Newsworldmarathi Raigad: : किल्ले रायगडावर यंदाही ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. या ऐतिहासिक दिवशी राज्यभरातून सुमारे दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर तयारीत व्यस्त असून, ५ हजार किलो तांदूळ, १ लाख पाण्याच्या बाटल्या, आणि १५ खाटांचे रुग्णालय अशा सुविधांची तयारी करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे ६ जून आणि तिथीनुसार ९ जून रोजी साजरा होणार आहे. ६ जून रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात दीड लाखांहून अधिक शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ९ जूनला होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या दिवशी ५० हजार शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत.
प्रशासनाची तयारी ठोस
१५ खाटांचे रुग्णालय गडावर कार्यान्वित
५ बेडचा ICU विभाग पाचाड येथे
१५ तात्पुरते दवाखाने पायरी मार्गावर, गडावर आणखी ४ दवाखाने
५ हजार किलो तांदूळ आणि अन्न शिजवण्यासाठी आवश्यक साहित्य
१ लाख पाण्याच्या बाटल्या, तसेच ५० पाण्याच्या टाक्या (५०० लिटरच्या)
५ जलशुद्धीकरण यंत्र
१५० पोर्टेबल स्वच्छतागृहे गडावर आणि पाचाड येथे प्रत्येकी
१७ उद्घोषणा केंद्रे, २२ मंडप, ७ एलईडी स्क्रीन
गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था
प्रशासनाने १७०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल, आणि दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहेत. शिवभक्तांची वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी १२ वाहनतळ, आणि १०० एसटी बसेस पाचाड ते पायरी मार्गापर्यंत चालवण्यात येणार आहेत.
गर्दी नियंत्रण प्रशासनासाठी मोठे आव्हान
गेल्या काही महिन्यांत देशात घडलेल्या गर्दीतील दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेता, रायगडवरील लाखो शिवभक्तांची व्यवस्था ही प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. मात्र, रायगड प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून सुरक्षितता आणि सुविधा यांचा मेळ साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
Recent Comments