Newsworldmarathi pune : PM Narendra Modi : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरू केले. भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. तसेच पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले.
पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप नागरिकांना मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. कोट्यवधी नागरिक दुःखी आहेत. संपूर्ण देश सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभा आहे. उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्य लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, मित्रांनो, या दहशतवादी हल्ल्यांमध्ये कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जोडीदार गमावला, त्यापैकी काही बंगाली बोलत होते, कोणी कन्नड बोलत होते, तर काही मराठी बोलत होते. कोणीतरी गुजराती होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या सर्वांच्या मृत्युबद्दल समान दुःख आहे. रागही तसाच आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या श्रद्धेवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला.
जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेते पाकिस्तानवर कठोर कारवाई सुरु केली. सिंधू पाणी करार रद्द करत इतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाहिलीच जाहीर सभा गुरुवारी झाली. यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कठोर शब्दांत पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला.


Recent Comments