ऐतिहासिक क्षण:एनडीएतील मुलींची पहिली तुकडी बाहेर पडली -17 मुलींनी पुशअप्स मारून साजरा केला आनंद
Newsworldmarathi Pune: सैन्यदल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातील मोठा क्षण शुक्रवारी अनुभवायला मिळाला. एनडीएतील १४८व्या तुकडीचे ऐतिहासिक दीक्षांत संचलन शुक्रवारी झाले. महिला कडेटची पहिली तुकडी एनडीएतून बाहेर पडली. पहिल्या तुकडीतील १७ मुलींनी दीक्षांत संचलनानंतर पुशअप्स मारून आनंद साजरा केला.
मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांची दीक्षांत संचलनाला प्रमुख उपस्थिती होती. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ ,एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी या वेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या अंतरिम निकालानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवून १९ मुलीची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी १७ कडेट्स नी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर आता या सर्व आधिकारी मुली पुढील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात दाखल होणार आहेत.
Vaishnavi Hagwane Case : हगवणे कुटुंबीयांचं नवीन कांड समोर; फसवणूक अन् धमकीचा आरोप; काय आहे जेसीबी खरेदी प्रकरण?
Newsworldmarathi Pimpri: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आधीच चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांवर आता आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. वैष्णवीच्या पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्यावर ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
प्रशांत येळवंडे (रा. निगोजे, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२२ मध्ये त्यांनी शशांक आणि लता हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी खरेदीचा व्यवहार केला होता. पाच लाख रुपये रोख दिल्यानंतर उर्वरित कर्जासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांनी हप्त्यांद्वारे ६.७० लाख रुपये भरले; मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते न भरता रक्कम स्वतःसाठी वापरली आणि बँकेने जेसीबी जप्त केला. नंतर मशीन परत मिळावी म्हणून पाठपुरावा करत असताना शशांकने पिस्तूल दाखवून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकारामुळे पोलिसांनी फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. यासोबतच वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील तपासही वेग घेत आहे. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी झाली. त्यांच्यावर वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना देखील पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील चॅट, मेसेजेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. आरोपी शशांक व त्याच्या कुटुंबीयांवर आता विविध गंभीर कलमान्वये कारवाई होत असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते करत आहेत. या प्रकारामुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणी आणखी गहण झाल्या आहेत.
धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात
Newsworldmarathi Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले खोटे आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.
मधल्या काळात धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पालसी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही.
चारही बाजूने धनंजय मुंडे यांना खोटे आरोप, मीडिया ट्रायल करून कात्रीत पकडले असताना देखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन धनंजय मुंडे हे या काळात अतिशय शांत होते. अत्यंत संयमी राहत त्यांनी कसलेही प्रत्युत्तर न देता ही परिस्थिती हाताळली.
मात्र या काळात प्रचंड मनस्ताप, ट्रायल, आरोपांच्या फैरी सहन केलेल्या धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्र येथे जाऊन मन:शांती घेण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसापासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यान साधना पूर्ण करून दोन तारखेला पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
याच काळात बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. देशमुख हेही मुंडे कुटुंबाचे अतिशय जवळचे होते. तरीही देशमुख यांच्या अंत्यसंस्कारात धनंजय मुंडे दिसून आले नाहीत.
त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी धनंजय मुंडे कुठे आहेत याबद्दल सुगावा लागू दिला नव्हता मात्र ते नाशिक येथे इगतपुरी येथील केंद्रात विपश्यना घेत असल्याचे आता समोर आले आहे.
वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील सहा महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मधल्या काळात ते उपचारासाठी विदेशात गेल्याची ही माहिती आली होती, या विपशनेनंतर नवीन धनंजय मुंडे पाहायला मिळतात का? याकडे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
Vaishnavi Hagwane Case : शशांक हगवणेचे मामा IPS जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका; केली मोठी कारवाई
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे.
