Newsworldmarathi Pune : सावकारी पद्धतीतून होणारा छळ आणि कर्जदारांवर होणारा अन्याय ही गंभीर समस्या आहे. या प्रकरणात रिक्षा चालकाने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये व्यथा आणि सावकारांनी दिलेल्या त्रासाची कैफियत मांडली आहे.
Oplus_131072
राजू नारायण राजभर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलीसांनी पोलिसांनी हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे, महादेव फुले, राजीवकुमार ऊर्फ गुड्डु भैया आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुन देखील त्याचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसुन तुला मारु, तुला कापुन टाकू, अशा वारंवार धमक्या देत होते. या धमक्यांमुळे ते सतत तणावात होते. याच तणावातून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Oplus_131072
राजू राजबर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हीडीओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबत सांगितले आहे, व्हीडीओच्या शेवटी त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफी मागितली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मंजू मला माफ कर, मुलांनो घरात बनेल ते खा, आईला त्रास देऊ नका, ही केलेली विनवणी हृदय पिळवटून टाकणारी होती. माझ्या अंतिम संस्कार करण्यासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नाहीत. हे मला माहित आहे. म्हणून, मला शवदाहिनीत जाळा. अशी आर्त विनंतीही त्यांनी केली आहे.
Newsworldmarathi Pune केंद्र सरकारने नुकतीच सुरु केलेली ‘जागो ग्राहक जागो’ ही ऑनलाईन सुविधा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या वतीने कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्राहक पंचायत पेठ’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जावडेकर बोलत होते. ग्राहक पंचायत पेठ समितीच्या अध्यक्षा अनुराधा देशपांडे, विवेक केळकर, अंजली देशपांडे, सुप्रिया बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने लागू केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण मिळते. जागो ग्राहक जागो, जागृती अशा नुकत्याच सुरू झालेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना तातडीने तक्रार नोंदवता येईल. त्यामुळे फसवणूक न होता सुरक्षित व्यवहार होऊ शकतील.”
ग्राहक पंचायत पेठ हा उपक्रम 46 वर्षांपासून सुरु आहे. छोट्या व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. उत्पादने, त्यांचा दर्जा, किंमत आणि उत्पादक यांची चोख पडताळणी केल्यानंतरच या प्रदर्शनात सहभागी होता येते. आठ जानेवारीपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.
Newsworldmarathi Pune : भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने रविवार 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त एकाच दिवशी 25 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती संघटन पर्व प्रभारी आ. रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, नेते पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
चव्हाण म्हणाले की, या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथून करणार आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते, आमदार ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अभियानाबाबत श्री. बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता 250 पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
डिसेंबर पासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 50 हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य ही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपाचे विविध मोर्चे तसेच प्रकोष्ठ यांनी नोंदणी अभियानासाठी कार्यशाळा ही घेतल्या होत्या. भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली होती.
या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रीय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणा-या भाजपा च्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
Newsworldmarathi Pune : कोल्हापूरमधील छोट्याशा खेड्यात माझे बालपण गेले. भाषा शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. वडिलांच्या सल्ल्यामुळे लेखानाच्या क्षेत्रात प्रगती केली. शासकीय नोकरीत व्यस्त दिनचर्या असूनही लिखाणाची आवड असल्याने नेटाने लेखन केले. अनेक अनुभवातून मनात कथाबिजे रुजली गेली. त्या कथांमधून कैवल्याचा आनंद मिळाला, अशा भावना पहिल्या रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केल्या.
रोटरी क्लबतर्फे आयोजित पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याशी रोटेरियन वैशाली वेर्णेकर आणि रोटेरियन अभय जबडे यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर मधील छोट्याशा खेड्यात आपले बालपण गेले असल्याचे सांगून विश्वास पाटील म्हणाले, लेखनाला पूरक असे वातावरण गावात नव्हते; परंतु गावात निसर्गसौंदर्य मोठ्याप्रमाणात होते. गावाच्या एका बाजूला विशाळगड तर दुसऱ्या बाजूला पन्हाळगड होता. गुरे राखायला जाताना त्यांचे निरिक्षण करत असे. इतिहासाची आवड असल्याने गावातील लवलवत्या गवताच्या पात्यात मला शिवाजी महाराजांचे शूर सैनिक दिसत असत. शालेय वयातच वीर धवल कादंबरी वाचनात आली.
यातून वाचनाची आवड निर्माण झाली. नववीत असताना एका वर्षात अडीचशेहून अधिक पुस्तके वाचली. शाळेतील मराठीचे शिक्षक उत्तम शिकवित असत; त्यामुळे अभ्यासाची गोडी वाढली. आई निरक्षर तर वडिल फक्त पाचवीपर्यंत शिकलेले होते; परंतु त्यांचा बाणा लढवय्या होता. त्यांच्या प्रेरणेनेच लघुकथा लिखाण सोडून कादंबरी लेखनाकडे वळलो.
