Newsworldmarathi Team: केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राला आणखी एक महामार्ग मिळणार आहे. त्यामुळे ७ तासांचा प्रवास फक्त २ तासांत करता येणार आहे. हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे. या महामार्गासाठी १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यासंदर्भात ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण होईल अशी माहिती दिली.
नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सभागृहात सांगितले. आगामी दोन वर्षांत दोन पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत. देशातील जवळपास २५ हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांची संख्या किती राहिली याचा एक डेटा सादर करत गडकरींनी अपघात नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारची भूमिका काय ? याबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे यासंदर्भातही सभागृहाला माहिती दिली. यावेळी गडकरी म्हणाले, वाहनाचा जास्त वेग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अपघात होतात. म्हणून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय उपाययोजना राबवत आहे, असे त्यांनी सांगितले


Recent Comments