11th Class Admission : अकरावी प्रवेशासाठी ‘शेवटची संधी’! ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ; जाणून घ्या सविस्तर…

Newsworldmarathi Mumbai: इयत्ता ११ वी (वर्ष 2025-26) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३ जून ऐवजी आता ५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्राथमिक शिक्षण संचालक (माध्यमिक) श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. नोंदणीसाठी वाढीव मुदत कादिली? ६ मे रोजीच्या शासन निर्णयातील इन-हाऊस कोट्याबाबतच्या सुधारणा व ३१ मे रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, कनिष्ठ महाविद्यालये आणि त्यास जोडलेल्या शाळांच्या युनिट ठरवण्यात काही बदल झाले. या बदलांचा नीट विचार करून विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम सुधारण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इन-हाऊस कोट्याचे बदल नेमके काय? खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 10% जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित मुंबई, ठाणे, उपनगर क्षेत्रात एक युनिट – एक शाळा ग्राह्य राज्यातील इतर भागात – महसूली जिल्ह्यांनुसार युनिट निश्चित नोंदणीची आकडेवारी (२ जून २०२५ पर्यंत): विभाग नोंदणी संख्या मुंबई 2,65,900 पुणे 1,87,925 कोल्हापूर 1,07,012 नाशिक 1,12,108 छ. संभाजीनगर 1,00,040 नागपूर 95,210 अमरावती 98,359 लातूर 58,586 इतर 61,712 एकूण 10,85,851 विद्यार्थी महत्त्वाचे: विद्यार्थी आणि पालकांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. तांत्रिक अडचणींसाठी ई-मेल – support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन – 8530955564 वर संपर्क साधावा. नोंदणी व्यतिरिक्त पुढील टप्प्यांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

Sanjay Raut on Girish Mahajan : “गिरीश महाजन म्हणजे पक्षफोडाचा दलाल”; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

Newsworldmarathi Mumbai: “शिवसेना जमीनदोस्त होणार” या गिरीश महाजन यांच्या विधानानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शिवसेना संपवणं तुमच्या दहा पिढ्यांना देखील शक्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंआहे. गिरीश महाजन म्हणजे पक्षफोडाचा दलाल : संजय राऊत संजय राऊत म्हणाले, “भ्रष्ट, ठेकेदार आणि दबावाचं राजकारण करणारे गिरीश महाजन हे भाजपकडून नेमलेले एक पक्षफोडू दलाल आहेत. पोलीस आणि पैशाच्या जोरावर लोकांना धमकावत ते आमचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्या दिवशी सत्ता आमच्याकडे येईल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असणार, याची खात्री बाळगा.” “शिवसेनेनेच चड्डीची नाडी बांधायला शिकवलं” गिरीश महाजन यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना लाज वाटायला हवी, असं म्हणत राऊत पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात उभं केलं. शिवसेनेनेच तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवलं. आता तुम्ही शिवसेनेला संपवण्याची भाषा करता? ही तुमची ओळख विसरू नका.” असंही राऊत म्हणाले. “भयग्रस्त महाजन पक्ष सोडायला तयार होते” “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांच्यावर चौकशा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी ते पक्ष सोडून शांत बसण्याच्या तयारीत होते. निरोप पाठवत होते की ‘मी राजकारणातून बाहेर पडतो.’ हे डरपोक आहेत. त्यावेळी घाबरून गेले होते,” असा गौप्यस्फोट देखील संजय राऊत यांनी केला. “महाजन, शाह आणि भाजप महाराष्ट्रद्रोही!” संजय राऊत म्हणाले, “अमित शाह हे शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र द्रोही लोकांनी आमचा विचार संपवण्याचा विडा उचललाय. पण शिवसेना विचारांचा पक्ष आहे. हे केवळ काही माणसं फोडून होणारं काम नाही.” “राजकारण नाचेगिरी नाही” “गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांचं वागणं नाचेगिरीसारखं आहे. पाच माणसं फोडून पक्ष फोडल्याचा दावा करणं हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला, पण त्यांच्याच काळात काँग्रेस बळकट झाली आणि भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे भाजपची लाजिरवाणी अवस्था आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

धक्कादायक… ! अकोल्यात दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्याच्या भावाची निर्घृण हत्या

