मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वतीने हेल्थ कार्ड वाटप
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील व भाजप उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) अंतर्गत मोफत हेल्थ कार्ड वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा आज दुसरा दिवस यशस्वीपणे पार पडला असून, प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळविण्याचा मार्ग मोकळा होत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षभरात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात, हे लक्षात घेता हे हेल्थ कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे असून, या शिबिरामुळे अनेक कुटुंबांना आरोग्य संरक्षणाचा हक्क मिळणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम हे केवळ सामाजिक बांधिलकी नव्हे तर सार्वजनिक हिताचे उत्तम उदाहरण आहे.
हे हेल्थ कार्ड वाटप शिबीर पुढील तीन दिवस सुरु राहणार असून, प्रभागातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन नागरिकांनी ठरविलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे, असेही आवाहन अर्चना पाटील व तुषार पाटील यांनी केले.
“पुणेची मेट्रो निवडणुकीसाठी बिहारला?; युवक काँग्रेस आक्रमक”
Newsworldmarathi Pune: बिहारची निवडणूक तोंडावर असल्याने मतदारांना खुश करण्यासाठी पुण्याची मेट्रो बिहारला पळवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीपूर्वी पाटणा मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने राजकीय दबावाला बळी पडत पुण्यासाठी राखीव असलेली मेट्रो गाडी तीन वर्षांच्या भाडेकरारावर बिहारला दिल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. ही मेट्रो गाडी तात्काळ पुण्यात परत आणली नाही, तर महामेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आबनावे यांनी दिला.
प्रथमेश आबनावे म्हणाले, “शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणे मेट्रो अधिक सक्षम व विस्तारित करण्याची गरज आहे. आजघडीला दररोज सरासरी १.८० लाख प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत. गाड्यांची वारंवारिता वाढवण्यासह प्लॅटफॉर्मवरील गर्दी आणि नव्याने सुरु होणाऱ्या मेट्रो मार्गिका यांसाठी राखीव गाड्यांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. मात्र, पाटणा मेट्रोला ट्रायलसाठी सध्या स्वतःची मेट्रो ट्रेन नसल्याने पुण्याची ट्रेन तिकडे पाठवण्यात आली. हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधीना विश्वासात घेतले का? हा प्रश्न आहे. तसेच भाडेकराराच्या अटी नेमक्या काय आहेत?, पुण्यासाठी नवीन ट्रेन संच कधी येणार आहे आणि बिहारला दिलेली मेट्रो ट्रेन परत येणार आहे का? याबाबत आम्हाला शंका आहे.”
“पुणे मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या ३४ मेट्रो ट्रेन संचांपैकी एक राखीव संच (तीन डब्यांची मेट्रो ट्रेन) महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी भाडेतत्वावर पाठवला आहे. सदर ट्रेन आता बिहारमधील गीतागड येथील डेपोत आहे. त्यामुळे आता फक्त ३३ संच पुणे महामेट्रोकडे उपलब्ध आहेत. इथे मेट्रो ट्रेनची गरज असताना बिहारला मेट्रो ट्रेन पाठवणे अयोग्य आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुण्याच्या विकासावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ही मेट्रो बिहार निवडणुकीपूर्वी सुरू होणाऱ्या मेट्रोसेवेचे श्रेय घेण्यासाठी पळवण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुण्याची मेट्रो सेवा अजून अपूर्ण आहे. प्रवासीसंख्या वाढत आहे. नवीन मार्ग सुरू होणार आहेत. अशावेळी ही मेट्रो बिहारला पाठवणे म्हणजे पुण्याच्या विकासाला मागे टाकणे आणि बिहारसारख्या राज्याच्या राजकीय अजेंड्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसेवेला दुय्यम स्थान देण्यासारखे आहे.प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
“दीपक टिळक यांच्या जाण्याने टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे विचारवंत प्रतिनिधित्व हरपले; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”
Newsworldmarathi Pune: लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त व संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आज त्यांनी टिळक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व या कठीण प्रसंगी कुटुंबियांना धैर्याने उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “टिळक घराण्याच्या तेजस्वी परंपरेचे ते प्रभावी आणि विचारवंत प्रतिनिधी होते. शिक्षण, पत्रकारिता व समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय आहे. ‘केसरी’ चे संपादक म्हणून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितवादी विचारधारेला आधुनिक समाजात अर्थपूर्ण पद्धतीने पेरले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण, मूल्य आणि संस्कारांची दिशा दिली.”
