Newsworldmarathi Mumbai: Pune Maval bridge collapse : पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत.
यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीपात्रात उतरले आहे. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह तीव्र झाल्याने बचावकार्याला मोठे आव्हान आहे. या दुर्घटनेवरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधत पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र डागलं. अजित पवार या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का? असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात नवीन सरकार आल्यापासून सातत्याने अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरु आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या. मावळमधल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या अपघातात नक्की किती लोक मृत्यू पावले आहेत याचा खरा आकडा समोर आलेला नाही. कित्येक लोक वाहून गेले, असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांना गर्व आणि अहंकार
पुढे बोलताना म्हणाले, आपण विकासाच्या गोष्टी करता. त्या जिल्ह्याचे अजित पवार हे पालकमंत्री आहेत. त्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार आहे. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहात का? एक दोन कोटींचा पूल पालकमंत्री उभा करु शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामात झोपलेले असतात. मोठ्या बिल्डरांची ठेकेदारांची कामे यात ते जागे असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.
तसेच या पुलासाठी कागदावर पैसे मंजूर झाल्याचे म्हटलं जातंय. मग पूल का नाही झाला? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मते विकत घ्यायला, आमदार खासदार विकत घ्यायला, लाडक्या बहिणींची पैसे विकत घ्यायला पैसे मिळतात. पण लोकांचे बळी गेलेला पूल दुरुस्त करायला पैसे नाहीत, असा संतप्त सवल राऊत यांनी केला.


Recent Comments