर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास वाटतो.

कात्रज परिसरातील ५ हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप

0
Newsworldmarathi Pune: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कात्रज परिसरातील पाच हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका मनीषा कदम आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. उपचारासाठी लागणारा खर्च सुसह्य होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी मनीषा कदम आणि राजाभाऊ कदम यांचे आभार मानले आहेत. आयुष्मान भारत योजना, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना असेही म्हटले जाते, ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्य सेवा सुलभ करणे, तसेच प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांचा समावेश करून नागरिकांना समग्र आरोग्य सुविधा पुरवणे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपये पर्यंतच्या उपचारांसाठी मदत मिळते. या रकमेचा उपयोग देशभरातील सहाभागी रुग्णालयांमध्ये (सरकारी तसेच खासगी) मोफत उपचारासाठी करता येतो. हा उपक्रम आरोग्य सेवांमध्ये आर्थिक अडचणीमुळे होणाऱ्या अडथळ्यांना दूर करून गरजू नागरिकांना दिलासा देणारा ठरत असल्याचे राजाभाऊ कदम यांनी सांगितले.

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक ; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

Newsworldmarathi sambhajinagar: समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून समर्पित भावनेने लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी, मेहनत घेत, अडचणीत तग धरून राहत, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी ही आजची तरुण पिढी सर्वांसाठी प्रेरक आहे. भारताचे उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणाईस आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देत असताना अभिमान वाटतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्याचे आज एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते तर, मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, कवी दासू वैद्य, संयोजक नीलेश राऊत, केतकी नेवपुरकर, गौरव सोमवंशी, विभागप्रमुख संतोष मेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना टोपे म्हणाले, आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे. या सर्वांनी आपल्या कामांतून ‘नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा’ हाच संदेश दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना प्रेरणा आणि बळ देण्याचे काम करत आहे. भारताला संतांच्या विचारांची फार मोठी परंपरा आहे. भगवान बुध्दाने उदात्त धर्माची दिलेली शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरलेली आहे. अशा समृद्ध विचारपरंपरा लाभलेल्या देशात जाती-धर्माच्या नावाने होणारे वाद बघून मन विषन्न होतं. वडीलधाऱ्या माणसाने तरुणांना याविषयी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटरने यासाठी पुढील काळात काम केले पाहिजे. संधीची नवनवीन क्षितिजे उपलब्ध होत असताना आता या तरुणांनी न थांबता, अथक परिश्रमातून नवनवीन विक्रम स्थापित केले पाहिजेत, असे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले. मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यावेळी बोलताना म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे सगळे युवक-युवती समाजाच्या भल्यासाठी अनेक महत्वाच्या विषयावर काम करत आहेत. माध्यमे याची दखल घेत असतील किंवा नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाण सेंटरने यांच्या कामाची दखल घेतली आहे. आपली आवड जोपासत ही सगळी तरुण मंडळी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत आहेत. या अशा समाजातील तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे महाराष्ट्र चालतो आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मुळे यांनी केले तर आभार विभागप्रमुख संतोष मेकाले यांनी केले. आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ७ विविध विभागांमध्ये एकूण १६ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. *पुरस्काराचे स्वरूप :* रोख २१ हजार रु., स्मृतीचिन्ह व मानपत्र असे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत : साहित्य : विनायक होगाडे (कोल्हापूर) मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक : आकाश टाले (नागपूर) ऋतुजा जेवे (बुलढाणा) इनोव्हेटर : सुश्रुत पाटील (पालघर) पद्मजा राजगुरू (परभणी) क्रीडा : ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या) हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग), पत्रकारिता : प्रथमेश पाटील (पुणे) ज्योती वाय. एल. (मुंबई) उद्योजक : जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे) रंगमंचीय कलाविष्कार : कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला) तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य) ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत) कल्पेश समेळ, रायगड (नाट्य)

Vaishnavi Hagawane Case : “वैष्णवी हगवणे प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची शंका; रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे सीआयडी चौकशीची मागणी”

