Newsworldmarathi Mumbai : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून, आता सर्व विभागांमध्ये समानपणे केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी मुंबईसाठी 225 रुपये आणि इतर विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारले जात होते.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र, नॅक मूल्यांकन व एनबीएसाठी आवश्यक पूर्तता तसेच महाविद्यालय विकास समिती (सीडीसी) स्थापन न केल्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 229 महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच या महाविद्यालयांवर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना वेळोवेळी परिपत्रके, सूचना आणि स्मरणपत्रे देऊनही पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असून, संबंधित महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर [http://mu.ac.in](http://mu.ac.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Recent Comments