Newsworldmarathi Akola: शहरात गुन्हेगारीचा कहर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे धाकटे बंधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल (वय 60) यांची थरारक हत्या करण्यात आली आहे. आरोपीचा महेंद्र पवार असं नाव असून तो जामिनावर बाहेर असलेला सराईत गुन्हेगार आहे. रणपिसे नगरात दिवसाढवळ्या खून ही घटना अकोल्यातील रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवर परिसरात घडली. महेंद्र पवारने धारदार लोखंडी टिकासने संजय कौसल यांच्या डोक्यावर आणि छातीत अनेकवार वार केले, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीमुळे खळबळ महेंद्र पवार याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका प्रकरणात तो तुरुंगात गेला होता आणि अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्याने ही हत्या केली. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक केली आहे. नव्या एसपींसमोर मोठं आव्हान विशेष म्हणजे, अकोल्याचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी नुकतेच पदभार स्वीकारला असून त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच आठवड्यातच ही गंभीर घटना घडल्याने प्रशासकीय स्तरावरही खळबळ उडाली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात संताप संजय कौसल हे अकोल्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस नेत्याचे बंधू असल्याने त्यांच्या हत्येने राजकीय व सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी पोलिसांकडून अधिक कडक कारवाईची मागणी केली आहे.

पुणे माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव खांडेकर

0
Newsworldmarathi pune: पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड या सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासद आहेत. पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच सर्व संचालक व सभासद यांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन चेअरमन शिवाजीराव खांडेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. शिवाजीराव खांडेकर यांचे शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, जिल्हाध्यक्ष रमेश इंगवले, जिल्हा सचिव इम्रान मुल्ला, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, अमीर मुलाणी, सचिव श्रीशैल चव्हाण यांच्या सह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Baramati News । पोलिसच असुरक्षित? स्टंट करताना हटकले, तरुणाने थेट पोलिसाच्या अंगावरच घातली कार

0
Newsworldmarathi Baramati : बारामतीतील विद्या प्रतिष्ठानकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी हटकले, त्यावर संतापलेल्या चालकाने थेट पोलिस हवालदाराच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत बारामती तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार संतोष दत्तू कांबळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ भाग्यजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, काही तासांतच त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बारामतीतील पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकारामुळे पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि त्यांना धोका निर्माण करणे हे गंभीर गुन्हे आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाने संबंधित कारवाई सुरू केली आहे आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. ही घटना बारामतीतील पोलिसांच्या धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेची परीक्षा घेणारी ठरली आहे. पोलिसांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

अकोल्यात भीषण अपघात; कार थेट पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

Newsworldmarathi Akola: शहरातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वाडेगाव बाळापुर रस्त्यावर घडली आहे. कन्हैयासिंग ठाकूर (वय-५४), विशाल भानुदास सोलनकर (वय-४५) आणि सुनील शर्मा (वय-४५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या महिटिनुसार, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा येथील असणाऱ्या नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. वाडेगावकडून बाळापूरकडे जात असताना मध्यरात्रीच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत केली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवले असून, त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मरण पावलेले व्यक्ती हे सर्वजण बाळापुर शहरातील रहिवासी आहेत. दरम्यान, चारचाकी गाडी थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कार जवळपास ५ ते ६ वेळा पलटी होत खाली कोसळली. या वाहनातील तीन लोकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मांडवा कुपटा येथील ग्रामस्थांनी गाडीमध्ये असलेल्या जखमींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, यातील तिघांचा वाटेतचं मृत्यू झाला होता. या प्रकरणात बाळापुर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाला अध्यात्माचीही जोड, जाधवर शिक्षण समुहाकडून दिग्गजांच्या कीर्तनाचं आयोजन

0
Newsworldmarathi Pune: शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे प्रबोधनाकरीता न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज कीर्तनकार कीर्तन करणार असून दिनांक ३ ते ६ जून दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल १ च्या प्रांगणात कीर्तन होणार असल्याची माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली. कीर्तन महोत्सवाचे उद््घाटन मंगळवार, दिनांक ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरिपाठ होणार असून मंगळवारी (दि.३), सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. सुनील महाराज निवंगुणे यांचे कीर्तन होणार आहे. दुस-या दिवशी बुधवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांचे कीर्तन होणार आहे. यंदाचा कीर्तनकेसरी पुरस्कार अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. तिस-या दिवशी गुरुवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाचा समारोप शुक्रवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाची सांगता दुपारी १२ ते २ यावेळेत महाप्रसादाने होणार आहे. ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ न-हेगाव यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे. अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात. https://youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या लिंकवरुन कीर्तनांचा आनंद घेता येईल.