खूप लहान वयातच भावलेल्या विषयांवर लिखाण सुरू केले. पुढे स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्याने सरकारी अधिकारी झालो.
अतिशय व्यस्त दिनचर्या असतानाही घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ लेखनात घालवत असे. शनिवारी-रविवारच्या सुट्टीत जणू भूमिगत होऊन लिखाण करत असे. लिखाण करताना मी सरकारी अधिकारी असल्याचे दडपण न घेता विविध विषयांवर मोकळेपणाने लिखाण केले. त्यावेळी हात आखडता घेतला नाही. नाहीतर शब्द माझ्यावर प्रसन्नच झाले नसते, अशा भावनाही पाटील यांनी या वेळेला व्यक्त केल्या.
ऐतिहासिक लिखाण करण्यासाठी भरपूर वाचन केले, अभ्यास केला, घटनास्थळांना भेटी दिल्या. त्यामुळे मी केलेल्या ऐतिहासिक लिखाणात वास्तवता आली. तर काही प्रसंगांना प्रतिभेतून कल्पनेची जोड दिली. सामाजिक लेखन करताना प्रत्यक्ष अनुभवांचा मोठा आधार लाभला. अधिकारी म्हणून कार्यरत असताना जनसंपर्क अफाट असल्याने अनेक अनुभव आले. त्यातूनच सामाजिक स्वरूपाचे लेखन झाले.
सरकारी नोकरीत असताना लेखक म्हणून सहकाऱ्यांनी कौतुक केले; परंतु अनेकदा मत्सरालाही सामोरे जावे लागले. परंतु वयाच्या अवघ्या 32व्या वष साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने त्यांची तोंडे बंद झाली. अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वाङ्मय चौर्य, जीवनातून उठविण्याचा प्रयत्नही झाला; परंतु त्यातूनही सहीसलामत बाहेर पडलो.
आजच्या वाचन संस्कृतीवर भाष्य करताना विश्वास पाटील म्हणाले, मराठी साहित्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्यातून मराठी भाषा तावून-सुलाखून बाहेर पडली आहे. आजचा जमाना रिल्सचा असला तरी सुजाण वाचक आत्म्याचा आवाज ऐकून पुन्हा एकदा साहित्य-संस्कृतीकडे वळतील असा आशावादही त्यांनी दर्शविला.
Newsworldmarathi Pune : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये दिनांक 22 व 23 डिसेंबर2024 रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खो खो या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू; प्रशालेचे माजी विद्यार्थी संतोष पवार हे उपस्थित होते.
त्यांच्या समवेत प्रशालेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांनी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले.क्रीडा ज्योत प्रशालेतील राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर उज्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंनी आणली क्रीडा स्पर्धांमध्ये लांब उडी,गोळा फेक,थ्रो बॉल,100 मीटर धावणे,50 मीटर धावणे, बुद्धिबळ असे वैयक्तिक खेळ तर लंगडी,कबड्डी,खो-खो यांचे अंतरवर्गीय सामने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेलार यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय संजय अहिरे यांनी करून दिला. महेश जोशी यांनी आभार मानले.
पुणे : शारीरिक व मानसिक आजारांवर योग कसा उपयुक्त ठरतो. आपला आहार-विहार कसा असावा. कुठला प्राणायाम गरजेचा असतो याबाबत माहिती देण्यासाठी योग विद्या गुरुकुलच्या वतीने ‘योग जीवन पद्धती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (५ जानेवारी) टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. नाशिकचे योग गुरू डॉ. विश्वास मंडलीक हे या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
ही माहिती योग विद्या गुरुकुल, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष रमेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे कार्यवाह कुमार देशपांडे आणि संमेलन प्रमुख मयूर भावे उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘हा कार्यक्रमात प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. डॉ. मंडलीक यांच्यासोबत पुणे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सहा मान्यवर यात सहभागी होणार आहेत.
यात डॉक्टर अर्चना कुलकर्णी, वकील राजश्री करे, शिक्षणतज्ज्ञ वैभव जोशी, मानसशास्त्र तज्ज्ञ ऐश्वर्या जोशी, पुरुष प्रतिनिधी प्रदीप खराडे, महिला प्रतिनिधी वैशाली गोखले सहभागी होणार आहेत. शाळेतील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. आपणही थेट आपल्या मानसिक समस्या गुरुजींसमोर मांडू शकणार आहात.’ विज्ञानाच्या प्रगतीमुळे २१व्या शतकात मानवाने अनेक भौतिक सुखसाधने प्राप्त केली आहेत.
