२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

0
Newsworldmarathi Mumbai : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

ई-वीकमुळे उद्योजकतेला वाव : दीपक शिकारपूर

0
Newsworldmarathi Pune : गरवारे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ई-वीकमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि उद्योजकतेला नक्कीच वाव मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील आंत्रप्रेन्युअरशीप, इन्क्युबेशन अँड स्टार्टअप सेलतर्फे ई-वीकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बिझेनस एक्झिबिशनचे उद्घाटन डॉ. शिकारपूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, नियमक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाच्या प्रत्यक्ष मांडणीबरोबरच आभासी प्रदर्शन मांडणीचा वापर उद्योजकता वाढविण्यासाठी करावा, असे आवाहन डॉ. शिकारपूर यांनी या वेळी केले. नव्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी स्वतःचे उद्योग स्थापन करावेत या भूमिकेतून ई-वीक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांनी प्रास्ताविकात सांगितले. ई-वीकमध्ये व्यवसायाच्या नवनवीन संकल्पना, ब्रँडींग इत्यादी विषयांवर आंतरमहाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

‘हे’ दादाचं होणार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री?

0
Newsworldmarathi Pune : पुण्याच्या पालकमंत्री पदावरून यंदाही “दोन दादा” म्हणजेच अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या काही काळात हे पद पुण्यातील राजकीय महत्त्व आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात आहे. अजित पवार, ज्यांना पुण्यातील स्थानिक पातळीवर मोठा जनाधार आहे आणि ते विद्यमान उपमुख्यमंत्रीही आहेत, यांना या पदावर पुन्हा दावा मजबूत करण्याची संधी आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा आधार घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय पुण्यासाठी घेतले आहेत, जे त्यांच्या बाजूने जाऊ शकतात. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील, ज्यांना भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठिंबा आहे, त्यांनीही पालकमंत्री म्हणून चांगले कामगिरी केली असल्याचा दावा आहे. त्यांनी पुण्यातील पायाभूत सुविधा आणि इतर प्रकल्पांवर भर दिला आहे, जे त्यांना वरचढ ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. पदावर कोण ठरतो याचा निर्णय केवळ पक्षीय समीकरणांवर नाही तर राजकीय दबाव, गटबाजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. ही रस्सीखेच केवळ स्थानिक नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतर आता सर्वांच्या नजरा पालकमंत्री पदांच्या वाटपाकडे वळल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद नेहमीच महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण पुणे हे महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, आणि शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या पदावर दीर्घ काळापासून मजबूत दावा आहे. त्यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात अनेक मोठ्या विकासकामांना गती दिली आहे, ज्यामुळे त्यांचा या पदासाठी पुन्हा दावा मजबूत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि स्थानिक पातळीवरील प्रभावाचा विचार करता, त्यांना या पदावर ठेवले जाऊ शकते, असे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाकडूनही या पदासाठी चंद्रकांत पाटील किंवा इतर महत्त्वाच्या नेत्यांचा दावा होऊ शकतो. भाजपचा स्थानिक गड मजबूत करण्यासाठी हा पदभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे या पदासाठी फडणवीस सरकारला संतुलन साधत कसरत करावी लागणार आहे. या रस्सीखेचीत कोण वरचढ ठरेल हे पक्षीय गटबाजी, स्थानिक आमदारांचे समर्थन आणि मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय यावर अवलंबून आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचे वाटप हा आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक मुद्दा ठरू शकतो. पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या राजकीय चर्चेत “जिल्ह्यातील जास्त आमदारांच्या फॉर्म्युला” हा महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. पुणे जिल्ह्यातील 21 आमदारांपैकी 9 आमदार भाजपचे आहेत, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे 8 आमदार आहेत. या गणितानुसार भाजपला पालकमंत्री पद देणे तर्कशुद्ध वाटत आहे, ज्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा दावा अधिक मजबूत होतो. तथापि, पुणे जिल्ह्याचे राजकीय महत्त्व आणि अजित पवार यांचा प्रभाव पाहता, हा फॉर्म्युला अपवाद ठरू शकतो. अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील दीर्घकालीन योगदान, प्रशासकीय अनुभव, आणि स्थानिक पातळीवरील त्यांचा मजबूत जनाधार यामुळे त्यांना या पदावर कायम ठेवण्याचा विचार होऊ शकतो. याशिवाय, शिंदे-फडणवीस सरकारला तीन पक्षांच्या (शिवसेना-शिंदे गट, भाजप, आणि राष्ट्रवादी – अजित गट) गटबाजी सांभाळून निर्णय घ्यावा लागणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असून, त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातूनही त्यांना हे पद दिले जाऊ शकते. शेवटी, हे पद पक्षीय समीकरणांपेक्षा सरकारच्या एकूण धोरणांवर, स्थानिक विकास प्रकल्पांवरील भर, आणि राजकीय संतुलनावर अवलंबून असेल. त्यामुळे पुणे जिल्हा “अपवाद” ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे नेहमीच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारपासून ते सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारपर्यंत, या पदावर वारंवार राजकीय रस्सीखेच झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासोबत पालकमंत्रीपदाची जबाबदारीही समर्थपणे पेलली आहे, ज्यामुळे त्यांच्या या पदावरील नेतृत्वाला स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात, चंद्रकांत पाटील यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. मात्र, अजित पवारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी पुन्हा हे पद आपल्या बाजूने वळवले. यावरून स्पष्ट होते की अजित पवार हे केवळ राजकीय दबावच नव्हे, तर जिल्ह्याच्या विकासाबाबत आग्रही भूमिका घेतात. आता, भाजपचा “जास्त आमदार” फॉर्म्युला पाहता चंद्रकांत पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. पण, अजित पवारांचा राजकीय वजन आणि पुण्यातील स्थानिक समर्थन लक्षात घेता, ते पुन्हा हे पद खेचून आणतील का? हा मोठा प्रश्न आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

0
Newsworldmarathi Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी नवीन इमारतीच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी पवार यांचे स्वागत केले. यावेळी पवार म्हणाले सारथी संस्थेच्या अडीअडचणीबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल व संस्थेस आवश्यक असणारा निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. सारथी संस्थेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सारथी संस्थेचे अध्यक्ष निंबाळकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा व संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक संजीव जाधव आदी उपस्थित होते.

‘पुरुषोत्तम‌’चे लॉटस्‌‍चे गुरुवारी वितरण

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस्‌‍ गुरुवार, दि. 26 डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला शुक्रवार दि. 27 रोजी सुरुवात होणार आहे. महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले सर्व संघ शुक्रवारी (दि. 26) पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे लॉटस्‌‍ काढण्यात येणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील पारितोषिकप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे. महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. 27 आणि दि. 28 रोजी सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 9 आणि दि. 29 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून पारितोषिकांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून

0
Newsworldmarathi Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनल वरून होणार असून याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले असून या टर्मिनलवरुन होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. मात्र इमिग्रेशनच्या यंत्रणेबाबतची निर्माणाधीन प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. मंत्री मोहोळ यांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला आणि तांत्रिक बाबींसंदर्भात माहितीही घेतली. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरुन आताच्या घडीला एकूण ३ मार्गांवरून ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु असून ही सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांसाठी आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता. आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात सुखकर होणार आहे.’ ‘इमिग्रेशन संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन नवे टर्मिनल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे विमानतळाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मालिका अशीच अखंडित राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

चांगले साहित्यिक सक्षम अधिकारीही असतात : नंदकर

0
Newsworldmarathi Pune : लेखनाच्या माध्यमातून लेखकाला आत्मिक समाधान मिळते. प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज करताना जे अनुभव येतात ते साहित्यकृतीच्या मांडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे चांगले अधिकारी हे चांगले साहित्यिक असतात तसेच चांगले सहित्यिक सक्षम अधिकारीही असतात, असे प्रतिपादन पुणे महापालिका उपायुक्त राजीव नंदकर केले. मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात आज (दि. 23) ‌‘चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का?‌’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) वैशाली पतंगे यांनी चर्चासत्राचे संचालन केले. नंदकर पुढे म्हणाले की, आजच्या काळात या विषयावर टीका टिप्पणी केली जाते. पण साहित्यिक अधिकारी कधीच काम टाळत नाही. तर त्याच्या मनातल्या साहित्यकृती समाजासमोर याव्यात असा त्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक अधिकाऱ्यांनी तीन वर्षातील कामकाजाचा आढावा शासनास सादर करावा. ज्यायोगे अधिकाऱ्यातील साहित्यिकाची लेखनाची आवड वाढण्यास मदत होऊ शकते. मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपसंचालक अंजली ढमाळ म्हणाल्या, चांगला अधिकारी साहित्यिक असणे हा मानाचा तुरा आहे; कारण आपण आधी माणूस नंतर अधिकारी असतो. त्यातून सेवेची भावना गतिमान होते. समाजातील बारिक-सारिक बदल, अनुभव अधिकाऱ्याच्या मनात दडलेल्या साहित्यिकाला टिप कागदप्रमाणे टिपता आले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील वेदना समजल्यास प्रश्नातून मार्ग काढता येणे शक्य होते. मानवी मनाचे विविध कंगोरे समजावून घेऊन लेखनाच्या माध्यमातून मांडता आले पाहिजेत. म्हणजे मानवी अवस्थेला शब्दातून व्यक्त करता आले पाहिजे, असे मत आयकर विभागाचे उपायुक्त महेश लोंढे यांनी व्यक्त केले. विद्या पोळ-जगताप म्हणाल्या, अधिकारी आणि साहित्यिक या दोन स्वतंत्र भूमिका आहेत. असे असले तरीही शासकीय काम आणि साहित्य निर्मित यामध्ये फारकत करता येत नाही; कारण चांगला अधिकारी आणि साहित्यिक परस्परांना पूरक असतात. यासाठीच विविध साहित्यिक उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समाजातील प्रत्येक घटकाने साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून समाजातील विविध प्रश्नांची मांडणी समजापुढे येऊ शकेल, असे विचार वैशाली पतंगे यांनी व्यक्त केले. उल्का नाईक-निंबाळकर म्हणाल्या, संवेदनशील, साहित्यिक हळवे मन कठोर निर्णय घेणार का असा प्रश्न अनेकदा निर्माण होत असतो; पण दोनही विषय वेगवेगळे असतात.

