शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष, चिन्हांवर ‘या’ दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी; तब्बल दीड वर्षानंतर मुहूर्त
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील राजकारण हादरवून टाकणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील नाव आणि पक्षीय चिन्हांच्या वादावर तब्बल दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंडखोरी करून त्यांनी स्वतंत्र गट तयार करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हांबाबत निकाल दिला.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. आता दीड वर्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हांबाबत वादंगावर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता ७मे रोजी सुनावणी होणार आहे.
तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर १४ मे रोजी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
सर्वोत्तम पॅकेज देऊन पुरंदर विमानतळाचे भूसंपादन : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
Newsworldmarathi Pune : पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार देण्याऐवजी, त्यांना जो मोबदला अपेक्षित आहे, त्यासह आपण आपल्या मागण्या सरकारकडे सात दिवसांत मांडण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सरकार शेतकऱ्यांवर करणार नाही. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना तसेच, भागातील तरुणांचे हाताला काम मिळेल.”
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पण हा प्रकल्प नागपूरच्या मिहान प्रकल्पाप्रमाणे, पुरंदर विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलेल. शेतकऱ्यांनी सात दिवसांत त्यांच्या मागण्या कळवाव्यात. जमिनीची किंमत, पुनर्वसन, किंवा इतर सुविधांबाबत अपेक्षा स्पष्ट कराव्यात. शासन सर्वोत्तम पॅकेज देण्यासाठी तयार आहे. निरपराध शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी चौकशी करून निर्णय घेऊ. पण पुरंदर विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय आणि राज्याच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे, तो झाला पाहिजे,” असे ठाम मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाच्या विषयात जिल्हाधिकारी कार्यालयात येथील सात गावातील शेतकऱ्यांसोबत सुमारे दोन तास बावनकुळे यांनी चर्चा केली. त्यांचे म्हणणे समजून घेतले. राज्यातील अन्य विकास प्रकल्पांचा विस्तार, त्या भागातील विकास याबाबत उदाहरणांसह चर्चा महसूल मंत्र्यांनी केली. कोणावरही अन्याय होणार नाही, ही ग्वाही दिली. यावेळी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व या प्रकल्प क्षेत्रातील भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.
आंदोलन आणि गुन्ह्यांचा आढावा घेताना बावनकुळे यांनी सांगितले की, नुकत्याच पुरंदर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी आमदार विजय शिवतारे आणि जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांशी चर्चा केली. आंदोलनात निरपराध शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी चौकशी केली जाईल. मात्र, अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होईल, यासाठी आमच्याकडे गंभीर व्हिडिओ पुरावे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. आंदोलनात बैलगाड्या सोडण्याच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केले. “या प्रकरणाची चौकशी होईल. काही लोकांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला असावा, पण निरपराध शेतकऱ्यांना न्याय मिळेल,” असेही ते म्हणाले.
आंदोलनातील गैरसमज आणि आरोप
आंदोलनादरम्यान काही गैरप्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावर बावनकुळे म्हणाले, “काही लोकांनी व्हॉट्सअॅपवर चुकीचे दर जाहीर करून गैरसमज पसरवले. शासनाची भूमिका पारदर्शक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊ.” त्यांनी आंदोलनात बाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा आरोप फेटाळला. चौकशीतून सत्य बाहेर येईल. दलालांनी जमिनी विकत घेतल्याच्या आरोपांवर ते म्हणाले, ” असे झाल्याचे दिसत नाही. पण या प्रकरणाची चौकशी करू. पण एक-दोन दलालांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.”
सर्वेक्षण तात्पुरते थांबवले
पुरंदर येथील भूसंपादनाचे सर्वेक्षण सध्या थांबवण्यात आले आहे. “शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही सर्वेक्षण थांबवले आहे. पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.७३ टक्के
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही आपली गुणवत्ता सिद्ध करत ९९.७३ टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. सलग बारा वर्षांपासूनची यशाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
विज्ञान शाखेतील प्रथम तीन गुणवंत:
प्रथम: परब निखिल अजय – ५४२ गुण (९०.३३%)
द्वितीय: रंधवे सार्थक दिनेश – ५३५ गुण (८९.१७%)
ततीय: निंबाळकर राज बिरोबा – ५३० गुण (८८.३३%)
विशेष विषयांतील उल्लेखनीय कामगिरी:
गणित: मंदारपुरकर अर्पिता अतुल – ९७ गुण
जीवशास्त्र: ईशा अमोल वेदपाठक – ९४ गुण
माहिती तंत्रज्ञान (IT):
घारे ऋतुजा वसंत, गुमासे सिद्धी दीपक, ९९ गुण
संगणक शास्त्र: मृदुल दाखलकर – १९८ गुण (२०० पैकी)
इतर शाखांतील यशस्वी विद्यार्थी:
कला विभाग – प्रथम: उजळमकर मिथाली मिलिंद – ८७.५०%
वाणिज्य विभाग – प्रथम: सौंदांकर अंशिता प्रशांत – ८७.००%
या घवघवीत यशामागे संस्थेच्या प्राचार्या उर्मिला भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी रेखा दराडे, वाणिज्य विभागाच्या इनचार्ज मनीषा मोलावणे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, शीतल आबनावे, विभा कांबळे-आबनावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्यांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे पुण्यातील एक महत्त्वपूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र बनले आहे. संस्थेचा निकाल हे केवळ टक्केवारीचे यश नसून, शिक्षकांची निष्ठा, विद्यार्थ्यांची मेहनत आणि व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.”-प्रथमेश आबनावे, खजिनदार, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ
भाजप शहराध्यक्षांची नावे १० मे ला रोजी होणार जाहीर; नव्या नेतृत्वाकडे लक्ष
Newsworldmarathi Mumbai: भाजपकडून राज्यभरातील पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, येत्या 10 मे रोजी विविध शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटना मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले असून, पक्षात नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या विविध शहरांमध्ये इच्छुकांची चाचपणी सुरू असून, प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अहवालांवर आधारित अंतिम यादी तयार केली जात आहे. काही ठिकाणी विद्यमान अध्यक्षांची पुनर्नियुक्ती होण्याची शक्यता असून, काही शहरांमध्ये नवीन चेहऱ्यांची वर्णी लागणार आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांकडून या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.
