Newaworldmarathi Mumbai; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना उद्देशून एक अत्यंत भावनिक पत्र लिहिले आहे. विमान अपघातात झालेल्या अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या मनात ताजी आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
पत्रात त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली आहे. अनेकांसाठी अमोल मिटकरी हे कदाचित वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असेल, मात्र एका छोट्या समूहातून आलेल्या कार्यकर्त्याला अजित दादांनीच आपलेसे केले, असे ते म्हणतात. आयुष्यात वडिलांनंतर जर कोणी खऱ्या अर्थाने माया, जिव्हाळा आणि आधार दिला असेल तर ते फक्त दादांनीच, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. एक काळ असा होता की समाज, नातेवाईक आणि अगदी स्वतःच्या कुटुंबीयांनीही त्यांना दूर लोटले होते. अशा कठीण काळात दादांनीच त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उभारी दिली.
राजकीय प्रवासात चुका झाल्या, टीका झाली, तरीही दादांनी कधी साथ सोडली नाही. मोठ्या भावाच्या मायेने त्यांनी चुका समजावून सांगितल्या आणि पुढे जाण्याची ताकद दिली. वाढदिवस असो किंवा दुःखाचा प्रसंग, दादांचा फोन हा नेहमी आधार देणारा असायचा, असे मिटकरी लिहितात.
पत्राच्या शेवटी त्यांनी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाने दादांना हिरावून घेतल्याची खंत व्यक्त करत देवावरचा रागही व्यक्त केला. “दादा, तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या प्रेमात पडलो; पण त्यानेच तुम्हाला दूर नेले,” असे म्हणत ‘लव्ह यू दादा’ या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



Recent Comments