महाराष्ट्रातील तीन तरुणांचा अमेरिकेत डंका; दोन वर्षांत 5 रेस्टॉरंट!

0
Newsworldmarathi Pune : कोरोना महामारीमुळे हाॅटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊन देखील संधी मिळताच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील साहिल बढे व शिर्डीचा निरज फापाळे यांनी 2023 मध्ये अमेरिकेत ऑस्टीन येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवली. या हाॅटेलमध्ये एक वर्ष नोकरी केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये खाजगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत असताना अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंटमध्ये प्रचंड बिझनेस ग्रोथ व मोठी संधी असल्याचे साहिल व निरज यांच्या लक्षात आले.
Oplus_0
याच कालावधीत ठाण्याचे शेखर रिकामे यांची साहिल व निरज यांना साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी एक नाही तर तब्बल पाच रेस्टॉरंट सुरू केले आहेत. साहिल बढे यांने पुण्यात एसएसपीएमएस काॅलेजमध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच कोरोना महामारी आली व दोन वर्षे शिक्षणाला ब्रेक लागला. लाॅक डाऊनमुळे परदेशात इंटर्नशिपसाठी आलेली संधी व व्हीसा रद्द करावा लागला. परंतु 2023 मध्ये परिस्थिती सुधारल्यावर थेट नोकरीसाठी अमेरिकेतील ऑस्टीन शहरातील एक पंचतारांकित हाॅटेल मध्ये संधी मिळाली. येथेच साहिलीची ओळख शिर्डीचा निरज यांच्या सोबत ओळख झाली. या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाच या दोन मित्रांनी अमेरिकन एक वाहन खरेदी करून नोकरी वरून सुटल्यानंतर कुरिअर, हाॅटेल पार्सल पुरविण्याचे काम देखील केले. या कामामुळे लवकर संपूर्ण ऑस्टीन शहर व लगतच्या परिसराचा चांगला परिचय व अभ्यास देखील झाला. एक वर्षांच्या जे- वान (J-1) व्हीसवर काम केल्यानंतर ऑस्टीन येथील एका खासगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये साहिल व निरज ने नोकरी पत्करली. व्हीसचा विषय अंत्यत सफाई पणे हातळला. याच कालावधीत साहिल व निरज यांची शेखर रिकामे यांच्याशी ओळख झाली व ऑस्टीनमध्ये पार्टनरशिप मध्ये इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्याची ऑफर दिली. साहिल व निरज यांची कष्ट करण्याची तयारी होती व शेखर रिकामे यांनी विश्वास दाखविल्यावर त्वरित पार्टनरशिपमध्ये हाॅटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंचतारांकित हॉटेलचा एक वर्षांचा ऑस्टीन शहरातील अनुभव व कुरिअर सेवेमुळे झालेला शहराचा परिचय व खडानखडा माहिती नवीन हाॅटेल सुरू करताना खूप उपयोगी ठरले. शेखर रिकामे यांच्या सोबत साहिल व निरज यांनी ऑस्टीन शहरामध्ये पहिले . …” टीका हाऊस” नावाने पहिले रेस्टॉरंट सुरू केले. पहिल्या दोन तीन महिन्यांतच टीका हाऊस इंडियन रेस्टॉरंट ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अतिवृत्कष्ट जेवण, फास्ट सर्विस मुळे लगतच्या शहरांमध्ये टीका हाऊस ची चर्चा सुरू झाली व मागणी देखील वाढली. याच संधीचा फायदा घेत व शेखर रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल व निरज यांनी दोनच वर्षांत टिक्का हाऊस ऑस्टिन डाउनटाउन , टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन , टिक्का हाऊस वाको , टिक्का हाऊस एक्सप्रेसवे, टिक्का हाऊस लेकवे रेस्टॉरंट सुरू करण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी परदेशात जाऊन भारतातील व स्थानिक तब्बल 60_70 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; ५ जुलैला मुंबईत मोर्चा