जालिंदर सुपेकर यांनी यापूर्वी देखील आपली बाजू मांडली होती. वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही, असं सुपेकर यांनी यावेळी सांगितले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातील अनेक पुरावे समोर आणले. जालिंदर सुपेकर यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे दमानिया यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे ५०० कोटींच्या भ्रष्टाचारा प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानिया यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या भूमिकेबाबत त्यांच्याविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्शवभूमीवर गृहविभागाने मोठा निर्णय घेत त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे.
गृह विभागाच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?
“विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतरचे महत्वाचे पद आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही, असे संबंधित आदेशात म्हटलं आहे.
तसेच, “कारागृह उप महानिरीक्षक” या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार “विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवणे योग्य नाही. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
Pune Crime News : दीपक मानकरांनंतर आता मुलगाही अडचणीत; समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा झाला आहे. एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण मानकर याच्याविरुद्ध करण्यात आला आहे.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला होता. तो बनावट स्टॅम्प असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनु कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावरून लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडून आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी करण्यात आली.
५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर बनावट करारनामा
त्यावेळी करण मानकर याने त्यांच्या जबाबात सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनु हा करण याला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला. मात्र, पोलिसांनी तपासादरम्यान हे बनावट तयार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांची दिशाभूल
दरम्यान, शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन शहा, करण मानकर, रौनक भरत जैन यांच्यासह इतरांवर बनावट स्टॅम्प पेपर तयार करणे, त्याद्वारे आर्थिक व्यवहार दाखवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे, या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शंतनू कुकडे हा एका परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी आहे. त्याच्याशी मानकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. कुकडेच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटीचे व्यवहार झाले असून, यातील काही रक्कम ही मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात जमा झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट
Newsworldmarathi Pune: शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजाग देखील पार पडला.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्र्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.
श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.
पुण्यात भाजप आमदाराच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न; वारंवार धमक्या, नेमकं काय घडलं?
Newsworldmarathi Pune: पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47) या व्यक्तीला अखेर सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी वारंवार आमदारांच्या घराजवळ येऊन गोंधळ घालत, सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत धमक्या देत होता.
धनकवडी येथील आमदार निवासस्थानाजवळ धुमाळने तीन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला किरकोळ कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या पुनरावृत्तीमुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली होती.
आखेर पोलिसांनी उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या सूचनेनुसार धुमाळ याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी शंकर धुमाळ हा व्यक्ती वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.
सुरुवातीला आमदारांच्यावतीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Aashadhi Vari : यंदा ‘आषाढी वारी’साठी भव्य नियोजन; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना समन्वयाचे आदेश
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या ‘आषाढी वारी’ला यंदा अधिक भव्य आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना परस्पर समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, पावसाचे लवकर आगमन लक्षात घेता वारकऱ्यांसाठी सर्व मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यावर भर देण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध योजना जाहीर केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पालखी संस्थानांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
36 वॉटरप्रूफ मंडपांची तयारी, गरज पडल्यास संख्या वाढवणार
‘विठ्ठल-रखुमाई वारकरी विमा योजना’ यंदाही लागू
वाखरी येथे ‘मॉडेल वारकरी तळ’ आणि संत नामदेव महाराज ओटा पुनर्विकास
पोलिसांची पूर्वतयारी, जिल्हानिहाय समन्वय, वाहतूक आणि अपघात टाळण्याचे निर्देश
महिलांसाठी विशेष सुविधा : हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र स्नानगृहे
आरोग्य, पाणी, वीज आणि स्वच्छतेसाठी विशेष भर
‘निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमासाठी वृक्षारोपण आराखडा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारी हे राज्याचे आध्यात्मिक वैभव असून ती अत्यंत सुव्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन नियोजन करावे.” पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथून येणाऱ्या पालख्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी स्थानिक प्रशासन आणि विभागीय आयुक्तांना स्वतंत्र बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले.
उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “पावसामुळे कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सज्ज आहे. आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि वसतिसुविधांबाबत संपूर्ण यंत्रणा सजग ठेवली आहे.”
