Newsworldmarathi Pune: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असताना, अशातच आता पुण्यात आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील धनकवडीमध्ये ३५ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून
गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वर्षा तुकाराम रणदिवे (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, वर्षाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी तुकाराम रणदिवे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला बागाव (वय-५३), योगेश बागाव (वय-३५), वैशाली बागाव (वय-३२), सुवर्णा बागाव (वय-२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागाव आणि रणदिवे हि दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे शेजारी आहेत. उज्वला आणि तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली आणि सुवर्णा या अनेक दिवसांपासून वर्षा यांना टोमणे देऊन त्यांचा सतत छळ करत होत्या. सातत्याने होणार हा छळ असह्य झाल्याने वर्षा यांनी २४ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मृत्यूची नोंद केल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान, याबाबत तपास केला असता आरोपींच्या छळाला कंटाळून वर्षा यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.


Recent Comments