Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. पवारांनी भारताच्या शेजारी राष्ट्रांशी असलेल्या संबंधांवर आणि देशातील आतंरिक सुरक्षा परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, “देशाच्या नेतृत्वाने सुसंवादाची स्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नच केलेले नाहीत. भारताच्या शेजारी देशांशी चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका सध्या आपले संबंध तणावपूर्ण आहेत.
एक काळ होता जेव्हा भारत जागतिक व्यासपीठावर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून ओळखला जात होता. आज मात्र, आपल्याला सर्वत्र तणाव आणि संवादाची उणीव जाणवते. ही जबाबदारी देशाच्या नेतृत्वावर आहे, आणि त्याची किंमत आपल्याला देश म्हणून चुकवावी लागते.”
जवळचा अनुभव आणि उदाहरणं देत टीका
शरद पवारांनी आपल्या भाषणात आपला अनुभव शेअर करत बांग्लादेशाशी असलेल्या वैयक्तिक संबंधांची आठवणही करून दिली. “बांग्लादेशसाठी भारताने मोठा त्याग केला, तरी आज त्या देशाशी सुसंवाद नाही. श्रीलंकेवर तर थेट चीनचा प्रभाव वाढत चालला आहे,” असं ते म्हणाले.
पहल्गाम प्रकरणावर भूमिका स्पष्ट
शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य करताना, पहल्गाम घटनेच्या वेळी विरोधकांनी केंद्रावर टीका करण्याऐवजी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. “देशावर हल्ला झाला तर आपण एकसंघ राहायला हवं. परंतु ही परिस्थिती कायमस्वरूपी असू नये यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत,” असा सल्लाही त्यांनी दिला.
पक्षातील कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक
कार्यकर्त्यांचं कौतुक करत पवार म्हणाले, “तुमच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचा खरा आधार आहेत. तुम्ही विचाराने एकसंध राहा, सत्ता आपोआप तुमच्या मागे येईल.” त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला.
फुटीवरून स्पष्ट भूमिका
शिवसेना आणि इतर पक्षांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झालेल्या फूटीनंतर पवारांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत म्हटलं, “फुटीची चिंता करू नका. कोण गेले याची चिंता न करता, जे राहिले आहेत त्यांनीच पक्षाचा विचार पुढे न्यावा. आपण जनतेच्या प्रश्नांसोबत बांधिलकी ठेवल्यास कोणतीही अडचण येणार नाही.”


Recent Comments