शहर अध्यक्षपदासाठी स्थानिक पातळीवर विविध नावे चर्चेत आहेत, मात्र अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे. भाजपच्या संघटनात्मक ढाच्यात शहर अध्यक्ष पदाला मोठे महत्त्व असल्याने, निवड प्रक्रियाही काटेकोरपणे पार पडत आहे.
10 मे रोजी जाहीर होणाऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक शहरांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असून, कोणाला संधी मिळणार आणि कोणाला बाजूला ठेवले जाणार यावरून स्थानिक राजकारणातही खमंग चर्चा सुरू झाली आहे. भाजपने यादी जाहीर करताना स्थानिक मतभेद, सामाजिक समीकरणे आणि आगामी निवडणुकांतील प्रभाव अशा सर्व बाबींचा विचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.
पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्षेत्राला जेवढे जास्तीत जास्त पाठबळ देऊ तेवढ्या जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती करु शकू, स्थानिक समुदायाला अधिकारिता देऊ शक, असंही देवेंद्र फडणीस यावेळी म्हणाले. महाबळेश्वर (जि. सातारा) येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून आगामी 5 वर्षामध्ये आपल्याला राज्याला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळणे आणि परिसरामध्ये पर्यटन संस्कृती रुजणे महत्त्वाचे असते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना संबंधित स्थळांचा, परिसराचा, प्रदेशाचा स्थानिक अनुभव प्राप्त होणे महत्त्वाचे असते. यासाठी पर्यटन विभागाने संपूर्ण वर्षभराचे महोत्सवाचे कॅलेंडर तयार केले पाहिजे. या कॅलेंडरनुसार पर्यटनाचे आयोजन करण्याच्या उद्देशाने सर्वच पर्यटन यात्रा आयोजक करणाऱ्यांसोबत वार्षिक परिषदेचे आयोजन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, अलीकडच्या काळात लोक सर्व प्रकारची बुकिंग, प्लॅनिंग ऑनलाईन करतात. त्यामुळे आपले पोर्टल, वेबसाईट इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे. चॅटबॉट आणि एआयचा वापर करुन व्यवस्था उभी केली पाहिजे. पर्यटकांना राज्यातील पर्यटनासाठी पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजे. असे केल्यास राज्याच्या पर्यटन क्षेत्राची गाडी सुसाट धावू शकेल, असे सांगत महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून न्यू महाबळेश्वरच्या निर्मितीद्वारे नवीन संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई येथे आयोजित वेव्ह्ज 2025 मुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय संस्कृती, भारतीय संगीत, भारतीय लोककला, भारतीय लोकगीते यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केट तयार झाले आहे. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना या सर्वांचा अनुभव करुन देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील, यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल व पर्यटन संस्कृती उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
“काँग्रेस खाली करा, तुमचाच फायदा होईल” : बावनकुळेंचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
Newsworldmarathi Mumbai : राज्यातील निवडणुका पार पडल्या असल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला असून, फोडाफोडीचं राजकारण अद्याप सुरूच आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये नेत्यांचं इनकमिंग-आउटगोईंग सुरू असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना थेट काँग्रेस फोडण्याचा कानमंत्र दिला आहे. पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी काँग्रेसला कमकुवत करण्याचे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना दिले.
“तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका. ती जितकी कमी कराल, तितका तुमचाच फायदा आहे. माझं काय होईल याची चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, मुरलीधर मोहोळ आणि अमित शाह आहेत – आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला न्याय मिळणार, काँग्रेसवाल्यांना नाही,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी पक्षाचे मनोबल वाढवले.