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रतिभाशाली विचारवंत, कुशल प्रशासक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावले असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
या दुःखद प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी टिळक कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या व ईश्वराने या कठीण काळात कुटुंबियांना धैर्य द्यावे, अशी प्रार्थना केली.
युवक कल्याण खाते ‘शासनाला कळलंच नाही’ – मंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यानं खळबळ
Newsworldmarathi Pune: “युवक कल्याण खाते हे शासनाला काय कळलेच नाही!” – राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या या विधानाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे. इंदापूर शहरात दहीहंडी पथकाच्या गोविंदाना मॅट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
भरणे यांनी जाहीरपणे कबूल केले की, आजवर युवक कल्याण खात्याला शासनाकडून योग्य गांभीर्याने पाहिलंच गेलं नाही. “आता हे खाते जोरात सुरू करणार आहोत,” असं सांगत त्यांनी एकप्रकारे शासनाच्या दुर्लक्षावर शिक्कामोर्तबच केलं आहे. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की, हे खाते आजवर केवळ नावापुरतंच का होतं?
राज्यातील तरुण वर्ग बेरोजगारी, नैराश्य, व्यसनाधीनता आणि क्रीडा सुविधांच्या अभावासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जात असताना त्यांच्यासाठी असलेल्या खात्याकडे शासनानेच दुर्लक्ष केलं, हे अत्यंत दु:खद चित्र मंत्र्यांच्या वक्तव्यातून समोर आलं आहे.
पूर्वीच्या सरकारांनी युवक कल्याण खात्याची केवळ कागदोपत्री पूर्तता केली आणि मूळ उद्दिष्टांची अंमलबजावणी केलीच नाही, हे आता स्पष्ट होतंय. ‘खरं काम आता सुरू होईल’ असं मंत्री म्हणत असले तरी हे केवळ भाषणातच राहतं की प्रत्यक्ष कृतीतही दिसतं, याकडे राज्यातील युवकांचे लक्ष लागले आहे.
शेवटी मोठा सवाल हाच — जर आता खाते “जोरात” सुरू होणार असेल, तर आजवर ते निष्क्रिय होतं, हे खुद्द मंत्र्यांच्याच तोंडून स्पष्ट झालं. मग या निष्क्रियतेला जबाबदार कोण?
“राज ठाकरे-निशिकांत दुबे यांच्यात भाषावादाचा नवीन अध्याय
Newsworldmarathi Mumbai: राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात नुकत्याच झालेल्या भाषावादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. निशिकांत दुबे यांनी “राज ठाकरे यांना हिंदी मी शिकवली” असा टोला लगावत मराठी-हिंदी भाषावादाला खुमासदार वळण दिलं. यावर राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राज ठाकरे यांनी आपल्या सभेत स्पष्ट शब्दांत सांगितलं, “महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकावीच लागेल.” दुबे यांचे आरोप आणि प्रतिउत्तरांमुळे सोशल मीडियावरून ते गावोगावी चर्चेचा विषय बनला आहे.
या वादातून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात भाषा-राजकारण रंगत आहे. आता हा वाद नेमका कुठवर जातो, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
ऑन ड्युटी मटण पार्टी! सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘सर्किट’ शो
Newsworldmarathi Pune: निवडणुकांचे पडघम वाजू लागले की कार्यकर्ते ‘भोजनसमारंभात’ बुडतातच, पण आता सरकारी अधिकारीही त्याला अपवाद राहिलेले नाहीत!
आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दक्षिण विभागाकडून साक्षात कार्यालयीन वेळेतच सर्किट हाऊसमध्ये ‘आखाड पार्टी’चे आयोजन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दुपारी एक वाजल्यापासून तब्बल चार वाजेपर्यंत विभागाचे जवळपास सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्किट हाऊसच्या बिर्याणीवर ताव मारताना दिसले. कार्यालयाच्या खिडक्या बंद, खुर्च्या रिकाम्या आणि फोनही न उचलणाऱ्या स्थितीने नागरीक हैराण झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे नेतृत्व दक्षिण विभागाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनीच केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी कार्यालयातील कामकाज पूर्ण ठप्प झाले होते. सार्वजनिक हिताच्या कामाकडे पाठ फिरवून सरकारी यंत्रणेकडून मस्त मजा मारल्याची चर्चा रंगली आहे.
दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलण्याचेही कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे अधिकृत भूमिका मिळालेली नाही.
“हे सरकारी खाऊ आहे का खासगी दावत?” – जनतेचा सवाल
ही घटना समोर आल्यानंतर नागरीक संतप्त झाले आहेत.“ही लोकांची पगारावर मजा मारणारी यंत्रणा आहे का बिर्याणी खाणारी संस्था?”असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
सायारा चित्रपटाची जोरदार एण्ट्री
Newsworldmarathi Mumbai: मोठ्या अपेक्षांनिशी प्रदर्शित होत असलेल्या सायारा या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अहान पांड्य आणि नवोदित अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा १८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली असून, प्री-बुकिंगमध्ये मोठी उसळी पाहायला मिळते आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘सायारा’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुमारे २४ कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज आहे.
🎬 मोठ्या पडद्यावर प्रेम, सस्पेन्स आणि संगीताची तिहेरी मेजवानी
‘आशिकी २’ आणि ‘एक विलन’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक मोहित सूरी यांनी सायाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोमँटिक थ्रिलरमध्ये आपला ठसा उमटवला आहे. चित्रपटातील गाणी विशेष गाजत असून, यूट्यूबवर रिलीज झालेल्या “तू सायारा, मी दिवाना…” या टायटल साँगला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
🎟 प्री-बुकिंग जोरात
• प्रीमियम मल्टिप्लेक्समध्ये सायारासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग
• विशेषतः पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू येथे शो ‘हाऊसफुल’
• तरुण प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ
🗣️ सिनेमा समीक्षक काय म्हणतात?
चित्रपट ट्रेलर, संगीत आणि स्टारकास्ट यांमुळे सायाराबद्दल उत्सुकता वाढली आहे. अहान पांड्य याची हे पदार्पण असूनही त्याच्या अभिनयाची चर्चा जोरात आहे. अनीत पड्डानेही आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रभाव टाकला असल्याचं समीक्षकांचं मत आहे.
🎥 चित्रपटाची माहिती एका झटक्यात
• दिग्दर्शक : मोहित सूरी
• प्रमुख कलाकार : अहान पांड्य, अनीत पड्डा
• संगीत : मिथुन, अंकित तिवारी
• प्रकार : रोमँटिक थ्रिलर
• रिलीज तारीख : १८ जुलै २०२५
प्रकाश जगताप यांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
Newsworldmarathi Pune: हवेली तालुक्यातील राजकारणात जेष्ठ नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रकाश चंद्रकांत जगताप यांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका घेणाऱ्या प्रकाश जगताप यांना ही जबाबदारी मिळाल्याने कृषी बाजार समितीच्या कामकाजात अनुभव आणि दिशा यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीनंतर जगताप यांनी “शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक व कार्यक्षम कारभार राबविण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी प्रतिक्रिया दिली.
