Newsworldmarathi Solapur: सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एका विहिरीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १ मे रोजी घडली आहे. सलग १० तास शोधकार्य करून दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. दोघांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. भीमरत्न राजगुरू (वय-१४) आणि नैतिक माने (वय-१५, दोघेही रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरामणी गावातील शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी काही शाळेतील मुलं पोहायला गेली होती. साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुलं पोहत असताना, विहिरीचा कठडा घसरला आणि त्यांच्या अंगावर पडला. भीमरत्न आणि नैतिक ही दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली. बाकीची मुलं कशीबशी बाहेर आली. वाचलेल्या मुलांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत माहिती जाणून घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्याठिकाणी तळ ठोकून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम करून दोन मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेने बोरामणी गावात शोककळा पसरली आहे.


Recent Comments