Newsworldmarathi Nashik : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात नुकसानीची पाहणी करताना त्यांनी विचारले, “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?”
या विधानामुळे शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “ज्या शेतात काहीच नाही, त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत.”
कोकाटे यांच्या या विधानामुळे विरोधकांनीही टीका केली आहे. कृषीमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत आणि भरपाई देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय म्हणाले कोकाटे ?
कृषीमंत्र्यांना नुकसानीसंदर्भात विचारले असता, नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे शेतात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. शेतात जी काही पिके असतील त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असेही मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.
Recent Comments