परिणामी मानवाचे जीवन धकाधकीचे, धावपळीचे व स्पर्धेचे बनले आहे. त्यामुळे ताण-तणाव निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. मानसिक आजार वाढत चालले आहेत. त्यावर मुळापासून उपचार आवश्यक आहेत. त्यासाठीच डॉ. मंडलीक मार्गदर्शन करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
Newsworldmarathi Pune : महायुतीच्या महागोंधळाच्या’ कारभाराची प्रचिती राज्यातील जनते बरोबर पुणेकरांना येऊ लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याऐवजी ‘राजकीय धुळवडीत’ अधिक मग्न असून; डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ. मनमोहनसिंग यांचा काँग्रेसने ‘कथित अवमान (?) करण्याची कथानके’ रचण्याचे निष्फळ प्रयत्न करीत, ७५ वर्षां पुर्वीच्या ‘गांधी – नेहरूंच्या नावे बोटे मोडण्याचा राजधर्माचा पुरषार्थ निभावत असल्याची प्रखर टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली.
ते पुढे म्हणाले की, फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा केवळ राजकीय धुळवडीसाठी वापर करू नये. तर प्रशासकीय कामासाठी देखील वापर करावा व पुणे मनपा’तील २ अतिरिक्त आयुक्त पदांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात.
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, एप्रिल २०२४ म्हणजेच तब्बल ९ महिन्यांपासून ‘पुणे महापालिकेतील’ दोन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासकीय शासन असल्याने, आयुक्त राजेंद्र भोसले यांचेवर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे एकमेव अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त असलेल्या पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे महापालिकेच्या सर्वच विभागांचा कारभार आहे.
पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे सध्या मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने ‘पीएमपीएमएलचा अतिरिक्त पदभार’ देखील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे देण्यात आलेला आहे. दोन अति. आयुक्त नसल्याने, अनेक विभागांच्या फाईल प्रलंबित आहेत. आरोग्य, स्वच्छता, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा व सांडपाणी- ड्रेनेज लाईन सह अनेक अत्यावशक कामे खोळंबून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. महापालिकेतील महत्त्वाची संविधानिक पदे रिक्त ठेवण्यामागे व अधिकारांचे केंद्रीकरण करण्यामागे, काही आर्थिक गणिते आहेत काय (?) वा कोणत्या ॲाफर’ची वाट पाहिली जात आहे काय(?) असा उपहासात्मक सवाल केला.
राज्यभरात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत पुण्याची जिल्हाधिकारी देखील बदलले पण पुणे महापालिकेला २ अतिरिक्त आयुक्त काही मिळायला तयार नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून देखील पुणे महापालिके’साठी अति आयुक्त मिळत नाहीत ही केवळ नामुष्की समजायची का ‘पुणे शहरास’ (नागपूर मेट्रो प्रमाणे प्राधान्य देणारा पुर्वीचा) आकसच् समजायचा (?) असा संतप्त सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. त्यामुळे किमान पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीस व पर्यायाने पुणेकरांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
Newsworldmarathi Pune : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजली जाते. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणीवेने, आत्मियता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शिवाय ‘१०० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुण्यात व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. सतिश देसाई, शैलेश पगारिया, सचिन ईटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा, साहित्य सेवकांचा सत्कार या प्रसंगी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते.
साहित्य क्षेत्रातील वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करून मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे महत्त्व मोठे असून प्रत्येकाच्या मनात असलेली कार्यकर्त्याची भूमिका माझ्याही मनात आहे. यातूनच आत्मविश्वासपूर्णतेने साहित्य संमेलनाच्या यशस्वीततेसाठी मी बांधील आहे. पुण्याचा प्रतिनिधी आणि पुण्याविषयी आदरभाव जपत प्रामाणिकपणे चांगले काम करून माझ्या शहराचे नाव जपेन.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हा भाषिक उत्सव, भाषेची जत्र असते. हा उत्सव अधिक देखणा करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदरभाव असून त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. दिल्ली येथे होणारे साहित्य संमेलन प्रयोगशीलता आणि नाविन्यतेचा वापर करून संयोजक संजय नहार आणि त्यांचे सहकारी अधिक देखणे करतील.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे. दिल्लीत संमेलन आयोजित करण्याची संधी सरहद पुणेला मिळाली आहे, याचा आनंद आहे. दिल्लीत होणाऱ्या संमेलनामागे मराठी माणूस एक होत आहे ही संकल्पना जपली जात आहे.
शफी पठाण आणि प्रशांत गौमत यांनी माध्यम प्रतिनिधींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार प्रा. मिलिंद जोशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.
