Newsworldmarathi Nashik : राज्यातील शाळांमध्ये आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना बालवयातच रुजावी, देशप्रेमाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या उपक्रमाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात केली. या निर्णयामुळे राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये बळावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) सदस्य, तसेच स्काऊट-गाईड्स यांची मदत घेतली जाणार आहे. राज्यात सध्या सुमारे 2.5 लाख माजी सैनिक आहेत, त्यांच्याच सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
हे प्रशिक्षण शारीरिक शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि स्वयंशिस्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे मूल्य बिंबवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही विकसित होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. लवकरच यासंबंधीचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.


Recent Comments