HSC Exam Result 2025 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.

HSC Result Maharashtra : धाकधूक वाढली…! आज बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल

Newsworldmarathi Pune: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर निकाल पाहता येईल. तसेच निकालाच्या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येणार आहे. राज्यात बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली. यंदाच्या परीक्षेला सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याकरिता ६ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १७ दिवस अगोदर निकाल जाहीर होत आहे. मागील वेळी २२ मे रोजी निकाल जाहीर झाला. यंदा लेखी परीक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली. त्यामुळे निकालदेखील लवकर जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्री, राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले होते. ऑनलाईन निकाल पाहण्याठी अधिकृत संकेतस्थळ १. https://results.digilocker.gov.in २. https://mahahsscboard.in 3. http://hscresult.mkcl.org ४. https://results.targetpublications.org ५. https://results.navneet.com

भाजप शहराध्यक्ष बदलाच्या तयारीत; पुण्यात गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आघाडीवर

Newsworldmarathi Pune : भाजपमध्ये सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष पदावर बदल होण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार, वरिष्ठांकडून गणेश बिडकर यांचं नाव शहराध्यक्षपदासाठी फायनल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा होऊन या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने यासाठी काही दिवसांपूर्वी परिवेक्षकांचीही नियुक्ती केली होती. गणेश बिडकर: पुण्यातील भाजपचे प्रभावशाली नेते गणेश बिडकर हे पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक प्रभावशाली आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर काम केले असून, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. बिडकर यांनी सभागृह नेते म्हणून कार्यरत असताना स्थानिक विकास प्रकल्पांवर भर दिला आहे. ज्यामुळे त्यांना जनतेमध्ये चांगली ओळख मिळाली आहे. सध्या पुणे शहराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये बिडकर यांचे नाव आघाडीवर असून, पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार वरिष्ठांकडून त्यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहेत.

Karuna Munde : धनंजय मुंडेंकडून धमक्या, छळ सुरूच; करूणा मुंडेंची कोर्टात लेखी तक्रार

Newsworldmarathi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे न्यायालयाच्या आदेशांना झुगारून आपल्याला दररोज धमक्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) माध्यमातून व्हिडीओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करुणा मुंडे यांनी कुटुंब न्यायालयाकडे केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने धनंजय मुंडे यांना यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. करुणा मुंडे यांनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय? प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. असं असतानाही धनंजय मुंडेकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी शनिवारी न्यायालयात नव्या अर्जामार्फत केली आहे. धमक्यांसोबतच एआयचा वापर करून अश्लील व्हिडीओही पाठवले जात असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. व्हिडीओ आणि फोटोमध्ये व्यक्तीशः आपण नसलो तरीही त्यात आपण असल्याचे दाखवून आपला मानसिक छळ होत असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार दरमहा दोन लाख रुपये यानुसार साल २०२२ पासून आपण आजवर ६० लाख रुपये पोटगीस पात्र असल्याने त्याची धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणीही करुणा मुंडे यांनी न्यायालयाकडे केली आहे तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्याची मागणी करीत तीन स्वतंत्र अर्ज करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत केले आहेत.

Bhiwandi Crime : तीन मुलींची हत्या करून आईची आत्महत्या; भयंकर दृश्य पाहून पती हादरला, भिवंडीत नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Mumbai : भिवंडी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने तीन मुलींची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील फेणे गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. मुलींची हत्या करून आईने त्यांचे मृतदेह फास लावून लटकावले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले. मातेने आपल्या पोटच्या मुलींची हत्या कशासाठी केली असावी? याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून कोणालाही या घटनेस जबाबदार धरू नये, असा उल्लेख यात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (३२) व मुली नंदिनी (१२), नेहा (७) व अनु (४) यांच्यासोबत राहतो. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी नऊ वाजता तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा ठोठावूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता चौघींचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

दुर्दैवी घटना…! बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

Newsworldmarathi soygao : सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बैल धुण्यासाठी साठवण तलावात उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या मुलाला एका १८ वर्षीय तरुणीने वाचवले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नांदगाव तांडा येथे घडली आहे. अकील पठाण व रेहान शेख अशी मयतांची नावे आहेत. साकिब पठाण असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रेहान हा मामा शकील पठाण यांच्याकडे तर वाचलेला साकिब त्याच्या बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आले होते. शनिवारी तिघेही बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावात गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. त्याचवेळी तलावात कपडे धुणाऱ्या महिलांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यातील मनीषा बागुल या तरुणीने जीवाची पर्वा न करता या तिघांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. तिने तब्बल २३ मिनिटे पोहत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील साकिबला वाचवण्यात तिला यश आले.

शरद पवारांना मोठा धक्का; माजी मंत्र्यांसह तीन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Newsworldmarathi Mumbai: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. के.सी. कॉलेज येथील सभागृहात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास पाटील, देवकर यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे, महिला आघाडीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, धुळ्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार शरद पाटील यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा करण्याचे आवाहन पवार यांनी केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या दुफळीत पाटील व देवकर यांनी शरद पवार यांना साथ दिली होती. तसेच विधानसभा निवडणुकीत सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारकडून एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागते की काय,अशी परिस्थिती असल्याने अनेक कार्यकर्त्यांना आपण सत्ताधारी पक्षात असायला हवे, अशी भावना प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.

