Newsworldmarathi Pune : भोर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले संग्राम थोपटे मंगळवारी (दि. २२) मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत थोपटे कमळ हातात घेणार आहेत.
Oplus_131072
दरम्यान, थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला असून, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लिहिले आहे.
पुण्यातील भोर तालुक्यात गेली ४० वर्षे वर्चस्व राखलेल्या थोपटे कुटुंबीयांच्या राजकारणाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घरघर लागली. संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. अखेर भविष्याची राजकीय दिशा व गरज ओळखून संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार, मंगळवार, २२ एप्रिल रोजी प्रदेश भाजप कार्यालयात थोपटे यांचा मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होत आहे.
तालुक्यातील गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बाहेरच्या लोकांना पक्षात घेतले जात आहे. ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते आता आपल्यासोबत येत आहेत. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नेत्यांनी वरिष्ठांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
नेत्यांच्या पायाशी लुडबूड करणारे लोक पुढे निघून जातात आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहतो? हे असे का याचे उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये झिपलाईनवरुन पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 18 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी घडली. तरल अरुण अटपळकर (वय 28) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे अटपळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्कमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत.
अटपळकर कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्कमध्ये गेले होते. तिथे झिपलाईन करताना तरलचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरलचे काका नंदकिशोर श्रीपती अटपळकर (वय 50) यांनी सांगितले की, उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कुटुंबातील 12 सदस्य राजगड वॉटर पार्कमध्ये मजा करण्यासाठी गेले होते. प्रत्येकी 1200 रुपये प्रवेश शुल्क भरले. दिवसभर खेळ खेळले, जेवण केले आणि सायंकाळी झिपलाईन करण्याचं ठरलं. तरल उत्साहाने झिपलाईन करायला गेली, पण अचानक ती 25-30 फूट उंचीवरुन खाली सिमेंटच्या ब्लॉकवर पडली.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, “आमचे पथक राजगड वॉटर पार्कमधील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच अहवाल आल्यानंतर कारवाई सुरू करू. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सध्या बंद ठेवण्यात आले आहे. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपायचं काही नाव घेत नसताना माजलगाव शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी भाजपच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा निर्घृण हत्या, नंतर चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या तर आता बिल देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे. महादेव गायकवाड (वय 54 वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव पुन्हा एकदा निर्घृण हत्येच्या घटनेने हादरले आहे. हॉटेल (ढाबा) मालक व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (20 एप्रिल) रात्री उघडकीस आली. यात गंभीर जखमी असलेल्या बाप-लेकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.
माजलगाव शहरापासून 4 किलोमिटर अंतरावर नागडगाव पाटी कॉर्नरवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड यांची एका टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. महादेव गायकवाड (रा. मंजरथ रोड, माजलगाव) हे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे बसले होते. तितक्यात माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एका टोळक्याने बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्याशी वाद घातला. वाद वाढला असता टोळक्याने महादेव गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात महादेव गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. टोळक्याने महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष याच्यावरही प्राणघातक हल्ला केला.
Newsworldmarathi pune : सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत असून, त्याचा परिणाम सरळपणे सोन्याच्या दरांवर होत आहे. परिणामी, आज सोन्याचा दर तब्बल 1,01,400 रुपये प्रति तोळा या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आधीच सोन्याला मागणी (Gold Rate Increase) वाढलेली असताना आता दरवाढीमुळे सामान्य खरेदीदारांचे बजेट ढासळण्याची शक्यता आहे. केवळ शोभेची वस्तू म्हणून नव्हे, तर गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या टेन्शनमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
चीन-अमेरिका दरम्यान वाढणाऱ्या तणावामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीत अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक मंदी येण्याची शक्यता गुंतवणूकदारांना सतावत असून, अशा परिस्थितीत पारंपरिक व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे झुकाव वाढला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी (Gold Rate) वाढत आहे आणि दरही झपाट्याने वर जात आहेत.
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांतही सोन्याचे दर चढे राहू शकतात. त्यामुळे अधिक परतावा मिळवण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. हीच गोष्ट आता प्रत्यक्षात उतरतेय, असंही स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ असू शकतो.
Newsworldmarathi Pune : पुण्यातील सर्वात विश्वासार्थ जेईई कोचिंग इन्स्टिट्यूट असलेल्या बाकलीवाल ट्यूटोरियल्सचा (BT) २० वर्षांचा यशस्वी प्रवास पुन्हा एकदा सार्थ झाला आहे. इयत्ता ८वी पासून बाकलीवाल विद्यार्थी असलेल्या आयुष रवी चौधरी यांने परिपूर्ण १०० पर्सेन्टाइल आणि ऑल इंडिया रँक (AIR 7) मिळवून महाराष्ट्रात प्रथम स्थान पटकावले आहे. पुणे शहरात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोहन चेलेकर यानेही AIR ६१ मिळवून बाकलीवालच्या यशोगाथेला भर घातली आहे.
एकूण 8 विद्यार्थ्यांनी कॉमन रँक लिस्टमध्ये टॉप ५०० मध्ये स्थान मिळवले आहे.
बाकलीवालच्या विद्यार्थ्यांची संख्या टॉप १०००/१०००० एकूण यादीत इतर कोणत्याही संस्थेपेक्षा लक्षणीय फरकाने अधिक आहे, हे महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेच्या सर्वोत्तम कामगिरीचे द्योतक आहे. ही यशस्वी कहाणी इथेच थांबत नाही. बाकलीवाल ट्यूटोरियल्सच्या 15 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉप १००० मध्ये स्थान मिळवले असून, अनेकांनी १८ मे २०२५ रोजी होणाऱ्या जेईई ऍडव्हान्स २०२५ साठी कटऑफ पार केला आहे. हे यश संस्थेच्या संकल्पनात्मक समज, समस्या सोडवण्याच्या क्षमता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक सहनशक्तीवर असलेल्या अविचल लक्ष्याचे प्रतिबिंब आहे.
या निकालाबाबत बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे संचालक वैभव बाकलीवाल म्हणाले, “मी नम्रतेने भारावून गेलो आहे. केवळ महाराष्ट्रातील पहिला क्रमांक आणि इतर उच्च रँकच नव्हे तर टॉप ५००० एकूण यादीतील विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षांपेक्षा लक्षणीय वाढली आहे. वर्षानुवर्षे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, संपूर्ण टीमसाठी हा क्षण खरोखर समाधानाचा आहे. जेईई ऍडव्हान्स २०२५ साठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा.”सात हा बाकलीवाल ट्यूटोरियलचा लकी नंबर असावा! चौथ्यांदा, बाकलीवाल ट्यूटोरियल्सच्या विद्यार्थ्याने (जेईई मेन आणि ऍडव्हान्स मिळून) मध्ये AIR 7 मिळवला आहे. याआधीही बाकलीवालच्या विद्यार्थ्यांनी AIR 2, 3 आणि 3 अशा उत्कृष्ट रँक मिळवून संस्थेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेची साक्ष दिली आहे. टॉपर आयुषचा भाऊ अक्षत हा देखील बाकलीवाल ट्यूटोरियलचा विद्यार्थी होता आणि त्याने आयआयटीकेमधून पदवी प्राप्त केली आहे.
जेईई मेन २०२५ मधील ही यशस्वी कामगिरी बाकलीवालच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रतिष्ठेला आणखी बळकटी देते. वर्षानुवर्षे जेईई मेन आणि जेईई ऍडव्हान्समध्ये सातत्याने उच्च रँक देणाऱ्या या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत पात्र शिक्षक मंडळ, सुविचारित अभ्यास साहित्य, नियमित चाचण्या, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण आणि एकांतिक शंका निरसन सत्रांसारखी सोय मिळते.
Newsworldmarathi shirdi: ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईचरणी अर्पण केलेल्या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असून मुकुट अर्पण करणाऱ्या भाविकांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. साईबाबांच्या दानपेटीत सोने, रोकड, जड जवाहीर दान केले जाते. शनिवारी (दि. १९) आंध्र प्रदेश मधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.
सुंदर कोरीव कलाकुसर केलेला हा सुवर्ण मुकुट आकर्षक आहे. मुकुटाच्या मधोमध ‘ओम’ लिहिलेले असून त्यावरती हिरवा तर खाली लाल रंगाची टिकली आहे. विविध कलात्मक पद्धतीने बारीकसारीक कोरीव काम सुवर्ण मुकुटावर केल्याचे दिसत आहे.
Newsworldmarathi Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी केलेल्या दुचाकीच्या वादातून कुख्यात गुन्हेगाराने सतरा वर्षांच्या मुलासह त्याच्या मेहुण्याची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बायजीपुरा भागातील गंजे शाहिदा मशिदीमागे शनिवारी (दि. १९) घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. शेख आसिफ शेख हाफीज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इम्रान खान आरेफ खान याने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शनिवारी सकाळी चंपा चौकात उभा होता. तेव्हा त्याचा चुलत भाऊ मुज्जू खानने इम्रानला सांगितले की, तुझा भाऊ सलमान खान आरेफ खान व त्याचा मेहुणा सुलतान शेख इसा यांना तुझ्या काकाच्या घरासमोर कोणीतरी मारले असून, ते मृत झाले आहेत. हे ऐकताच इम्रानने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
खुनाच्या घटनेपूर्वी सलमानचा चुलत भाऊ जुबेरला रात्री १२.३० वाजता आरोपी शेख आसिफचा कॉल आला होता. तेव्हा घाबरलेल्या जुबेरने त्याला आपण बुलढाणा येथे असल्याचे सांगितले. आसिफने फोनवर सुलतानबद्दल विचारणा केली होती. आपली दुचाकी सुलतान परत देत नाही. ती पोलिसांनी पकडली असून, त्यावरून पोलीस माझा शोध घेत आहेत.
