Newsworldmarathi Jalgao : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय-२६) असं जीवनयात्रा संपविलेल्या विवाहितेचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील किनोद येथे गुरुवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, गळफास घेऊन तिने जीवन संपविलेले नसून विवाहितेचा सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे विवाहितेने जीवन संपवलं की हत्या करण्यात आली? यावरून संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री कोळी या जळगाव तालुक्यातील किनोद याठिकाणी पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह राहत होत्या. पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर गायत्री शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. दरम्यान, गुरुवारी (दि.१) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
गायत्रीने गळफास घेतल्याचे समजताच तिचे पती, सासू आणि नणंद फरार झाले होते. गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती गायत्रीच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे.
नातेवाईकांचा आरोप काय?
गायत्रीचा भाऊ सागर कोळी याने सांगितले की, गायत्रीला मासिक पाळी आली असताना तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून घरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. घरात घडलेल्या वादानंतर तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. मात्र, वडील बाहेरगावी गेले होते. असं असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करत गायत्रीच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले, असा आरोप गायत्रीच्या भावाने केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


Recent Comments