हास्ययोग चळवळ समाजाला सकारात्मक, सुदृढ बनवतेय; चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

Newsworldmarathi Pune : “नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाज सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. जगामध्ये आज १२० देशात जागतिक हास्यदिन साजरा होत आहे. हास्यामुळे सकारात्मकता येते. सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात. मनाने प्रसन्न असणारी माणसे दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्रोडक्ट्सचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे (व्हर्च्युअली), हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ऍड. एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलाग्रे, हरीश पाठक आदी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जीवन सकारात्मक असेल, तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. आनंदी व सुदृढ समाजासाठी ही चळवळ मोलाचे योगदान देत आहे. ताणतणावापासून दूर राहण्यास हास्ययोगाचा उपयोग होतो. एखाद्या चिकित्सेप्रमाणे आज हास्ययोग काम करत असून, जागतिक स्तरावर याला मान्यता आहे. विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने एक लाख लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचणार, यात काही शंका नाही. पुण्यात सुरु झालेली ही चळवळ नागपुरातही सुरु व्हावी.” ‘आनंद वाटा’वर विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले, “आपण जीवन जगताना आनंदातही चुका शोधत बसतो. तसे न चुकांमध्येही आनंद शोधण्याची सवय लावून घ्यायला हवी. सकारात्मक वृत्तीने आनंदाचा शोध घेत वाटचाल करत राहिलो, तर जीवन अधिक आनंदी होते. हास्ययोग ही सकारात्मक जीवन जगण्यासाठीची संजीवनी आहे.” राजेश शहा यांनी हास्ययोग समाजात सकारात्मकता पेरत असल्याचे सांगितले. आगामी काळात एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून पुण्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा उपक्रम राबवणार आहोत. अधिकाधिक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. देसाई रुग्णालयात मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे शहा यांनी नमूद केले. गेल्या २८ वर्षांपासून नियमित हास्ययोग करत असल्याने आजवर कोणताही आजार झाला नाही. त्यामुळे हास्ययोग खूप महत्वाचा असल्याचे प्रकाश धोका म्हणाले. महेश जोशी यांनी हास्ययोग चळवळ अधिक व्यापक व्हावी. ती घराघरात पोहोचावी. सध्याच्या धकाधकीच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसू परत आणण्याचे काम ही चळवळ करत असल्याचे ते म्हणाले. मकरंद टिल्लू म्हणाले, “जगामध्ये हास्य क्लब ही चळवळ सुरू होण्याचे हे तिसावे वर्ष आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार २३५ शाखांच्या माध्यमातून २५ हजार लोकांना रोज हास्ययोग करायला लावते. एक लाख लोकांना या हास्य चळवळीत जोडून घेण्याचे उद्दिष्ट्य आहे.” यानिमित्ताने हास्ययोगाचे प्रकार, मनोगते, मान्यवरांचे सत्कार झाले. बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरून गेले होते. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हास्ययोग केला. विजय भोसले यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. हर्षदा टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. एकनाथ सुगावकर यांनी आभार मानले.

HSC Result 2025 : प्रतीक्षा संपली…उद्या लागणार बारावीचा निकाल; निकाल कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकमध्ये…

Newsworldmarathi pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) उद्या (5 मे) बारावीचा (Hsc) निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 5 मे सोमवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मागील कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती. अखेर उद्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. या संदर्भात नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात निकालासंदर्भात आणि गुणपडताळणीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. या अधिकृत वेबसाइट्सवर पहा निकाल mahresult.nic.in mahahsscboard.in hscresult.mkcl.org असा करा निकाल चेक? सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा. होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

Jayant Patil on Ajit Pawar : मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शक्य नाही, पण झाले तर आनंदच; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Newsworldmarathi Pune : Jayant Patil on Ajit Pawar : ‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मुख्यमंत्री होणं पाच वर्षे शक्य नाही. तरीही जर ते मुख्यमंत्री झालेच, तर आम्हाला आनंदच आहे’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या खास शैलीत टोला लगावला. २ मे रोजी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती त्यावर जयंत पाटील यांनी अजित पवार याना जोरदार टोला लगावला. सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री पद मिळणं शक्य नाही, पण अशा संधी आल्यास त्यात विरोध नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या इच्छेला नर्म विनोदी टोला लगावला. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? गेल्या काही दिवसांत शरद पवार व अजित पवार एकाच मंचावर अनेकदा दिसल्याने, दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की, ‘रयत शिक्षण संस्थेची एक बैठक होती. त्याला राजकीय अर्थ लावण्यात काहीही अर्थ नाही. घरात एखादा कार्यक्रम झाला असेल, तर तो घरगुती असतो. अशा भेटीगाठींना राजकीय अर्थ देऊ नये, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितले. जयंत पाटील पुढे म्हणाले की, निधी कपात केल्यामुळे या दोन्ही खात्यांवर अन्याय होईल, असे वाटत आहे. सरकारमधून बाहेर पडताना या सर्वांनी अजित पवार यांच्या नावाने तक्रार केली आणि नवीन सरकार स्थापन केले. आता तक्रार करायला शिरसाट यांच्याकडे काही उरले नाही. ते अर्थ खात्यावर बोलत असतील तर, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत दखल घेतली पाहिजे. सरकारमध्ये दोनवरून तीन पक्ष झाले, लाडकी बहीण योजनेसाठी निधी दिला, आता त्यांना वाटेल ते करतील. कारण लोकांनी त्यांना निवडून दिले आहे, असं म्हणत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाना साधला.