वारीतील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन प्रयागराजच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच दर्शन पासची संख्या वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
वारकऱ्यांचा आवाज :
या बैठकीत विविध पालखी संस्थानांच्या प्रमुखांनी आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मांडल्या. प्रशासनाने त्या लक्षपूर्वक ऐकून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पावसाळ्याचे बळी की गैरवस्थापनाचे बळी; प्रशासनाच्या अपयशावर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा संतप्त सवाल
Newsworldmarathi Pune: शहरात अवघ्या दोन दिवसांत झाड कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी पुणे महानगरपालिका आणि प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी प्रशासनाच्या अपयशावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला — “ही पावसाची बळी आहेत का? की महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाची बळी आहेत?”
निलायम टॉकीजसमोर शुभदा सप्रे आणि अलंकार पोलीस ठाण्याजवळ राहुल जोशी या दोघांचा झाड कोसळून मृत्यू झाल्यानंतर शहरात भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात आबनावे यांनी थेट जाब विचारत अनेक जबाबदार व्यक्ती आणि यंत्रणांकडे बोट दाखवलं आहे.
➡️ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री
➡️ पुणे महापालिकेचे आयुक्त
➡️ पालकमंत्री
➡️ शहरातील निवडून आलेले आठ आमदार
➡️ उपमुख्यमंत्री, जे नगरविकास खातेही सांभाळतात
“पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती झाडांची छाटणी, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्थापन या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष झालं आहे. यामुळेच पुणेकरांच्या जीवितावर घाला येतो आहे,” असा आरोप आबनावे यांनी केला.
आंबील ओढा: विस्मरणात गेलेली पुराची जखम
२०१९ मध्ये आंबील ओढ्यात आलेल्या पुरात २६ नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर २०० कोटी रुपयांच्या पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले. मात्र सहा वर्षांनंतरही सीमा भिंती, नाल्यांचे विस्तारीकरण, अतिक्रमण हटवणे किंवा कल्वर्ट उंचीकरण यातील कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही.
युवक काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा आहे
२०० कोटी निधीचा ठावठिकाणा काय?
➡️ तो निधी केंद्राकडून राज्याकडे आला का?
➡️ राज्य सरकारने तो महापालिकेला दिला का?
➡️ की तो कुठेतरी वळवण्यात आला?
“पुणेकरांचा हक्काचा निधी हवेत विरला आहे का? की तो केवळ घोषणाबाजीपुरताच होता?” — असा गंभीर सवाल आबनावे यांनी केला.
तीव्र आंदोलनाचा इशारा
युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे पावसामुळे जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर असेल. उत्तर मिळाले नाही, तर युवक काँग्रेस तात्काळ रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भीमनगर वासीयांची फसवणूक होऊ देऊ नका; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश
Newsworldmarathi Pune: एरंडवणे येथील भीम नगर झोपडपट्टी चे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी असे आदेश उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना दिले आहेत.
भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टी धारकांनी या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे. या संदर्भात त्यांनी नुकतेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला होता. या बिऱ्हाड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील व झोपडपट्टी धारकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कोणत्याही परिस्थितीत झोपडपट्टी धारकांची फसवणूक होणार नाही, याबाबत आपण सर्व ती काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी झोपडपट्टी धारकांना दिले. तसेच झोपडपट्टी धारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झोपडपट्टी धारकांना अधिक लाभ देण्यात यावा अथवा फसवणूक झाली असल्यास संपूर्ण योजना रद्द करावी असे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी धारकांच्या हिताचा विचार मांडल्याने आंदोलनात बळकटी प्राप्त झाली असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांना फसवणूक करण्याचा इरादा ठेवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चाप लागणार असल्याची भावना यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, स्थानिक रहिवासी देविदास ओव्हाळ ,प्रभु सूनगर, जावेद शेख दादू गायकवाड व सुनील डमरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात शुक्रवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल असे देखील ठरवण्यात आले आहे.