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. ५ जुलै रोजी मुंबईत या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक एकत्र येण्याची घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केली. यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती दिली. राऊत यांनी सांगितले की, “राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता एकमेकांच्या भूमिकेचा आदर केला असून, दोघेही मातृभाषेच्या मुद्द्यावर एकमताने पुढे आले आहेत.” त्यांनी याला एक भावनिक आणि भाषिक अस्मितेचा लढा असल्याचे म्हटले. राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात असलेले वातावरण लक्षात घेता, ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ५ जुलैचा मोर्चा मातृभाषेच्या रक्षणासाठी आणि शैक्षणिक स्वायत्ततेच्या समर्थनार्थ असणार आहे. या एकत्रित आंदोलनामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडीपर्यंत मेट्रो विस्ताराला मंजुरी

0
Newsworldmarathi Pune शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे मेट्रोच्या दोन विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी या मार्गांचा समावेश असून, या निर्णयामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय सुधारणा होणार आहे. वनाज ते चांदणी चौक हा मार्ग पश्चिम पुण्याला जोडणारा असून, या भागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता हा मेट्रो मार्ग अत्यंत आवश्यक ठरत होता. दुसरीकडे, रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्ग हा दक्षिण पुणे व परिसरातील नागरी भागांशी मेट्रोचे जाळे जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या विस्तारीत मार्गांसाठी केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी मिळाल्याने, प्रकल्पाच्या कामांना आता गती मिळणार आहे. पुणे मेट्रोचे हे विस्तार टप्पे भविष्यातील ट्रॅफिकची समस्या कमी करत पर्यावरणपूरक व जलद वाहतूक पर्याय उपलब्ध करून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मेट्रोच्या माध्यमातून अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद प्रवासाची अपेक्षा बळावली आहे. लवकरच या मार्गांचे काम सुरू होणार असून, या प्रकल्पांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; भाजप नेते प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

0
Newsworldmarathi Pune: काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता भाजपच्या एका आमदाराच्या समर्थकाने थेट महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या या घटनेत, भाजप नेते प्रमोद कोंढरे यांनी ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी अनुचित वर्तन केले, असा आरोप आहे. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यात हे वर्तन स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरासखाना पोलीस ठाण्यात प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेनंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे तपासात घेतले जात आहेत.

दक्षिणद्वारी भगवा ध्वज उभारणीस आयुक्त सकारात्मक; ‘राष्ट्रवादी’ गड किल्ले संवर्धन सेलचा प्रस्ताव

0
Newsworldmarathi Pune: शिवकालीन ऐतिहासिक पुणे शहराच्या दक्षिण द्वारी कात्रज घाटाच्या जुना कात्रज बोगदा परिसरात उत्तुंग भगवा ध्वज उभा करावा या ‘राष्ट्रवादी’ गडकिल्ले संवर्धन सेल च्या मागणीला पुणे महापालिकेचे आयुक्त सकारात्मकता दर्शवली आहे. राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांनी वसवलेलं तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पावन झालेल्या पुणे शहराच्या दक्षिण द्वारी उत्तुंग ‘भगवा ध्वज’ उभारण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना दिले. नवनियुक्त आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे स्वागत व सन्मान करण्याच्या निमित्ताने संवाद साधण्यात आला. राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे शाल व छत्रपती संभाजी महाजांची मुर्ती देवून सन्मान करण्यात आला. शिवकालीन कात्रजच्या घाटाचे महत्व भावी पिढ्यांच्या स्मरणात सदोदित राहावे म्हणून कात्रज जुना बोगदा परिसरात ‘उत्तुंग भगवा ध्वज’ उभा करावा तसेच दक्षिण भारतातून शहरात येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करणारी ‘स्वागत कमान’ उभारावी या आशयाचे निवेदन आयुक्तांना दिले. शेलार यांच्या संकल्पनेचे स्वागत करून आयुक्तांनी भगवा ध्वज उभारण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्याचवेळी महापालिकेसमोर असलेली असंख्य आव्हानं पेलताना लोकसहभाग वाढवा यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील ‘मोहल्ला कमीटी’ अधीक सक्षम व्हावी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून शेलार यांनी मोहल्ला कमीटीच्या बैठकित नागरिकांनी मांडलेले सर्व समस्या त्याच महिन्यात सोडवल्या जाव्यात याबाबतचेही निवेदन दिले. झपाट्याने वाढलेल्या पुणे शहरातील समस्या सोडवण्यासाठी विभागवार नियोजन करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. सेलचे पदाधिकारी मनोजकुमार भोसले,अविनाश जाधव,महेंद्र देवघरे, कुणाल शेलार हे उपस्थित होते.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक: ‘ब वर्ग’ गटातून अजित पवारांचा दणदणीत विजय

