Newsworldmarathi Pune: हिंजवडीत रविवारी (29 जून) सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने आयटी कंपन्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. महावितरण विभागाने सांगितले की, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागणार आहेत.
महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस या अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे हा विस्कळीत वीजपुरवठा झाला. या बिघाडामुळे महावितरणच्या एमआयडीसी व आयटी पार्क भागातील ९१ उच्चदाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांवर परिणाम झाला आहे.
महावितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल *६३ मेगावॅटहून अधिक भार इतरत्र मार्गाने वळविण्याचे काम सुरु* असून, *हिंजवडी एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्क, डॉहलर कंपनी परिसर आणि विप्रो सर्कलच्या* आसपासच्या भागांतील वीजग्राहक यामुळे प्रभावित झाले आहेत.
या बिघाडामुळे अनेक मोठ्या आयटी कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले असून, अनेकांना वर्क फ्रॉम होम पर्यायाचा अवलंब करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
पुढील काही दिवस वीजपुरवठा असाच विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था करून काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महावितरण आणि महापारेषण विभागाचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.
Recent Comments