पुण्यातील विमानतळ रस्त्यावर गुरुवारी (दि. २) सकाळी ९ वाजता दुचाकी आणि महिंद्रा एसयूव्हीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दीर-भावजय आशीर्वाद नागेश गोवेकर (वय ५२, रा. मापसा, गोवा) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय ६६, रा. भैरवनगर, पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रेश्मा गोवेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना एअरफोर्सच्या ईसीएच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर दीर आशीर्वाद गोवेकर भावजयीला दुचाकीवरून घरी घेऊन जात होते. येरवडा ते विमानतळ रस्त्यावर फाईव्ह नाईन चौकाजवळ वळण घेत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा एसयूव्हीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, आशीर्वाद गोवेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रेश्मा गोवेकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ ईसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रेश्मा गोवेकर यांचे निधन झाले.
या अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साईबा पोटे यांच्या माहितीनुसार, मयत रेश्मा यांच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही घटना अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, यावर भर देणारी ठरते.
Newsworldmarathi Mumbai : या नववर्षी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “सेलिब्रिटी मास्टरशेफ – अब उन सबकी सीटी बजेगी!”मध्ये थरारक पाककला स्पर्धा रंगणार आहे. या शोमध्ये सेलिब्रिटीजचा एक मजेदार संच सहभागी होत आहे, जो आपले पाककौशल्य दाखवण्यासाठी सरसावला आहे.
या सीझनमध्ये सामील होत असलेल्या कलाकारांमध्ये उषा नाडकर्णी आणि निक्की तांबोळी यांचाही समावेश आहे. या दोन्ही प्रतिभावान अभिनेत्री आनंदी, काहीशा मस्तीखोर स्वभावाच्या आहेत, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला एक तडका मिळेल. एकीकडे, निक्कीच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वाला साजेसे पदार्थ, किचनमधल्या तिच्या नाट्यमय हालचाली दिसतील, तर दुसरीकडे उषा नाडकर्णीच्या अनेक वर्षांच्या अनुभवात मुरलेले सुजाणपण आणि चमचमीतपणा यांचे मिश्रण दिसेल. इतर सेलिब्रिटीजसोबतच्या त्यांच्या साहचर्यातून निर्माण होणारा पिढ्या तसेच पाकशैलीतील संघर्ष नक्कीच खुमासदार असेल.
रियालिटी टीव्ही स्टार निक्की तांबोळी आता कुकिंग स्टार बनण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्यात धडाडी आहे आणि तिला स्पर्धेचा त्वेष आवडतो. पण यावेळी ती स्पर्धेत उतरली आहे ती आपल्या वडिलांकडून मान्यता मिळवण्यासाठी. निक्की उत्साहाने सांगते, “मी पहिल्यापासून तशी बंडखोरच आहे. पण मला वाटते, स्वतःशी प्रामाणिक राहणे हीच खरी सुखाची रेसिपी आहे. मी केलेली निवड अनेकदा माझ्या वडीलांना पसंत पडलेली नाही. पण सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये मी दाखल होणार हे समजल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आणि या गोष्टीचा मला आनंद वाटतो.
माणसांशी नाते जोडणे आणि जखमा भरून काढणे हे खाद्य पदार्थांना छान जमते. मला आशा आहे की, या अनुभवातून मी माझे पाककौशल्य दाखवू शकेन आणि माझ्या कुटुंबाची मान ताठ करू शकेन.”
दुसरीकडे, वयाच्या 78 व्या वर्षीही उषा नाडकर्णींचा उत्साह दांडगा आहे. त्या देखील तितक्याच उत्साहाने या पाककलेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्यातील या उत्साहामुळेच त्या उद्योगात सगळ्यांच्या लाडक्या आहेत. बोलताना उषा नाडकर्णींचा उत्साह ओसंडून वाहत असतो की, “माझ्या वयात मला असे वाटत होते, माझे सगळे काही करून झाले आहे. पण आयुष्य नेहमी तुम्हाला सर्प्राइज देत असते. गेली काही दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता किचनमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी पदर खोचला आहे.
मला कुकिंगची आवड पहिल्यापासूनच आहे. आता माझी ही आवड जगाशी शेअर करण्याची संधी मला मिळाली आहे. मास्टरशेफ इंडियाची सर्वात जेष्ठ स्पर्धक म्हणून मी जगाला हे दाखवून देणार आहे की, सळसळत्या तारुण्याइतकेच अनुभवाचे आणि सुजाणतेचेही मोल असते. कोणतेही आव्हान पुढे येऊ दे, मी झारे, पळ्या घेऊन सज्ज आहे!”
यांच्यातील कोणता कलाकार होस्ट फराह खानला प्रभावित करू शकेल आणि सेलिब्रिटी शेफ परीक्षकांचे मन जिंकू शकेल?
सेलिब्रिटी मास्टरशेफ, लवकरच येत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!