Newsworldmarathi Mumbai: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोकाटे यांनी कृषी खात्याबाबत नाराजी व्यक्त करत “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकीच आहे, आणि मला हे खातं दिलंय” असं वक्तव्य केलं.
हे विधान केवळ त्यांची नाराजी दाखवून गेलं नाही, तर राज्याच्या कृषी धोरणांवर आणि मंत्रिमंडळातील भूमिका वाटपावरही प्रश्न निर्माण करतं. अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे आयोजित गुणवंत शेतकरी पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यापूर्वीही कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीत “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या “ओसाड गावाची पाटीलकी” या विधानावरूनही नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्य सरकारचं बचावात्मक भूमिकेत स्पष्टीकरण
कोकाटे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “राज्यात बऱ्याच भागांत पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी फारसं पीक उरलेलं नाही. मात्र, फळबागांचे आणि कांद्याचे नुकसान लक्षात घेता त्यांचे पंचनामे करण्यात येतील. जेथे खरंच नुकसान झालं आहे तिथेच पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.”
त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांचे कौतुक करत सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, तसेच मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत.”
शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शिक्षणाचा सल्ला
कार्यक्रमात कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेती आधारित व्यवसायात करिअर घडवावे, असा सल्लाही दिला. मात्र, शेतकऱ्यांच्या वेदनांवर भाष्य करताना दिलेली विधानं सध्या त्यांच्या विरोधात जात असून, अशा संवेदी काळात अधिक जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत आहे.


Recent Comments