0
Newsworldmarathi Baramati: बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून पहिला निकाल जाहीर झाला आहे. ‘ब वर्ग सभासद प्रतिनिधी’ गटातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. त्यांनी ९१ मतांची आघाडी घेत आपल्या विरोधकाचा मोठ्या फरकाने पराभव केला. एकूण १०२ मतांपैकी १०१ मते वैध ठरली, त्यामध्ये अजित पवारांना ९१ मते मिळाली तर विरोधी उमेदवाराला केवळ १० मते प्राप्त झाली. ही मते ‘ब वर्ग’मधील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली आहेत. या निकालामुळे अजित पवारांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या सत्तेसाठी चार प्रमुख पॅनेल्स रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे पॅनेल, तसेच शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, ती बारामतीतील सत्तासंघर्षाचे प्रतीक बनली आहे. अजित पवारांच्या या विजयामुळे त्यांच्या पॅनेलला उत्साह मिळाला असून आगामी निकालांवरही या यशाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून पुढील मतमोजणीच्या टप्प्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र व राज्य शासनाला मागणी

Newsworldmarathi Mumbai: मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) या खेळातील एका महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपानंतर निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस, रचनात्मक व परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी १८ जून २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात पीडित खेळाडूचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून, पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाने संबंधित क्रीडा संस्थांच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या भूमिका अत्यंत निष्क्रिय असल्याचे नमूद केले आहे. या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी मा. मुख्यमंत्री व मा. केंद्रीय क्रीडामंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ना राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी, ना भारतीय ऑलिंपिक संघटनेने पीडित महिला खेळाडूला कोणतीही मानसिक, कायदेशीर अथवा संस्थात्मक मदत दिली आहे.” अशा घटनांमुळे देशातील महिला खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांच्या सन्मान व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या व यापूर्वीच्या मेरठ मुरादाबाद, दिल्ली, आसाम, हरियाणा, तामिळनाडू येथील महिला खेळाडूंवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत न्यायालयाने वेळोवेळी दखल घेऊन आदेश दिले आहेत. यावरून सदर विषयाचे गांभीर्य लक्षात येते. डॉ. गोऱ्हे यांनी या निवेदनाद्वारे काही ठळक मागण्या मांडल्या आहेत. सर्वप्रथम, महाराष्ट्र व देशभरातील सर्व क्रीडा महासंघांचे स्वतंत्र ICC लेखापरीक्षण तातडीने करावे. महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्याचे केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे नियंत्रण करावे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पदाधिकाऱ्यांना निलंबित करून, पीडितेच्या सुरक्षेची सर्व माहिती जाहीर करावी. तसेच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या Safe Sport धोरणाच्या धर्तीवर भारतात संरक्षण निती लागू केली जावी. POSH (Workplace Sexual Harassment) कायद्यानुसार सर्व राज्यात विशेष प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवले जावेत. खेळाडूंना तातडीने मदत मिळावी यासाठी २४x७ टोल-फ्री हेल्पलाइन कार्यान्वित करून कायदेशीर सल्ला व समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय क्रीडा संचालन विधेयक २०२४ मध्ये महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसंदर्भात स्वतंत्र आणि बंधनकारक तरतुदी समाविष्ट कराव्यात. तसेच, मा. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या आधारे संबंधित राज्यातील धोरणांचे अभ्यास करून त्यातील प्रभावी बाबी महाराष्ट्रात लागू कराव्यात. राज्यात स्वतंत्र क्रीडा संचालन विधेयक तयार करून अभ्यास समितीच्या मदतीने व्यापक धोरण निश्चित करावे, अशीही डॉ. गोऱ्हे यांची भूमिका आहे. “महिला खेळाडूंच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. कायद्यातील तरतुदी केवळ कागदापुरत्याच राहू नयेत, तर त्यांच्या अंमलबजावणीस कठोरतेने हाताळले जावे,” असे ठाम मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याने, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आले असता काकासाहेब गाडगीळ पुतळा, शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. रासने यांनी निवेदन देत प्रकल्प उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे शहरातील मध्यवर्ती आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे मार्ग असून, दररोज लाखो वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असते. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे दोन्ही रस्ते दक्षिणोत्तर मार्गाचा महत्वाचा दुवा असून भविष्यात ‘लिंक कोरिडॉर’ म्हणून उपयोग होण्याची क्षमता बाळगतात. या पार्श्वभूमीवर ‘भुयारी चौपदरी मार्ग’ हा पर्यावरण रक्षण, ऐतिहासिक वारसा जपणूक आणि वाहतूक सुलभीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सुरुवात केली असून, निधीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले “शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या शहराच्या मध्यवर्ती मार्गांवर कायम वाहतूक कोंडी जाणवत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे 2.5 किमी लांबीचा, चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण सहकार्य मिळत असून केंद्र शासनाच्या सहकार्याने देखील हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी मा. नितीन गडकरी यांना निवेदन देत निधीची विनंती केली आहे. हा भुयारी मार्ग माझं स्वप्न असून तो पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर विशेष मदत मिळावी, अशी विनंतीही आमदार हेमंत रासने यांनी यावेळी केली.

माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवकांना रेनकोट आणि नागरिकांना छत्री वाटप

0
Newsworldmarathi Pune: “समाजाच्या गरजा ओळखून योग्य त्या योजना राबवणे, ही माझी कायमची भूमिका आहे. कोथरुडमध्ये अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात असून, माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी याच भूमिकेची पूर्तता केली आहे. त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट आणि प्रभागातील नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत दीपक पोटे म्हणाले, “माणुसकीची जाण आणि निस्वार्थ सेवा हेच आमचं ब्रीद आहे. समाजातील गरजूंना वेळोवेळी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे. ही गरज ओळखून आम्ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. यंदा माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवक आणि नागरिकांसाठी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले. पावसात सेवा बजावणाऱ्या हातांना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.” या कार्यक्रमावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रतीक देसरडा, माजी नगरसेवक जयंत भावे, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, अ‍ॅड. मिताली सावळेकर, प्रशांत हरसुळे, गिरीश खत्री, अमोल डांगे, दीपक पवार, अ‍ॅड. प्राची बगाटे, मंदार बलकवडे, अनुराधा एडके, आशिष काटे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाटे पब्लिक स्कूल, तळजाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
Newsworldmarathi Pune : चाटे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तळजाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने रिमझिम पावसाच्या साक्षीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वंदना सत्राने झाली. या प्रसंगी संस्थापक प्रा. फुलचंद चाटे, वैशाली चाटे, योग प्रशिक्षक वाल्मिक व प्रियोत्तमा मांडवडे, प्राचार्य नवनीत राजपाल, योग प्रशिक्षिका आदिती मांडवडे, सहजयोग पुणे संघाचे आयोजक विलास कडू पाटील, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या ज्योती सनस, मृदुला बोराले, सीमा देशमुख, तृप्ती टोके, संगीता शहापुरे, जयश्री, रेनुका आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, पद्मासन यांसारख्या विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा सत्रात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रा. फुलचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांनी दररोज योग सराव करून शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करावे. मोबाईल आणि सोशल मिडियाच्या आहारी जाऊ नये, यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे.” शाळेत वर्षभर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. योग सादरीकरणात सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका नवनीत राजपाल, प्रा. रणजीत जगताप, क्रिडा शिक्षक ओंकार खिलारे व राजेंद्र वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रेश्मा पठाण तर आभारप्रदर्शन लक्ष्मी बोरबंडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.