Newsworldmarathi Mumbai : राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान पटकावलेल्या अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्याची इच्छा आता काही लपून राहिलेली नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जाहीरपणे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग अजून जुळून आला नसल्याचे म्हणत खंत व्यक्त केली.
तसेच मुख्यमंत्रीपदाचा योग कधी ना कधी जुळून येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या दिवसांपासून राष्ट्रवादीच्या वतीने वरळीतील जांबोरी मैदानावर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देश पातळीवर महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी भविष्यात महाराष्ट्राला एखादी महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, या केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. आपल्याला सगळ्यांना वाटत असते पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय, असे म्हणत पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली. तसेच हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या त्याप्रमाणे महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग जुळून येईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.


Recent Comments