त्यामुळे सुलतानला आपण सोडणार नसल्याची धमकीही आसिफने दिली होती. या कॉलनंतर आसिफ हा सुलतानचा शोध घेत गंजे शाहिदा मशिदीच्या मागे आला. शनिवारी पहाटे त्यांच्यात वाद झाल्यानंतर सलमान व सुलतानवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Newsworldmarathi Pune: पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर भागात जागेच्या वादातून तीन सराईत गुन्हेगारांनी खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे कात्रज भागात खळबळ उडाली आहे.शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर अमर साकोरे आणि इतर दोघे अशी आरोपींची नाव आहेत.
काय आहे प्रकरण…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये रविवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा घरी जात होता.त्यावेळी अमर साकोरे आणि इतर दोघां साथीदारांनी शुभम याला थांबून जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली.
त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शुभम हा तेथून पळून जाऊ लागला.त्यावेळी आरोपी अमर साकोरे आणि दोघांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी, दगड, विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्या मारहाणीत शुभम चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेनंतर आरोपी अमर साकोरे आणि त्याचे साथीदार पळून गेले आहेत.
या प्रकरणातील तीन ही आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली असून जागेच्या वादातून शुभम चव्हाण याचा खून केल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Newsworldmarathi Pune : “आवाज “ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. तिची जपणूक करणे, काळजी घेणे हे खूप आवश्यक आहे. आपल्या स्वरयंत्र मध्ये जर काही दोष निर्माण झाले आणि आवाज खराब झाला तर हे बरे होणे अतिशय कठीण असून यासाठी आहार, विहार ,विविध सवयी, दिनक्रम या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.या दृष्टीने सुप्रसिद्ध स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या *व्हॉइस केअर* या पुस्तकाचा गायक ,निवेदक, कीर्तनकार, शिक्षक , व्याख्याते विशेषता आवाजाशी संबंधित मंडळींना खूप मोलाचे मार्गदर्शन होत आहे.
यामधील संगीत विषयक माहिती, शास्त्रीय वैज्ञानिक माहिती आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती या सर्वांचा उत्कृष्ट संगम ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाचा प संदर्भ ग्रंथ म्हणून नक्की वापर होऊ शकेल असा मला विश्वास आहे. स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी गायकांसाठी केलेले या संशोधनाबद्दल मी त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे असे प्रतिपादन जगप्रसिद्ध गायक हरिहरनजी यांनी व्यक्त केले.
गायकांसाठी स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या व्हॉइस केअर फॉर सिंगर्स अँड प्रोफेशनलस या पुस्तकाची दुसरी आवृत्ती च्या निमित्ताने स्वर साधना या विषयावर बोलताना पं. हरिहरन यांनी हे मत व्यक्त केलं.
याप्रसंगी जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी स्वरसाधना, संगीत साधना या गोष्टी केवळ प्रसिद्धी, पैसा मिळवण्यासाठी नसून ती तपश्चर्या आहे, हा विचार गायक आणि विशेषता या क्षेत्रात येणारे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
Newsworldmarathi Mumbai: राज्यकर्ते महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायला निघाले आहेत. पण, पाण्यासाठी एका १२ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागतो, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्यावर राहणाऱ्या १२ वर्षीय वेदिका चव्हाणचा पाण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर रोहिणी खडसे यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करीत सरकारवर सडकून टीका केली आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे नेमक्या काय म्हणाल्या?
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक भाग जिथे महिलांची आणि लहान मुलींची पाण्याअभावी फरफट होते. महाराष्ट्र सरकारकडून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली, ज्यात प्रचंड पैसा खर्च केला गेला पण या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात याच्या तक्रारी आल्या आहेत, असा आरोप करत रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पुढे म्हणाल्या की, ज्या गावात ही घटना घडली त्या गावातही या जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात आली. पण, पाणी साठवून ठेवण्यासाठी टाकीच बांधली नाही. फक्त पैसा कमावण्यासाठी ही कामे झाली आहे, ठेकेदारांना फायदा होण्यासाठी ही कामे केली जात आहे. तसेच ही योजना चांगल्याप्रकारे राबवली असती, तर त्या चिमुकलीला जीव गमवावा लागला नसता, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
https://x.com/Rohini_khadse/status/1913450777999548512