Sunday special : ग्रेट ग्रुप कॅप्टन शुभांशू

Newsworldmarathi Team: भारताची अंतराळ संशोधन क्षेत्रातील झेप आता नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला येत्या मे महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत. त्यांची निवड अमेरिकेच्या अ‍ॅक्सिओम स्पेसच्या Ax-4 या खासगी अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली आहे अशी माहिती देशाचे अंतराळ व अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकृतरित्या जाहीर केली असून, ISROचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनीदेखील या ऐतिहासिक मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. (group captain shubhanshu shukla) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याविषयी थोडक्यात -लखनऊ, उत्तर प्रदेश येथे जन्मलेले शुभांशू शुक्ला हे २००६ पासून भारतीय वायुदलात कार्यरत आहेत. त्यांना २,००० तासांहून अधिक लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी रशियातील युरी गागरिन ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि ISROच्या बंगळुरू येथील केंद्रात विशेष अंतराळ प्रशिक्षण पूर्ण केले आहे. २०१९ मध्ये ‘गगनयान’ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती. Ax-4 मोहिमे विषयी: Ax-4 ही अ‍ॅक्सिओम स्पेस आणि SpaceX यांची संयुक्त मोहीम आहे. २९ मे २०२५ रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ही मोहीम SpaceX च्या Falcon 9 रॉकेटद्वारे प्रक्षिप्त केली जाईल. मोहिमेसाठी वापरण्यात येणारे अंतराळयान असेल Crew Dragon. या मोहिमेमध्ये चार अंतराळवीर सहभागी असतील कमांडर: पेगी व्हिटसन (अमेरिका) पायलट: ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (भारत) मिशन स्पेशालिस्ट: स्लावोश उझ्नान्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) या मोहिमेदरम्यान विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातील, ज्यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, अवकाशात माणसाच्या स्नायू व पेशी यावर होणारे परिणाम, अंतराळामध्ये बीजसंवर्धन व त्याची प्रतिकारशक्ती अशा बाबींचा समावेश अभ्यासाअंतर्गत असणार आहे. भारतातून अंतराळात जाणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे व्यक्ती असतील. १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या Soyuz मोहिमेद्वारे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ही मोहीम भारताच्या ‘गगनयात्री’ या उपक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, तसेच भारताच्या जागतिक अंतराळ सहकार्याला बळकटी देईल. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याविषयी सविस्तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे एक अनुभवी लढाऊ वैमानिक आणि भारताच्या गगनयात्रा मानव अंतरिक्ष कार्यक्रमासाठी निवडलेले अंतरिक्षवीर आहेत. ते लखनऊ, उत्तर प्रदेश येथील असून, १० ऑक्टोबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला आहे. शिक्षण आणि प्रारंभिक कारकीर्द शुक्ला यांनी सिटी मॉन्टेसरी स्कूल, लखनऊ येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. १९९८ मधील कारगिल युद्धाने प्रेरित होऊन, त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे येथे प्रवेश घेतला आणि २००५ मध्ये संगणक विज्ञानात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी भारतीय वायुसेना अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून जून २००६ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती मिळवली . वायुसेना आणि अंतरिक्ष प्रशिक्षण शुक्ला हे एक अनुभवी वैमानि आहेत. त्यांनी Su-३० MKI, MiG-२१, MiG-२९, Jaguar, Hawk, Dornier २२८ आणि An-३२ यांसारख्या विविध विमानांवर २००० तासांहून अधिक उड्डाण अनुभव मिळवला आहे . २०१९ मध्ये त्यांनी इस्रोच्या मानव अंतरिक्ष कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया पूर्ण केली असून, रशियातील युरी गगारिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील इस्रोच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केले आणि IISc बेंगळुरू येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये M.Tech पदवी प्राप्त केली आहे. अ‍ॅक्सिओम मिशन ४ आणि अंतरिक्ष प्रवास शुक्ला यांची निवड अ‍ॅक्सिओम मिशन ४ (Ax-४) साठी पायलट म्हणून झाली आहे, ज्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर (ISS) जाणार आहेत.हे मिशन नासा, स्पेसएक्स आणि इस्रो यांच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे. या मिशनमध्ये ते ISS वर जाणारे पहिले भारतीय आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतरिक्षात जाणारे दुसरे भारतीय बनतील . वैयक्तिक जीवन शुक्ला यांचा विवाह डॉ. कामना शुभा शुक्ला यांच्याशी झाला असून, त्या एक दंतचिकित्सक आहेत. त्यांना एक मुलगा आहे. त्यांचे वडील शंभू दयाल शुक्ला हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत, तर आई आशा शुक्ला गृहिणी आहेत. ते तिघा भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत . लेखन अक्षय बनकर

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास

0
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिरात बाप्पाला निळ्या आणि काळ्या द्राक्षाचा नैवद्य वाढवून त्यातून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या द्राक्षांचे पुण्यातील ‘सुर्योदय फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला वाटप करण्यात आले.

