जेवणाची भ्रांत असल्याने मातृत्वही नकोसे; बीडमध्ये 843 लाडक्या बहिणींची काढली गर्भपिशवी..
बीड: बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भात केलेल्या आरोग्य तपासणी मधून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकूण ७८ हजार महिला ऊसतोड कामगारांपैकी ८४३ लाडक्या बहिणींनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचे समोर आले आहे. यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच १५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात मोळी आणि कोयता घेऊन काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्भपिशवी काढण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ऊसतोड मजूर हे २०२४ मध्ये दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झाले होते. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे याचा अहवाल तयार झाला आहे. या अहवालात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.
लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक ॲसिडची कमतरता, थॅलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्त्राव झाल्यास रक्तक्षय होतो. असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या ३ हजार ४१५ एवढी आहे. यातील ७३ महिलांना तीव्र रक्तक्षय आहे. या सर्व महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.
कोरोनाचा आणखी एक बळी; कोल्हापुरात ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू, राज्यात मृतांची संख्या ४ वर
Newsworldmarathi kolhapur : काही काळ थांबलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाच कोल्हापुरातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. पाचगाव येथील रायगड कॉलनीतील ७५ वर्षीय महिलेचा रविवारी सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. २०२५ मध्ये राज्यातील कोरोनामुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे.
संबंधित महिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि श्वसनविकाराने त्रस्त होत्या. त्यांना गेल्या चार दिवसांपासून सीपीआर रुग्णालयाच्या कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पीपीई किटमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
राज्यात वाढते रुग्ण, पुण्यात सर्वाधिक बाधित
राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत ६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यात सर्वाधिक २५ रुग्ण पुणे महापालिकेतील आहेत. मुंबईत २२, ठाण्यात ९, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापुरात २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण सापडला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४८५ झाली आहे.
देशपातळीवरही वाढती चिंता
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय रुग्णसंख्या ३७०० च्या पुढे गेली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १४०० रुग्ण असून, दिल्लीत ४३६ आणि महाराष्ट्रात ४८५ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये अनुक्रमे ६४, १८ आणि ६१ नवीन रुग्णांची नोंद झाली.
सतर्कतेचा इशारा
आरोग्य विभागाने नागरिकांना मास्कचा वापर, स्वच्छता आणि लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वयोवृद्ध, श्वसन विकारग्रस्त व अन्य दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
साखर संकुलात काका-पुतण्यांची पुन्हा बैठक; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण
Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकी होण्याच्या शक्यतेने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रविवार, १ जून रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसले. साखर संकुल हे या भेटींचे प्रमुख केंद्र ठरत असून, गेल्या दोन महिन्यांत काका-पुतण्यांची ही दुसरी बैठक आहे.
या बैठकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीचा अधिकृत उद्देश कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर कसा करता येईल, यावर चर्चा करणे होता. मात्र दोघांच्या सततच्या भेटींमुळे ‘दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?’ हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शरद पवार गटाला अजित पवारांचा राजकीय डाव?
दुसरीकडे, अजित पवार यांनी शरद पवार गटाला आणखी एक राजकीय झटका देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. परभणी जिल्ह्यातील शरद पवार गटातील एक माजी आमदार लवकरच अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. संबंधित माजी आमदाराने नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, येत्या ८ जून रोजी पाथरी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता, हा प्रवेश शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का ठरू शकतो. राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलू लागली आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संबंध पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांची राज्य युवा धोरण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
Newsworldmarathi Pune: राज्य सरकारने पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांची महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी नियुक्ती केली आहे. डॉ. भोई हे गेल्या अनेक वर्षांपासून भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. ही समिती राज्याचे नवे युवा धोरण ठरविणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई हे पुण्यातील प्रसिद्ध कान नाक घसा (ईएनटी) तज्ज्ञ आहेत. सध्या ते भोई प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. शिवाय ते राष्ट्रीय युवा पुरस्काराचे मानकरी आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील युवकांसाठी विविध प्रकारचे रचनात्मक आणि विधायक उपक्रम राबविण्यात येतात. हे उपक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया डॉ. भोई यांनी या निवडीनंतर बोलताना दिली. याशिवाय अमली पदार्थ, गुन्हेगारी, सायबर क्राईम, फेसबुक क्राईम अशा विविध गोष्टींच्याविरोधात लढण्यासाठी मी या समितीच्या माध्यमातून कार्यरत राहीन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा खात्याने राज्याचे सुधारीत युवा धोरण तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी शिफारशी करणार आहे. याआधी राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने “महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२ घोषित केले आहे. या युवा धोरणास १० वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या धोरणाचा आढावा घेऊन महाराष्ट्र राज्याचे सुधारीत युवा धोरण तयार करण्यासाठी ही नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये आमदार संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय,
सत्यजित तांबे आदींसह २१ सदस्यांचा समावेश आहे.
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन नवीन शहराध्यक्ष; सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांची नियुक्ती
Newsworldmarathi Pune: पुणे शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी नगरसेवक सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे यांना संधी देण्यात आली आहे.
शहराध्यक्ष म्हणून सुनील टिंगरे यांच्याकडे वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या भागांची जबाबदारी असणार आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला आणि कोथरूड विभाग सोपवण्यात आला आहे.
यापूर्वीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जवळपास महिनाभर रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने आता दोन प्रमुख नेत्यांची नेमणूक करत संघटनात्मक बळ वाढवले आहे.
जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी; डॉ. अजय सहाय
Newsworldmarathi Pune: “देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवर सातत्याने उंचावत आहे. तसेच राष्ट्रीय स्तराप्रमाणे जिल्हास्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या निर्यातीसाठी विविध योजना आहेत. भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत”, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ-फिओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी केले. या पार्श्वभूमीवर उद्योगाभिमुख व विविध निर्यातपूरक योजनांच्या मदतीने निर्यातवाढीच्या संधींचा निर्यातदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (एफआयईओ), मिटकॉन पुणे व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे (निर्यात परिषद) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘एफआयईओ’चे महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी वाढते निर्यात अर्थकारण, ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यात, निर्यात क्षेत्रातील जोखीम तसेच निर्यातीच्या संधी, योजना अशा मुद्यांवर विवेचन केले.
नगर रस्त्यावरील हॉटेल नोवोटेल येथे झालेल्या कार्यक्रमात फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि मिटकाॅन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या व कराराचे आदानप्रदान करण्यात आले. मिटकॉनचे चेअरमन अजय अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे, चंद्रशेखर भोसले, डॉ. गणेश खामगळ, संकेत लोंढे, ‘डीजीएफटी’चे अमित शर्मा, रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन विनिमय विभागाच्या महासंचालक लता राधाकृष्णन, ईसीजीसीच्या महासंचालक अर्पिता सेन, इंडिया पोस्ट पुणे विभागाचे संचालक अभिजीत बनसोडे, कॅनरा बॅंकेच्या ट्रेझरी विभागाचे उपसंचालक केजेएस नाईक, मिटकाॅनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विदेशी व्यापार महासंचालनालय, भारतीय पोस्ट, कॅनरा बँक, मिटकॉन व एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे २०० हून अधिक निर्यातदार, उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील छोटे उद्योग व शेतकर्यांच्या मालाची निर्यात वाढण्यासाठी डाक घर निर्यात केंद्र उभारण्यात येत असल्याचे डॉ. अजय सहाय यांनी सांगितले.
‘श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ’ नाव देण्याची मच्छिंद्र चव्हाण यांची मागणी
Newsworldmarathi Pune: “विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नाथपंथी समाजासाठी ‘वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ’ अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला दिलेले ‘परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ’ हे नाव त्वरित बदलून त्याचे नाव ‘श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ’ असे करावे,” अशी मागणी नाथपंथी समाजाचे प्रतिनिधी व निवृत्त पोलीस उप-अधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी केली.
अखिल नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, नाथबाबा, गोंधळी, बहरूपी, भारूडी या भिक्षुक, भटक्या जाती-जमातीच्या राज्यभरातील समाजबांधवांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला. मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप, महादेव शिंदे, डॉ. जयाजी नाथसाहेब, नारायण शिंदे, भालचंद्र सावंत यांच्यासह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नाथपंथी समाजबांधव उपस्थित होते.