‘ती’ चर्चा खरी ठरली…! लाडकी बहीण योजनेत अनेक चुका; अजित पवारांनी दिली कबुली

0
Newsworldmarathi Pune: Ajit Pawar । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींची कबुली दिली आहे. या योजनेअंतर्गत काही अपात्र महिलांना लाभ मिळाल्याचे उघडकीस आले असून, त्यांची नावे हटवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होते. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या योजनेत २,२०० पेक्षा अधिक अपात्र सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने या अपात्र लाभार्थ्यांची नावे हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अजित पवार यांनी म्हणाले की, “या योजनेची अंमलबजावणी करताना काही चुका झाल्या आहेत. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून, यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल.” राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि योग्यतेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. योजनेचा लाभ खरोखर गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, पुणे शहरामध्ये अशाप्रकारे कोणकोणाला शस्त्र परवाना देण्यात आला आहे, हे तपासले जाईल. मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एसपींनी फेर आढावा घेतला. अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. 2020 ते 2023 कोणाकोणाला लायसन्स दिली गेली, याचा तपास करु. असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

हृदयद्रावक घटना…! चाकणमध्ये पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू; परिसरात शोककळा

0
Newsworldmarathi Pune: जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकणजवळील मेदनकरवाडी व कडाचीवाडी परिसरात शनिवारी (३१ मे) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार १३ वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ओमकार बाबासाहेब हांगे (वय १३, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. मस्साजोग, ता. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराच्या मागे, मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, बोरजाईनगर, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाळ मोरे (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मार्तंडनगर, मूळ रा. झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी ११ वाजता ही चारही मुले एकत्रितपणे पी. के. टेक्निकल कॉलेजच्या पाठीमागील पाझर तलावात पोहण्यासाठी गेली होती. दुपारीपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने शंका बळावली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेतला आणि चौघांचे मृतदेह बाहेर काढले. मुलांची दमछाक झाल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परिसरात शोककळा या घटनेमुळे मेदनकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांची कुटुंबे चाकण एमआयडीसीमध्ये नोकरी किंवा भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत होती. चारही कुटुंबे भाड्याच्या घरांमध्ये राहत होती. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला आहे. पोलिसांची कारवाई: चाकण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे. मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नीलेशने थंड डोक्याने केले होते प्लॅनिंग, पण ‘या’ कॉलमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

0
Newsworldmarathi Pune: Vaishnavi suicide case । पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. त्याने पोलिसांची नजर चुकवण्यासाठी अतिशय नियोजनपूर्वक पलायन केले होते. मात्र, आयफोनवरील फेसटाइम कॉलमुळे त्याचा डाव उधळला गेला. फरार होण्याचे नियोजन वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून निलेश चव्हाण सतत पोलिसांना चकवा देत होता. त्याने कोणतेही बँक व्यवहार न करता, केवळ रोख व्यवहार केले. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या दुकानांतून खरेदी केली आणि नवीन सिम कार्ड खरेदी करून संपर्क साधला. त्याने आपल्या ओळखीतील एका मैत्रिणीला सोबत घेऊन दिल्ली गाठली आणि नंतर तिला परत पाठवून स्वतः नेपाळकडे रवाना झाला. फेसटाइम कॉलमुळे उघडकीस पोलिसांनी निलेशच्या मैत्रिणीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला आणि विविध क्रमांक ट्रॅक केले. तपासादरम्यान, निलेशने पुण्यातील काही ओळखीतील व्यक्तींना ‘अॅपल फेसटाइम’ कॉल केला. त्याच्या मते, फेसटाइम कॉलवरून पोलिसांना काहीच माहिती मिळणार नाही. मात्र, या कॉलमुळे पोलिसांचा सायबर विभाग अलर्ट झाला. त्या कॉलवरून पोलिसांनी संबंधित आयपी अॅड्रेस शोधून काढला आणि तो नेपाळमधील असल्याचे निष्पन्न झाले. अटक आणि पुढील कारवाई पोलिसांनी नेपाळमधील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत घेतली. त्यातून एका स्थानिक चालकाचा नंबर मिळाला. त्या क्रमांकाचे विश्लेषण केल्यानंतर आणखी एक संशयित मोबाईल नंबर हाती लागला, जो निलेशच्या नवीन सिम कार्डचा होता. त्या क्रमांकावरून पोलिसांकडे अचूक लोकेशन आले. नेपाळमधील एका लॉजवर पोलिस पोहचले तेव्हा निलेश झोपलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन थेट पुण्यात आणले. मुख्यमंत्र्यांचे कौतुक पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखवलेल्या नियोजनबद्ध कामगिरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलेपणाने माध्यमांसमोर कौतुक केले. या गौरवामुळे संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल अधिक बळकट झाले आहे. या प्रकरणात निलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन जप्त केले असून, त्यातील डेटा तपासण्यात येत आहे.