Newsworldmarathi Pune: देशातील युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भारत सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विविध स्तरांवर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भोई प्रतिष्ठान पुणे आणि जाधवर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी राज्यव्यापी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या आकर्षणाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, पोलीस, प्रशासन, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तसेच देशप्रेमी नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार आहेत.
ही केवळ अल्पकालीन मोहीम नसून समाजात दीर्घकालीन जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढील अनेक वर्षे सातत्याने राबविण्यात येणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ राज्यव्यापी स्पर्धांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्याच्या विळख्यात अडकलेली तरुणाई या विषयावर घोषवाक्य (स्लोगन), निबंध, चित्रकला आणि रील (Reels) निर्मिती या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा विनामूल्य असून सहभागी होण्याची अंतिम मुदत २१ जून २०२६ आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या प्रमुख श्रीमती ज्योतीप्रिया सिंग यांनी सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ २६ जून २०२६ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अटी, नियम व नोंदणीसाठी इच्छुकांनी आयोजकांनी दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करावा तसेच अधिक माहितीसाठी संबंधित समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments