ऐतिहासिक वास्तू खराब करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा : आ. गोऱ्हे

0
Newsworldmarathi Pune : ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले यांचे सौंदर्य खराब करणाऱ्यांना आता ३ ते ५ वर्षांची शिक्षा होईल. नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी कमी शिक्षा होती, त्यामुळे काेणावर धाक नव्हता. गड-किल्ले यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. पुण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत डॉ. गोऱ्हे यांनी अधिवेशनात झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. डाॅ. गाेऱ्हे म्हणाल्या, विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली. तब्बल ३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनात इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला. कारागृहांच्या संदर्भातील विधेयक, सिद्धिविनायक मंदिराच्या समिती सदस्यांची मुदत ३ वर्षांपासून ५ वर्षे करण्याचा निर्णय, तसेच सदस्यसंख्या ९ वरून १५ करण्याचा निर्णय अधिवेशनामध्ये झाला. राज्य महिला आयोग आणि उपसभापती कार्यालय यांनी मिळून नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली. काम करण्याच्या संदर्भामध्ये महिला आयोगाची माहिती व्हावी, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ज्या अडचणी असतील त्याचं निराकरण व्हावे आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करावे, यावर चर्चा केली. तसेच पालघर, नंदुरबारमधील शाळांमध्ये आढळलेला खराब पोषण आहार, बालकांचे कुपोषण या घटनांचा विशेष उल्लेख करत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशांवरही चर्चा केली. दर्जेदार आहार मिळावा यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा निर्देशही त्यांनी दिला. भविष्यकाळात स्त्रियांच्या चळवळीत, राजकारणात अनाथ मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येईल. अनाथ मुला-मुलींचे विवाह जमविण्यासंबंधी राज्यातील विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाले.

पंडित बबनराव हळदणकर स्मृती ‌‘स्वरआदरांजली‌’ मैफलीचे रविवारी आयोजन

0
Newsworldmarathi Pune : आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे रविवार, दि. 29 डिसेंबर रोजी ‌‘स्वरआदरांजली‌’ या शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. गायन मैफल सकाळी 9 वाजता लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक मानस विश्वरूप आणि विख्यात गायिका कविता खरवंडीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. कलाकारांना उदय कुलकर्णी (संवादिनी) आणि धनंजय खरवंडीकर (तबला) हे साथसंगत करणार आहेत, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. युगंधरा ही पंडिता शुभदा पराडकर यांची शिष्या आहे. पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‌‘जुळू पाहणारे दोन तंबोरे‌’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध गायक पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली मेट्रो स्टेशनची पाहणी

0
Newsworldmarathi Pune : नुकतेच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलणे, न बदलणे हा केंद्राचा विषय आहे. पण साधारणत: दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारणी बदलत असते. ही लोकशाही प्रक्रिया आता आमच्याकडे सुरू आहे. पक्ष सदस्यता मग, सक्रिय सदस्यता आणि लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर निवडणुका होत असतात. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला.यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला. त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो. पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून, मेट्रोने प्रवास देखील करत आहोत.६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरु आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल. पुणे शहरात दोन महापालिकांच्या प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले, याचा अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराचे सर्वच प्रश्न माहीत आहेत. पण आम्ही १५ जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागितली आहे. याच्या एक आठवड्यापूर्वी पुण्याचे महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रश्न आम्ही त्यांना देणार आहोत. ३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही आशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे, म्हणून दोन महानगरपालिका केल्या पाहिजेत आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर समोर मांडणार आहोत. पाटील यांना पुरंदर विमानतळा संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या सर्व परवानग्या झाल्या असून, भूसंपादनाबाबत गती पकडावी लागणार आहे. याला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, या विषयात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय करतात. तसेच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील. तसेच आमच्या पालकमंत्री पदाच्याबाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला आहे.

परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने प्रो कबड्डी लीगच्या स्पर्धाकांसोबत परिसंवाद

0
Newsworldmarathi Pune : खेळाडूंच्या पोषाख निर्मितीमधील एक लोकप्रिय ब्रॅण्ड असलेल्या आणि प्रो कबड्डी लीगचे एक सहयोगी प्रायोजक असलेल्या परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने लीगमधील स्टार खेळाडूंना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आणि खेळाडूंना शुभेच्छा सत्राचे खास आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात तमिळ थलैवाजचा सचिन तंवर, गुजरात जाएंटसचा राज साळुंके आणि दिल्ली दबंगच्या योगेश दहियाचा समावेश होता. या ६० मिनिटांच्या कार्यक्रमात चाहत्यांना लीगमध्ये खेळणाऱ्या कबड्डीपटूंचे वैयक्तिक जीवन, कौशल्य आणि उत्कटता याविषयी जाणून घेता आले. कार्यक्रमाची सुरुवात छोट्याशा स्वागताने झाली. त्यानंतर चाहत्यांच्या कबड्डी ज्ञानाची चाचणी घेणारी एक स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर प्रश्नेत्तराच्या सत्रात खेळाडूंनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास, दैनंदिन दिनचर्या, सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा या विषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व्यावसायिक कबड्डीच्या दुनियेतील एक वेगळीच झलक दिसून आल्याने चाहते मोहित झाले होते. त्याचबरोबर कबड्डी पर्वाविषयीचे ट्रुथ आणि डेयर, रोमांचक तंदुरुस्ती आवहाने आणि कबड्डीची थीम असलेल्या ट्रिव्हिया अशा विविख कार्यक्रमात चाहते खेळाडूंसोबत सामील झाले होते. दडपणाखाली झालेल्या सामन्यात शारीरिक तंदुरुस्ती, मानिसक लवचिकता कशी राखली या विषयी खेळाडूंनी चाहत्यांना माहिती देत मार्गदर्शन केले. या सगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांना खेळाडूंशी संवाद साधण्याची मान्यता देण्यात आली. उपस्थित चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूसोबत अविस्मरणीय क्षण टिपण्याची संधी देत आणि त्यांची सही मिळवून देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभागी खेळाडूंना परिमॅच स्पोर्ट्सच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. पीकेएलचे सहयोगी प्रायोजक आणि खेळाडूंचा ब्रॅण्ड म्हणून कबड्डी चाहत्यांचा अनुभव वाढवणे आणि त्यांना आवडणाऱ्या खेळाच्या जवळ आणणे हे आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ खेळाडूंचाच गौरव केला नाही, तर कबड्डीला देशभरातील एक प्रिय खेळ बनवणाऱ्या चाहत्यांचाही सन्मान केला, अशी परिमॅच स्पोर्ट्सच्या कार्यालयाच्या वतीने टिप्पणी करण्यात आली.

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक कला महोत्सव

0
Newsworldmarathi Pune : मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर… कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन… प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण… भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन… वारकरी वेशात हरिनामाचा गजर अन देशभक्तीपर गीतांचा गहिवर… नेत्रदीपक नृत्याविष्कार… विद्यार्थ्यांतील कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट अन भरभरून कौतुक! निमित्त होते, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे! सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षिणक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली. विविध कला, परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कोळी नृत्य, कव्वाली, पाणी अडवा पाणी जिरवा, मिशन मंगलम, खंडोबाचा जागर, महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केले. मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका, विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले. देशभक्तीपर गीतांतून ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लाऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे, प्रशांत नेटवटे, संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण, पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण, भीमराव बंडोजी चव्हाण, सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालिका सुनिता काकासाहेब चव्हाण, हर्षदा अनिकेत चव्हाण, रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार, विलास खाडे, माधव काकडे, डॉ. सुनीता चव्हाण, दीपक खेडकर, वंदना काकडे, मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. “धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेली २५ वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजिला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या एकत्रित मेहनतीमुळे यंदाचा महोत्सव अतिशय दर्जेदार झाला आहे.” – काकासाहेब चव्हाण, अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान

तांदळाच्या नवीन सीझनमध्ये आंबेमोहोरच्या भावात तेजी

0
Newsworldmarathi Pune : पुणेकरांच्या विशेष पसंतीच्या आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन सीझनच्या सुरवातीलाच गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० % ने वाढून घाऊक बाजार पेठेत ८००० ते ९००० रु. प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. मागील वर्षी सीझनच्या सुरुवातीला हे दर ७००० ते ७५०० निघाले होते. यावर्षी साधारणतः ५०० ते १००० रुपये प्रति क्विंटलने आंबेमोहोर तांदळाची भाववाढ झाली आहे. या भाववाढीचे प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळा वरची निर्यात बंदी उठवली. तसेच त्यावेळी असणारे २० टक्के निर्यात कर सुद्धा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आंबेमोहोर तांदळाला परदेशातून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८०% तांदूळ हा मध्य प्रदेश मधून तर उर्वरित २०% तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याच बरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी जागेवरच अधीक प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे वरील भाववाढ झालेली आहे. साधारणतः डिसेंबर महिन्याच्या शेवटी नविन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरवात होते. सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रु. प्रति किलो महाग खरेदी करावा लागणार आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळापैकी आंबेमोहोरला चांगली मागणी आहे. यावर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास हा एक विक्रम होईल. त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचे दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे असा अंदाज ही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. महाराष्ट्रात कामशेत, भोर याभागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. परंतू हा तांदूळ पिकणाऱ्या पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे. अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी दिली.

पुण्यात होणार दोन महापालिका? मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान..

0
Newsworldmarathi Pune : महापालिकेत हद्दीलगतच्या गावांच्या समावेशानंतर राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेवरील प्रशासकीय ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी उशीर न करता पुणे महापालिकेचे विभाजन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मांडली. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत असल्याने तेथेही वेगळी पालिकेची गरज अधोरेखित करून, पुण्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना पाटील व तुपे यांनी ही भूमिका मांडली. पुणे महापालिकेच्या परिसरात प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण पाहता व ३२ गावांच्या समावेशानंतर पालिका प्रशासनावरील वाढलेला ताण पाहता पुण्यासाठी आणखी एका महापालिकेची गरज आहे, ही भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने लावून धरली आहे. पाटील व तुपे यांनीही या भूमिकेचे समर्थने केल्याने सरकार लवकरच याबाबत सकारात्मक पाऊल टाकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. सुमारे तीन वर्षांपासून पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रशासकराज आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांची कामे अडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयातील याचिकांचा निकाल जानेवारीत अपेक्षित आहे. त्यानंतर प्रभागरचना, हरकती सूचना यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा असतील. मे महिन्याच्या आसपास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांना न्याय देता येईल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकांच्या तारखांचे सूतोवाच केले. पूर्व, पश्चिम पुणे महापालिका ‘पुणे सुपरफास्ट वेगाने विस्तारत आहे. पुण्याची वाढ कोणी रोखू शकणार नाही. आत्ताच मोठ्या प्रमाणावर समस्या जाणवू लागल्या आहेत. २५ वर्षांनंतर काय परिस्थिती असेल, सांगता येत नाही. गुंठेवारी वाढत राहिली, तर नव्याने विकसित होणाऱ्या भागांत कोणत्याही आरक्षणांसाठी जागाच उरणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुणे शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूंना नव्या महापालिका करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल,’ असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले.

ख्रिसमस सणानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

0
Newsworldmarathi Pune : ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत रहावी म्हणून २४ व २५ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही दिवस सायं. ७ वा. ते गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहेत. याअंतर्गत वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी मार्गाकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तीनतोफा चौक सरळ लष्कर पोस्ट अशी वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गाने पुढे सोडण्यात येईल, असे आदेश पुणे वाहतूक. शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.

माजी उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या प्रयत्नातून बोपोडी येथे शव वाहिनी

0
Newsworldmartahi Pune माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून बोपोडी येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक गॅस शवदाहिनी आणि प्रदूषण रोधक चिमणीचे लोकार्पण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम, निलेश वाघमारे, सचिन चव्हाण ,ज्वेल अँथोनी, रुपेश पिल्ले, रिकेश पिल्ले, संजय पिल्ले, बाळू मोरे, बापू रणदिवे, आप्पासाहेब वाडेकर, कलावती भंडारी, नंदा निकाळजे, आरती देठे आणि परिसरातील नागरीक व पदाधिकारी उपस्थित होते. “मुळा आणि पवना नदीच्या संगमावर असलेल्या मुक्ती धाम स्मशानभूमी बोपोडी येथे पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्यात गेल्याने नागरिकांचे अंत्यविधीसाठी हाल होत होते. म्हणून या ठिकाणची गॅस शवदाहीनी पहिला मजला बांधून वर नव्याने बांधण्यात बसविण्यात आली आहे. यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली ,तरी सुद्धा नागरिकांना इतरत्र अंत्यविधीसाठी जावे लागणार नाही असे आश्वासन यावेळी माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी दिले.

मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर

Newsworldmarathi Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रीपदांची सुत्रे हाती घेताच आज मंगळवारी (दि.24) मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरियंटेड’ काम करण्याचे निर्देश त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात ‘वित्त व नियोजन’ विभागासह ‘राज्य उत्पादन शुल्क’ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी, तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या. करसंकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील परंतु कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सविस्तर आढावा घेतला. राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.