१२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूती

0
Newsworldmarathi Pune जय जय विठोबा रखुमाई चा गजर, तब्बल १२५० मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ… अशा भारलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या १२५० हून अधिक मृदंग वादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला. मृदंगांचा स्वर टिपेला पोहोचताना पुणेकर देखील टाळ्यांच्या माध्यमातून या भक्तीरसात न्हाहून निघाले आणि प्रत्यक्षपणे हा स्वरब्रह्माची अनुभूती घेतली. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये एकत्रितपणे १२५० मृदंगांचे वादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ह.भ.प.चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नमन आणि त्यानंतर पंचपदीने झाली. रूप पाहता लोचनी… सुंदरते ध्यान उभे विटेवरी… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल … तुमच्या नामघोषासह मृदंग आणि टाळांचा गजर झाला. वादनाची सांगता सांगता आरतीने ने झाली. यावेळी जेष्ठ वादकांसह युवक-युवती आणि बाल वादक देखील सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात कुंभाची तयारी सुरूआहे मात्र इथे देखील एक कुंभच पाहायला मिळत आहे. उपासना आणि आराधनेचे बळ वाढवणे, हा यामागील उद्देश आहे. मंदिरांनी सामाजिक काम करावे आणि माणसात परमेश्वर ओळखावा, ही मूळ कल्पना आहे. हिंदू धर्म पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमणे होऊन देखील टिकला. धर्म टिकून ठेवण्याची प्रेरणा मंदिरांनी दिली. त्यामुळे त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे. अशोक गुंदेचा म्हणाले, चार दिवसीय महोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील १२५० मृदुंग वादकांनी एकत्रित मृदंग वादनाचा केलेला कार्यक्रम हा सर्वोच्च बिंदू होता. महोत्सवात १२६ मठ मंदिरांनी सहभाग घेत १८० स्टॉल द्वारे आपल्या सेवा कार्याची माहिती दिली.

पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं

Newsworldmarathi : Pune Wagoli Accident महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अपघाताने देशभर खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कारने दोघांना चिरडले होते. त्यानंतर या घटना लगातार होताना दिसून आल्या. अशात पुण्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा एक हिट अँड रनचा प्रकार घडलाय. यामुळे एकच खळबळ उडालीये (Newsworldmarathi Pune news) वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. नेमकं काय घडलं? वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर असून डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. (Newsworldmarathi pune News) फुटपाथवर झोपलेले कामगार हे अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. अपघात घडला त्यावेळी फुटपाथवर 12 जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते. गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांचा घात केला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर, जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात जखमी झालेले सर्व कामगार रविवारी रात्रीच अमरावती येथून कामासाठी आले होते. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. (Newsworldmarathi pune News)

धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत

0
Newsworldmarathi Pune : सध्या महाराष्ट्रात थंडीने जोर धरला असून पुणे जिल्ह्यातही याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात थंडीचा जोर वाढला असून, शनिवारच्या पहाटे धुक्याच्या चादरीने संपूर्ण शहर झाकून गेले. यामुळे रस्ते वाहतूक आणि विमानसेवांवरही मोठा परिणाम झाला. धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने तब्बल 22 विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला, ज्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हे परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने धुक्यामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सावधगिरीचे उपाय करणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनचालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवणे आणि प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था ठेवणे याचा समावेश होतो.
शनिवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर
पडलेल्या दाट धुक्यामुळे सकाळी 6 ते दुपारी 12 दरम्यान विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. एकूण 22 विमानांच्या उड्डाणांना अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे उड्डाणांना अर्ध्या तासापासून तीन तासांपर्यंत विलंब झाला. दिल्लीनंतर बेंगळुरू, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चेन्नई, बँकॉक या ठिकाणी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला. धुक्याचा परिणाम फक्त उड्डाणांवरच नाही तर आगमन विमानांवरही दिसून आला. पुण्यात येणारे एक विमान दाट धुक्यामुळे निर्धारित वेळेत उतरू शकले नाही आणि दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विमानतळ प्रशासनाने अशा परिस्थितीत प्रवाशांना माहिती देण्यासाठी तत्परता दाखवणे आणि पर्यायी व्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. तसेच, धुक्याच्या अशा घटनांसाठी विमानसेवेचे नियोजन सुधारण्यासाठी उपाययोजना केली जावी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमुळे विमानसेवा अधिक विस्तारली असून, विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षीच्या तुलनेत विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: शनिवार आणि रविवार हे दिवस सर्वाधिक व्यस्त असतात, ज्या दिवशी 200 पेक्षा अधिक उड्डाणे होत आहेत. पुण्यातून देशातील 35 विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान केली जात आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळत आहे. तथापि, शनिवारी धुक्यामुळे उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही परिस्थिती विमानतळाच्या कार्यक्षमतेसाठी एक आव्हान ठरू शकते, त्यामुळे व्यवस्थापनाने अशा घटनांवर उपाययोजना करण्यासाठी अधिक प्रभावी योजना आखणे गरजेचे आहे.