Newsworldmarathi Mumbai: Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. मात्र, आता भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली आहे.
कोणतं खात मिळणार?
बीडमधील प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर रिक्त झालेलं खातं कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आता हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Recent Comments