Newsworldmarathi Pune : राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच कडक उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 22 मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आजपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या या अंदाजामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.


Recent Comments