Newsworldmarathi Mumbai: शेतकरी कर्जमाफी आणि इतर विविध मागण्यांवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राज्य सरकारने ३० जून २ पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ३०) सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सहा महिन्यांच्या आत अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवेल. एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत म्हणजे ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.”
या बैठकीत बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, बच्चू कडू यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, “आम्हाला कर्जमाफीसंदर्भात निश्चित तारीख हवी होती, ती आता मिळाली आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित केले असून समितीच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांदरम्यान झालेली ही बैठक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली असून आगामी काही महिन्यांत कर्जमाफीबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Recent Comments