त्यांनी स्पष्ट केले की, भाजप जेव्हा तिकीट वाटप करतो, तेव्हा प्रथम आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो आणि नंतरच इतर पक्षांतून आलेल्यांचा विचार केला जातो. काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये येत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे आश्वासनही त्यांनी दिलं.
बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठीही त्यांनी आपल्या भाषणातून ठाम भूमिका घेतल्याचे दिसते.
Mumbai crime : प्रेमाचे नाटक करून वयोवृद्धाची ५४ लाखांची लूट; मुंबईतील प्रकार
Newsworldmarathi Mumbai: मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमासह लग्नाचे नाटक करुन विविध कारणे सांगून उसने घेतलेल्या ५४ लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रेयसीसह तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांची आई मलबार हिल येथे राहते, तर ते पत्नी आणि मुलासोबत अमेरिकेत वास्तव्यास असतात. अनेकदा ते मुंबईत आईला भेटण्यासाठी येत होते. सहा वर्षांपूर्वी ते मुंबईत आले असता ग्रँट रोड येथे गेले होते. तिथेच त्यांची प्रियांका नावाच्या एका वेश्या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती.
तिने जवळीक निर्माण करुन प्रेमाचे नाटक सुरु केले होते. त्यानंतर त्यांच्याकडून विविध कारणे सांगून पैशांची मागणी केली होती. त्यांनीही तिला वेळोवेळी उसने पैसे दिले होते. याच दरम्यान ते दोघेही एका भाड्याच्या रुममध्ये लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहात होते. नोव्हेंबर २०२० रोजी तिने त्यांच्याशी दादरच्या एका मंदिरात लग्न केल्याचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता.
त्यानंतरही ती त्यांच्याकडून सतत पैशांची मागणी करत होती. गेल्या सहा वर्षांत तिने त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ५४ लाख रुपये घेतले होते, मात्र उसने घेतलेले पैसे ती परत करत नव्हती. पैशांची मागणी केल्यानंतर तिने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांना धमकी दिली होती. या संपूर्ण कटात प्रियांकाला तिच्या पंधराहून अधिक मित्रांसह सहकाऱ्यांनी मदत केली होती.
संतोष देशमुखच्या मुलीचे घवघवीत यश; वैभवी देशमुखला बारावीत 85.33% गुण
Newsworldmarathi Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या दुःखद प्रसंगानंतर देशमुख कुटुंबावर मोठा आघात झाला. मात्र या कठीण काळातही संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या जिद्दीचे दर्शन घडवत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
आज (५ मे २०२५) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात वैभवीने ८५.३३ टक्के गुण मिळवत आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. वैभवीला इंग्रजीत ६३, मराठीत ८३, गणितात ९४, फिजिक्समध्ये ८३, केमिस्ट्रीत ९१ आणि बायोलॉजीत तब्बल ९८ गुण मिळाले आहेत. तिने एकूण ६०० पैकी ५१२ गुण मिळवत हे यश मिळवले आहे.
वैभवीच्या या यशाने संपूर्ण गावात आणि परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून, ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठीण प्रसंगातही हार न मानता पुढे जाण्याचे उदाहरण वैभवीने आपल्या कृतीतून घालून दिले आहे.
बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; कोकण अव्वल, लातूर तळाला
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर बारावीचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर केला. सकाळी अकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदाचा राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, तो मागील वर्षांच्या तुलनेत समाधानकारक मानला जात आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, तब्बल ९६.७४ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दुसरीकडे, लातूर विभागाने सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल नोंदवत राज्यात तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राज्यभरातील विद्यार्थी व पालकांनी हा निकाल मोठ्या उत्सुकतेने आणि प्रतीक्षेनंतर पाहिला. यंदा लेखी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस लवकर पार पडली होती, त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर करण्यात आला. विद्यार्थी आता पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर नियोजनाकडे वळणार आहेत.
राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
Newsworldmarathi Pune: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत वादळी वारा, गारा व मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, ढगाळ हवामान व पाऊस यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. कमी दाबाचा पट्टा आग्नेय राजस्थान ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत महाराष्ट्र मार्गे जात आहे. त्यामुळे अवकळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच काही भागांत पाऊसही पडला आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा भागात पाऊस पडला. विदर्भातील काही भागांत ढगाळ हवामान असल्यामुळे तापमान उतरले आहे. राज्यात कमाल तापमान वाशिम येथे ४२.८ अंश सेल्सिअस होते. कोकणात सहा दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट आहे, तर मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे व गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तसेच मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत देखील मेघगर्जनेसह पाऊस व वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे-३६.९
लोहगाव-३९.८
कोल्हापूर-३६.२
महाबळेश्वर-३०.७
मालेगाव-४२.४
नाशिक-३७.९
सांगली-३७.९
सातारा-३७.७
सोलापूर-४०.६
मुंबई ३४.१
सांताक्रुझ ३३.७
छत्रपती संभाजीनगर ३९
परभणी ४१.७
नागपूर ३९.६
वाशिम ४२.८
वर्धा ३९
यवतमाळ ४०.