0
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता गंभीर राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याची शक्यता शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. 23 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरकडील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मात्र राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाशी संबंधित असल्याने या प्रकरणाची पारदर्शकता आणि पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, “त्या प्रकरणातही सुरुवातीला पोलीस तपास ढिसाळ होता. पण जेव्हा तपास सीआयडीकडे गेला, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. तसेचच काही वैष्णवी प्रकरणातही दिसून येत आहे.” त्यांनी एक व्हिडीओ जारी करत पोलिसांच्या भूमिकेवर थेट आरोप केले. त्यांनी म्हटले की, “वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच तिच्या अंगावर 29 जखमा असल्याचे स्पष्ट झाले होते, तरीसुद्धा सौम्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. ही एफआयआर आरोपींना मदत करणारी वाटते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे का?” याशिवाय त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेतली असून, अशा प्रकारे पीडितेला दुहेरी शिक्षा मिळत आहे.” मुख्यमंत्र्यांकडे मागणी “सत्य लपवले जात आहे. वैष्णवीच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी ही केस सीआयडीकडे वर्ग करावी, जेणेकरून निर्दोष व्यक्तींचा छळ होणार नाही आणि दोषींना शिक्षा मिळेल,” असे रोहिणी खडसे यांनी ठामपणे म्हटले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : कुख्यात निलेश चव्हाणच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर आवळल्या मुसक्या

0
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : कुख्यात निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर अटक केली आहे. निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ५ पथके तैनात केली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते आज अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मध्यरात्री आणणार पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane), दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत निलेश चव्हाण याला देखील अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, निलेश चव्हाण 23 मे पासून फरार होता. आता पोलीस निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणणार आहे. आज मध्यरात्री दोन वाजता पुणे विमानतळावरती येणार असल्याची माहितीसमोर आली आहे. पुणे सत्र न्यायालयात 28 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी या प्रकरणात निलेश चव्हाणाला आरोपी करणे चुकीचे आहे कारण त्याने बाळाचा सांभाळ केला आहे. असा युक्तीवाद करत निलेश चव्हाणाने हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचा दावा केला होता. प्रकरण काय? पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. यानंतर वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, असे आरोप करण्यात आले होते. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्यानंतरही आणखी पैशांसाठी वैष्णवीचा छळ सुरु होता असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे.

पुण्यात भाजप महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार? चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या सूचना

0
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. युतीचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, परंतु कार्यकर्त्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवावा आणि दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. कसबा मतदारसंघात आयोजित बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ऐतिहासिक विजयाचे लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिले. कार्यकर्त्यांना घरोघरी जाण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, पक्षाने नुकतीच शहराध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांची निवड पूर्ण केली आहे. आता मंडल अध्यक्षांनी सर्व आघाड्या आणि मोर्चांच्या अध्यक्षांसह कार्यकारिणीची निवड लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. “आपल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत रस्त्यावर उतरून मेहनत घेतली, त्यामुळे पक्षाला मोठे यश मिळाले. आता महापालिका निवडणुकीतही असेच यश मिळवायचे आहे,” असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवला महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार की युती करणार, याबाबत कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले. “युतीचा निर्णय हा आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. आपले काम आहे जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे आणि पक्षाला विजयी करणे,” असे त्यांनी नमूद केले. या विधानातून पाटील यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम न देता कार्यकर्त्यांचे लक्ष निवडणूक तयारीवर केंद्रित केले आहे. ऐतिहासिक विजयाचे लक्ष्य पुणे महानगरपालिका निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती, आणि यंदा त्याहून मोठे यश मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याने गटागटाने कामाला लागावे आणि घरोघरी जाऊन पक्षाच्या योजना आणि कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवावी. “आपण आतापासूनच मेहनत घेतली तर पुण्यात ऐतिहासिक विजय नक्की मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील राजकीय समीकरणे पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची राहिली आहे. यंदा युतीच्या चर्चांमुळे आणि स्वबळावर लढण्याच्या शक्यतेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, पक्षाने आता निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवत कार्यकर्त्यांना जनसंपर्कावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. आता पुण्यातील निवडणूक रंगतदार होणार असून, भाजपचा ऐतिहासिक विजयाचा दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात; दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश

0
Newsworldmarathi Pune बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांचा गावठाण सिटी सर्वे आजपासून औपचारिकपणे सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांचे अथक प्रयत्न आज यशस्वी झाले आहेत. बावधन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली. या प्रक्रियेस गती मिळवून देण्यासाठी त्यांनी मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते. सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आजपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. सिटी सर्वेचे नागरिकांना होणारे फायदे : •मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार. •जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील. •बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता. •शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर. •बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार. दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले की, “हा सिटी सर्वे म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. आज ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटतं. s”या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.

पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’; काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी

0
पुणे  : एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे.  राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत आहे. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देशातील विरोधी पक्षाचे नेत्यावर अश्लाघ्य व अतार्किक टिका करत फडणवीस आपल्या बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन करत असल्याची प्रखर टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. ते पुढे म्हणाले की, खरेतर फडणवीसांना पीओके प्रमाणे प्रमाणे तुलनाच करायची असेल तर ती काँग्रेस नव्हे तर भाजप सोबतच चांगल्या पध्दतीने होऊ शकते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजप’ने भ्रष्टाचार मुक्त देशाची घोषणा करून एकीकडे ११ वर्षात ‘एकाही भ्रष्टाचारी नेत्यावर’ खटला चालवून, त्यास गजाआड टाकण्याचे काम केलेले नाही, तर उलटपक्षी ‘भ्रष्टाचार व्याप्त वा काँग्रेस व्याप्त भाजप’ करण्याचे पवित्र कार्य करून अनायसे काँग्रेस सह अन्य राजकीय पक्ष स्वच्छ करण्याचेच कार्य केले आहे. देशाच्या “संरक्षण वा गृह खात्याची” जबाबदारी असलेले भाजप नेते, देशाच्या वा राज्याच्या सुरक्षा विषयक प्रश्नांवर वा आपल्या संविधानीक ऊत्तरदायीत्वावर चकार शब्द न बोलता वा स्वराजधर्माचे पालन न करता, जनतेने प्रश्न विचारण्यास निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरच अश्लाघ्य आरोप करण्यात धन्यता मानत असून आपल्या ‘राजकीय नादानपणाचे व बेजबाबदारपणाचे’ प्रदर्शन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर वा राष्ट्रीय प्रश्नांवर तारे तोडण्यापेक्षा, स्व-अखत्यारीतील व राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करावे, एमएमआरडीच्या हजारो कोटी भ्रष्टाचाराकडे लक्ष केंद्रित करावे तसेच कायदा – सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बीड, परभणी, बदलापूर, पुणे जिल्हा इ मधील खुनांच्या तपास प्रकरणांना गती द्यावी, धुळे मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत मिळालेल्या १॥ कोटी रकमे बाबत बोलावे, पोर्शे कार प्रकरणी, वाढत्या ड्रग्ज व सायबर गुन्हे प्रकरणी अधिक लक्ष केंद्रित करावे व ‘राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री’ नात्याने, जनतेप्रती संविधानीक कर्तव्यांची पुर्तता करावी व अपेक्षित राजधर्माचे पालन करावे.. असे खडे बोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

लाडक्या बहिणींना टप्याटप्याने निधी वाढवणार; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Newsworldmarathi Nashik: राज्यातील लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, उलट टप्प्याटप्याने निधी वाढवण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी मिळून पूर्ण करू, असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत पक्षाला रामराम ठोकला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. त्यांच्या पाठोपाठ इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला नाशिकमध्ये पुन्हा मोठा धक्का बसला आहे. निर्मला गावित या दोन वेळा आमदार राहिल्या असून त्यांचे वडील माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार होते. यामुळे हा प्रवेश उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिंदेसेनेचा हा मजबूत पाऊल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन: “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” या घोषवाक्यानुसार काम करा व महायुतीचा भगवा आगामी निवडणुकांमध्ये फडकवा, असे आवाहनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले. १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांच्यासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.