हवेली तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेली अनेक दशके सक्रिय असलेले प्रकाश जगताप हे संयमी नेतृत्व, प्रशासनातील अनुभव आणि शेतकऱ्यांशी असलेली जवळीक यासाठी ओळखले जातात. त्यामुळे ही निवड स्वागतार्ह असून बाजार समितीच्या कामकाजास नवसंजीवनी मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
सभापती पदासाठी अन्य कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील एक महत्त्वाची संस्था असून तिच्या माध्यमातून हजारो शेतकरी व व्यापाऱ्यांचे व्यवहार रोजच्या रोज होत असतात. अशा संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी आता प्रकाश जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे
बॅंकेतच केली मॅनेजरने आत्महत्या; बारामतीच्या बॅंक ऑफ बडोदामधील धक्कादायक प्रकार
Newsworldmarathi Pune: बॅंक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय ५२, मूळ रा. रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश, सध्या रा. बारामती ) यांनी मध्यरात्री बॅंकेतच गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मित्रा यांन पाच दिवसांपूर्वीच बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाढत्या तणावातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
चिठ्ठीमध्ये त्यांनी मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बॅंक ऑफ बडोदा, बारामती. मी आज बॅंकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहेत. माझी बॅंकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱयांवर अतिरिक्त दबाव टाकू नका, सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात. मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वच्छेने करत आहे. त्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये, फक्त बॅंकेच्या प्रचंड दबावामुळे मी जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
पत्नी व मुलगी यांना उद्देशून त्यांनी, प्रिया मला माफ कर, माही मला माफ कर असे लिहिले आहे. शक्य झाल्यास माझे नेत्रदान करावे अशी इच्छा चिठ्ठीत व्यक्त केली आहे. या चिठ्ठीतील मजकूर नेमका त्यांनीच लिहिला आहे का, वरिष्ठांकडून त्यांना काही त्रास होता का, यासंबधी आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.
लंडनमध्ये वंजारी समाजाचा पाचवा मेळावा उत्साहात संपन्न; विठ्ठल मंदिरासाठी MIT कडून ५० लाखांचे दान
Newsworldmarathi Team: यूकेमध्ये वास्तव्यास असलेल्या वंजारी समाजाचा पाचवा सामूहिक मेळावा लंडनमध्ये उत्साहात पार पडला. समाजातील एकतेचा, सांस्कृतिक जिव्हाळ्याचा आणि बंधुत्वाचा भक्कम परिचय देणारा हा सोहळा अनेक दृष्टीने लक्षवेधी ठरला.
या मेळाव्याला MIT चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि यूकेमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणारे माऊली श्री अनिल खेडकर विशेष उपस्थित होते.
मेळाव्याचे आयोजन खेडकर कुटुंबीय, श्री रुस्तम खेडकर आणि वंजारी समाजातील सर्व सदस्यांच्या पुढाकारातून पार पडले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, सजावट, सेवा आणि व्यवस्थापन संघटीत स्वयंसेवक टीमने अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
श्री नाना नागरगोजे, श्री वैभव आव्हाड आणि श्री प्रवीण सानप यांच्या अथक मेहनतीमुळे व प्रेमळ पाहुणचारामुळे संपूर्ण मेळावा अविस्मरणीय ठरला. या निमित्ताने युनायटेड किंगडममधील मराठी व वंजारी बांधवांमध्ये स्नेह, आपुलकी आणि एकतेचे दृढ बंध निर्माण झाले.
या कार्यक्रमात डॉ. राहुल कराड यांनी ‘MIT’ च्या वतीने विठ्ठल मंदिराच्या उभारणीसाठी ५० लाख रुपयांची रक्कम भक्तिभावाने दान दिली.“पंढरपूरच्या विठ्ठलाचे तेज आता संपूर्ण जगभर पसरत आहे,” अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
वंजारी सेवा संघाच्या वतीने आयोजक व सर्व स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले

