Newsworldmarathi Mumbai: कामाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान धावणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल आणि लखनऊहून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या धडकेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ८ ते १० प्रवासी रेल्वे ट्रॅकवर खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
ही धक्कादायक घटना आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. लोकल गाडीत प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी दरवाज्यात लटकत उभे होते. याचवेळी समोरून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला लोकलने घासले, आणि त्यामुळे दोन्ही गाड्यांचा मोठा आवाज झाला. या धडकेमुळे दरवाजात उभे असलेले काही प्रवासी थेट ट्रॅकवर फेकले गेले.
अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने त्वरित मदतकार्य सुरू केले असून, रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पूर्ण तपास सुरू केला आहे.
गर्दी, वेग आणि निष्काळजीपणा?
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास सुरु असला तरी सकाळची गर्दी आणि दोन्ही गाड्यांचा वेग यामुळे अपघाताचा परिणाम अधिक भयावह झाला. अनेक प्रवासी दरवाज्यांतून लटकत प्रवास करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
रेल्वेकडून अपात्कालीन उपाययोजना
रेल्वे प्रशासनाने घटनेनंतर लगेच आपत्कालीन सेवा कार्यरत केली असून, ट्रॅकवरील वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. जखमी प्रवाशांवर उपचार सुरु असून मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर पोलिस व रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.


Recent Comments