Newsworldmarathi Gujrat : Air India Plane Crash : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर अवघ्या १२-१५ सेकंदांत भीषण अपघात झाला. मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर विमान कोसळल्याने २४१ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि जमिनीवरील २४ जणांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. २४२ प्रवाशांपैकी केवळ एकजण, रमेश विश्वकुमार, चमत्काराने वाचला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्रातील मृतांची यादी
कॅप्टन सुमीत सभरवाल (मुंबई, चांदिवली) – मुख्य पायलट. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांची बहीण रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली.
सिविक कुंदर (मुंबई, बोरिवली) – को-पायलट.
अपर्णा महाडिक (मुंबई, मूळ चिपळूण) – क्रू मेंबर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी.
मैथिली पाटील (नवी मुंबई, न्हावा) – क्रू मेंबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (१३ जून) सकाळी १० वाजता त्यांच्या घरी भेट देणार आहेत.
रोशनी सोनघरे (डोंबिवली) – २७ वर्षीय क्रू मेंबर, राजाजी पथ येथील उमिया कृपा सोसायटीत कुटुंबासह राहत होत्या.
दीपक पाठक (बदलापूर) – ११ वर्षांपासून एअर इंडियात क्रू मेंबर, कात्रप येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहत होते.
महादेव पवार (पंढरपूर, सध्या अहमदाबाद) – प्रवासी.
आशा पवार (पंढरपूर, सध्या अहमदाबाद) – महादेव यांच्या पत्नी, प्रवासी.
मयूर पाटील (महाराष्ट्र, माहिती अपुरी) – प्रवासी.
यशा कामदार (नागपूर, सध्या अहमदाबाद) – पती, मुलगा आणि सासूसह लंडनला निघाल्या होत्या.
रक्षा मोदा (नागपूर, सध्या अहमदाबाद) – यशा यांच्या सासू, प्रवासी.
रुद्र मोदा (नागपूर, सध्या अहमदाबाद) – यशा यांचा १.५ वर्षांचा मुलगा, प्रवासी.
करुण कहाण्या :
सुमीत सभरवाल यांच्या घरी केवळ वडील राहत होते. त्यांची बहीण अहमदाबादला रवाना झाली आहे.
अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने चिपळूण आणि मुंबईतील कुटुंबीय स्तब्ध झाले.
रोशनी सोनघरे यांचे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते.
दीपक पाठक यांनी टेकऑफपूर्वी आईशी बोलले होते, तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला.
यशा कामदार यांचे कुटुंबीय नागपूरहून अहमदाबादला रवाना झाले आहेत.
दरम्यान, DGCA आणि बोईंगने अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. एक ब्लॅक बॉक्स सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती अपघाताच्या कारणांचा उलगडा करेल, अशी आशा आहे. ही दुर्घटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे.
टाटा समूहाकडून 1 कोटींची मदत
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फाइट AI‑171 च्या भयंकर अपघातानंतर, टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा खर्च या समूहाकडून निघणार आहे. तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजचं वसतीगृह, पुन्हा बांधून देण्यात येणार आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.


Recent Comments