नागपुरात खळबळ…! अवकाशातून घरावर कोसळला धातूचा तुकडा; नागरिक भयभीत

Newsworldmarathi Nagpur : नागपूरमधील उमरेड येथे एक विचित्र घटना घडली आहे. अमय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर शनिवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अवकाशातून अज्ञात धातूचा तुकडा कोसळला आहे. या घटनेने मोठा स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. हा तुकडा एक मीटरचा असून उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे आहेत, यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत. या तुकड्यामुळे बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅब आणि भिंतीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती सकाळी उमरेड पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना एक जाडसर आणि अपूर्ण तुटलेल्या अवस्थेतील लोखंडी धातूचा तुकडा आढळून आला आहे. हा तुकडा नेमका कसा आणि कुठून पडला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी हा रहस्यमय धातूचा तुकडा ताब्यात घेतला असून तो पुढील तपासाचा भाग म्हणून पोलीस ठाण्यात जमा केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व धातूच्या तुकड्याची ओळख पटवण्यासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. उल्कापाताचा भाग तर काहीजण उपग्रहाचे तुकडे असावे, असा अंदाज व्यक्त करीत आहेत. उमरेड पोलीस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तज्ज्ञांच्या निदानानंतर धातूच्या तुकड्याचे सत्य समोर येईल. तोपर्यंत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि लोक या रहस्यमय धातूच्या तुकड्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तीन वर्षीय बालकाचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; दोन भावंडांना वाचवण्यात यश

Newsworldmarathi Daund: दौंड तालुक्यातील सहजपूर येथील माकरवस्ती भागात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कालव्यात खेळताना उडी मारल्याने तीन वर्षीय चिमुकला आसिम जावेद मुजावर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेक जावेद मुजावर (वय ७) आणि रूहान जावेद मुजावर (वय ५) ही त्याची दोन भावंडं मात्र सुदैवाने बचावली. तीनही मुले कालव्याच्या कडेला खेळत असताना त्यांनी अचानक पाण्यात उड्या घेतल्या. ही घटना शेजारील एका महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. आवाज ऐकताच निलेश खोमणे यांनी धाव घेत दोघा चिमुकल्यांना बाहेर काढले. परंतु आसिम याला पाण्यातून बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रयत्न करून आसिमला पाण्यातून बाहेर काढले आणि जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. महेक आणि रूहान यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. या प्रसंगी निलेश खोमणे यांनी दाखवलेली तत्परता व धाडसामुळे दोन चिमुरड्यांचे प्राण वाचले. स्थानिक नागरिक त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. या दुर्घटनेमुळे पालकांमध्ये आणि परिसरातील लोकांमध्ये जागरूकतेची भावना निर्माण झाली असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित झाली आहे.

संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला दुसरा धक्का; रोहन सुरवसे यांचा पक्षाला रामराम

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. अश्यातच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला नाराज नेतेमंडळींची मनधरणी करता येत नसल्याचेच दिसून येत आहे. पक्षातील नेतेमंडळींमध्ये समन्वय नसून अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, “सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अश्या आशयानेच मी आजवर काम करत आलोय. पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे काम केले आहे. जनप्रश्र्नांसाठी अनेक आंदोलने केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो. २०२१ सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमच न्याय देण्याचे आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किंबहुना ती वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहिलो आहे. काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार आणि हा पक्ष आजही तळागाळातील आणि गावकुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे.”

खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून कात्रज पुलाची पाहणी; नागरिकांच्या अडचणी लवकरच सुटणार

0
Newsworldmarathi Pune: खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज येथील अपूर्ण पुलाच्या कामाची पाहणी केली. जागेच्या हस्तांतराअभावी हे काम रखडले आहे. स्थानिक नागरिकांनी काम लवकर पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली आहे, कारण या पुलामुळे परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खा. सुळे यांनी नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्या व लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या पाहणीवेळी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, स्वाती पोकळे, अमृता बाबर, अधिकारी व पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

“आलेच मी…” सबसे कातील गौतमी पाटील

0
Newsworldmarathi Pune: “आलेच मी…” या गाण्यावर गौतमीने डान्स केला आहे. या व्हिडिओत ती “आलेच मी…” गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबत सईदेखील थक्क झाली आहे. सईने गौतमीच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करत “विषय कट” असं म्हटलं आहे.  सबसे कातील गौतमी पाटील नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. ट्रेंडिंग गाण्यावर गौतमी रील व्हिडिओ बनवताना दिसते. आता गौतमीने सईच्या लावणीवर ठेका धरला आहे. “आलेच मी…” या गाण्यावर गौतमीने डान्स केला आहे. या व्हिडिओत ती “आलेच मी…” गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबत सईदेखील थक्क झाली आहे. सईने गौतमीच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करत “विषय कट” असं म्हटलं आहे.  गौतमीने आजवर तिच्या लावणीवरील नृत्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. आता तिने सईच्या ‘आलेच मी’ या गाण्यावर खास लावणी नृत्य सादर केलं आहे. अभिनेत्री सई पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. ‘देवमाणूस’ या चित्रपटातील ‘आलेच मी’ या गाण्यावर पहिल्यांदाच सईने फक्कड अशी लावणी सादर केली आहे. सईच्या या पहिल्या वहिल्या लावणीला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या लावणीवर अनेक चाहते आणि नेटकरी नृत्य सादर करत आहेत. त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गौतमी पाटीललादेखील (Gautami Patil) सईच्या लावणीची भुरळ पडली आहे.

गडाला दत्तक घ्या, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

Newsworldmarathi Beed : नारळी सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस गहिनीगडावर आले होते. यावेळी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा देखील उपस्थित होत्या. वामनभाऊंचा गड दत्तक घ्या, अशी मागणी यावेळी पंकजा मुंडेंनी फडणवीसांकडे केली. ह.भ.प. संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताह सांगता सोहळ्यास घाटशीळ पारगाव ता. शिरूर कासार जि.बीड येथे मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांची उपस्थित होते. बीड जिल्ह्याला वारकरी संप्रदाय आणि संताची मोठी परंपरा आहे. ही परंपरा जपण्याचे काम गहिनीनाथ गड प्रामुख्याने करत आहे. महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र जींच्या माध्यमातून गहिनीनाथ गडावर विविध विकासकामे सुरू आहेत.
Oplus_131072
अध्यात्माला समाजकारणाची जोड देवून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल, असा विश्वास यावेळी बोलतांना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मठाधिपती ह.भ.प विठ्ठल महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आ.मोनिकाताई राजळे, आ.नमिताताई मुंदडा, आ.सुरेश धस, मा.आ.जयदत्त क्षीरसागर, मा.आ.भीमराव धोंडे, मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, प्रा.लक्ष्मण हाके, घटशीळ पारगाव चे सरपंच नवनाथ खेडकर आणि ग्रामस्थ यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणजीत कासले विरुद्ध निवडणूक आयोगाकडून परळीत गुन्हा दाखल

Newsworldmarathi Beed : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेताल व निराधार विधानं करणाऱ्या बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड झाल्याबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाने त्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रणजीत कासले यांनी भारत निवडणूक आयोग आणि शासनाविषयी बदनामीकारक व खोटी विधानं करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. लोकसेवक असतानाही त्यांनी भारताची सार्वभौमत्व आणि सुरक्षितता धोक्यात येईल अशी वक्तव्ये करून निष्काळजीपणा दाखवला. कासले यांनी असेही म्हटले की, त्यांच्या बँक खात्यात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० लाख रुपये जमा झाले होते आणि हे पैसे परळी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशिनपासून दूर राहण्यासाठी आणि छेडछाडीवर गप्प बसण्यासाठी दिले गेले, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल जनतेमध्ये संशय निर्माण होऊ शकतो, तसेच निवडणूक आयोग आणि शासनाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.

आमदार सुरेश धस यांनी केले मंत्री पंकजा मुंडेंचे स्वागत; राजकीय चर्चांना उधाण

Newsworldmarathi Beed : बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडावर नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षण पाहायला मिळाला. या कार्यक्रमात भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस एकत्र मंचावर आले. विशेष म्हणजे, सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करत आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले. या अध्यात्मिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस एकत्र येताच, राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच ऊत आला. अनेकांनी या उपस्थितीचा राजकीय अर्थ लावायला सुरुवात केली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडाशी संबंधित आठवणी सांगितल्या. त्या म्हणाले, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखवणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. नारळी सप्ताहाची थोर परंपरा आहे. येथून सर्व वारकरी संप्रदायचा जन्म होतो. वामन भाऊंचा आदरयुक्त धाक आहे. भगवान बाबांच्या जीवनात सर्व वैभव आणि संपत्ती होती. त्यानंतर त्यांनी सर्व सुखाचा त्याग करुन ईश्वराच्या मार्गाने जाण्याची वैभवशाली परंपरा सुरु केली. ज्याच्या कार्मात वैभव आहे, तोच जीवनात पुढे जाऊ शकतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले