Newsworldmarathi pune: मार्च अखेर आणि एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना बसला असून सुमारे २ लाख ४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अंदाजे ५ लाख १२ हजार एकर शेतीवर परिणाम झाला असून जवळपास ४ लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि मदत वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आणि त्वरीत मदत जमा करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.
“या आपत्तीत काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.”
— रोहन सुरवसे पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे.



Recent Comments