मच्छिंद्र चव्हाण म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले. याचे स्वागत करीत संपूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी समाज बांधवानी महायुतीला भरभरून मतदान केले. सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाने हे महामंडळ स्थापनही केले. मात्र, काही लोकांनी खोटी माहिती देऊन या महामंडळाला ‘परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ’ असे नाव दिले.
गंगानाथ महाराज हे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे वडील असून, त्यांचे समाजासाठी कोणतेही योगदान नाही. शिवाय, सदरचे निवृत्त पोलीस अधिकारी हे महामंडळ स्वतःची मालमत्ता असल्याचे भासवून समाजामध्ये दादागिरी करू लागले आहेत. परिणामी, नाथपंथी समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. या महामंडळ सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी, चर्चा व वादविवाद समाजामध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहेत. याच पार्शवभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण ठरली.”
मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Newsworldmarathi Mumbai: बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले याच्याविरोधात दोन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
कासले याच्यावर समाजात तेढ निर्माण करणे, तसेच विविध राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. बीडसह मुंबईत देखील त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या वक्तव्यांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीमध्ये विशेष मोहिम राबवून त्याला अटक केली.
अटक केल्यानंतर कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे. या प्रकरणामुळे एकेकाळी पोलीस खात्यात अधिकारी म्हणून काम केलेल्या कासले याच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा वेग वाढलेला दिसत आहे.
सध्या कासले याच्याविरोधात आणखी काही गंभीर प्रकरणांची चौकशी सुरू असून, पोलिस आणि सायबर गुन्हे शाखा त्याच्या ऑनलाइन कृतींचा सखोल तपास करत आहेत.
Manikrao Kokate: ‘कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
Newsworldmarathi Mumbai: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोकाटे यांनी कृषी खात्याबाबत नाराजी व्यक्त करत “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकीच आहे, आणि मला हे खातं दिलंय” असं वक्तव्य केलं.
हे विधान केवळ त्यांची नाराजी दाखवून गेलं नाही, तर राज्याच्या कृषी धोरणांवर आणि मंत्रिमंडळातील भूमिका वाटपावरही प्रश्न निर्माण करतं. अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे आयोजित गुणवंत शेतकरी पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यापूर्वीही कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीत “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या “ओसाड गावाची पाटीलकी” या विधानावरूनही नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्य सरकारचं बचावात्मक भूमिकेत स्पष्टीकरण
कोकाटे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “राज्यात बऱ्याच भागांत पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी फारसं पीक उरलेलं नाही. मात्र, फळबागांचे आणि कांद्याचे नुकसान लक्षात घेता त्यांचे पंचनामे करण्यात येतील. जेथे खरंच नुकसान झालं आहे तिथेच पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.”
त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांचे कौतुक करत सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, तसेच मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत.”
शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शिक्षणाचा सल्ला
कार्यक्रमात कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेती आधारित व्यवसायात करिअर घडवावे, असा सल्लाही दिला. मात्र, शेतकऱ्यांच्या वेदनांवर भाष्य करताना दिलेली विधानं सध्या त्यांच्या विरोधात जात असून, अशा संवेदी काळात अधिक जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत आहे.
अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर आज संध्याकाळी बारामतीत येतोय, मला अडवून दाखवा !! लक्ष्मण हाके यांचे थेट चॅलेंज..
बारामती : सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. लक्ष्मण हाके पंढरपूर येथे असताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मी रोज दोन ते तीन जिल्ह्याची बॉर्डर पार करतोय. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय.
मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे. नुकताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थखात्यावरून निशाणा साधला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून हाकेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यामुळे वाद वाढत गेला.
राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी हाके हे देशी दारुचे ब्रँड अॅम्बेसिडर आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका केली. तर त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीला थेट खुले आव्हान दिले आहे. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय.
मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे. दरम्यान, सुरज चव्हाण प्रश्नावर बोला आम्ही फक्त निधी मागतोय तुम्ही काय वैयक्तिक टीका करताय, असे हाके म्हणाले. अजितदादा असली पिल्लावळ माझ्यावर बोलायला सोडताय, तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली.

