पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना वाचवणारा अहवाल जाहीर झाला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात आमचे सहकारी प्रशांत जगताप हे न्यायालयात जात आहेत. त्यामुळे त्याचे मी जाहीर आभार मानते. एखाद्याची लेक, बायको, आई गेली आहे. असे असताना एखादा रिपोर्ट इतका चुकीचा कसा येऊ शकतो? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. एखादे सरकार महिलेबद्दल इतके असंवेदनशील कसे होऊ शकते? हे धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
आम्ही तो अहवाल मानत नाही. त्या अहवालाला कचऱ्याच्या डब्यात नाहीतर जाळून टाकले पाहिजे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. प्रशांत जगताप या संदर्भात न्यायालयात लढत आहेत. आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकार माणुसकी विसरले असेल, मात्र आम्ही माणुसकी विसरलो नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात सुळे म्हणाल्या की, जाहीर झालेल्या या अहवालावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे अहवालात काय आहे? काय नाही? यामध्ये आम्ही वेळ घालवणार नाही. आमच्या राज्यात एका बहिणीची हत्या झाली आहे. त्या राज्यात आम्ही पुन्हा दुसऱ्या लेकीची किंवा महिलेची हत्या होऊ देणार नाही. सरकारच्या वतीने आरोपींना वाचवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळेच आम्हाला न्यायालयात जावे लागत आहे. या राज्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला न्यायालयात जावेच लागेल. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. मात्र, ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीची हत्या केली, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.


Recent Comments