भिसे यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची मदत

Newsworldmarathi Mumbai: पुण्यात प्रसूतीदरम्यान ईश्वरी भिसे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे. या बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे. सदर मदत ही रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे. यापुढे देखील पुढील उपचारांसाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. ईश्वरी भिसेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबीयांची तात्काळ भेट घेऊन भावनिक आधार दिला होता. यावेळी त्यांनी दिलेले मदतीचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवत, आज संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उपचाराकरिता एका बाळासाठी १० लाख, तर दुसऱ्या बाळासाठी १४ लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे. सध्या दोन्ही बाळांचे उपचार सूर्या हॉस्पिटल, पुणे येथे सुरू असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले.

धक्कादायक…! प्रसूतीपूर्वीच आईसह बाळाचा मृत्यू; उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Newsworldmarathi Dahanu : डहाणू तालुक्यातील कैनाड वाडुपाडा घटना समोर आली आहे. येथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सायनू जितेश सावर (वय-२५) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, गर्भातील बाळाचा मृत्यू आधीच झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सायनू सावरला सकाळी प्रसूतीकळा सुरू झाल्यावर आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तत्काळ डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात नेले. दुपारी तिची नॉर्मल प्रसूती करण्यात आली; परंतु प्रसूतीपूर्वीच गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाळाचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचे हिमोग्लोबीन केवळ ६.५ इतके खाली गेले. डहाणूतील डॉक्टरांनी तिला गुजरातमधील वलसाड येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, सरकारी रुग्णवाहिका सायंकाळी ५ पर्यंत उपलब्ध होऊ शकली. तब्बल तीन तास विलंब झाल्यामुळे रुग्णवाहिकेतून वलसाडकडे नेत असतानाच सायनूचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिला रुग्णालयात दाखल होण्याआधी दोन दिवस घरात पडल्याने तिच्या गर्भाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीत तिचं बाळ गर्भाशयातच मृत झाल्याने रक्तस्त्राव वाढला. रुग्णालयात उशिरा आल्याने प्रसूतीनंतर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. बाळदेखील प्रसूतीपूर्वीच गर्भाशयात मृत झाले असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.

Ajit Pawar : मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण कुठं जमतंय; अजित पवारांचा मिश्किल टोला

Newsworldmarathi Mumbai : राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान पटकावलेल्या अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्याची इच्छा आता काही लपून राहिलेली नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जाहीरपणे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग अजून जुळून आला नसल्याचे म्हणत खंत व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्रीपदाचा योग कधी ना कधी जुळून येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या दिवसांपासून राष्ट्रवादीच्या वतीने वरळीतील जांबोरी मैदानावर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देश पातळीवर महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी भविष्यात महाराष्ट्राला एखादी महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, या केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. आपल्याला सगळ्यांना वाटत असते पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय, असे म्हणत पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली. तसेच हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या त्याप्रमाणे महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग जुळून येईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’; ‘मर्सिडीज’ने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

Newsworldmarathi Pune: पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. पुण्यातील नवले ब्रिज जवळ ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कारमधील मद्यधुंद चालकासह चार लोकांची अद्यापही मेडिकल झालेली नाही. आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस तपस करत आहेत. वाघोलीत डंपरने महिलेला फरफटत नेलं, जागीच मृत्यू वाघोलीत डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाहण्याच्या सुमारास बायफ रोडवरील आयडीबीआय बँकेसमोर घडली आहे. रुपाली सुरज तिवारी ( वय- २७ वर्षे, रा. पार्थ व्हीलाज, बायफ रोड ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती सूरज हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी डंपर चालक शुभम सुदाम मस्के (वय- २५ वर्षे, रा. लोणीकंद ) व डंपर मालक प्रमोद संभाजी भाडळे ( रा. वाघोली ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावी-बारावी निकाल १५ मेपर्यंत जाहीर होणार

Newsworldmarathi Pune : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीला हे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीचे निकाल १५ मेपर्यंत नक्की जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा लेखी परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकालही लवकर लागणार असून, विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम आणि करिअरच्या योजना करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. सध्या सर्व विभागीय मंडळांचे निकाल एकत्र करून त्याचा अंतिम आढावा घेतला जात आहे. बारावीचा निकाल ५ मे ते १० मेदरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मेपर्यंत लागेल, असे सांगण्यात आले आहे

आनंदाची बातमी …! लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Newsworldmarathi Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गुंडाळणार अशी विरोधकांची ओरड असताना राज्य सरकारने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ४१० कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी मंजूर केला आहे. शासकीय धोरण लक्षात घेऊन नियंत्रक अधिकारी यांनी निधी खर्च करताना काटकसरीच्या उपाययोजना आखून खर्च करावा, असे निर्देश देखील महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आले आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. तसेच की, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.” असं मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. दरम्यान, योजनेचे निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल ५० हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतःहून सोडला. विरोधकांनी यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच कालांतराने ही योजना बंद करण्याचा सरकार डाव असल्याचा आरोपदेखील करण्यात आला. शिवाय लाडक्या बहिणीला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १५०० रुपयांचा हप्ता देण्याची घोषणाही हवेत विरली. लाडक्या बहिणींनी यानंतर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अखेर महिला व बालविकास विभागाने आर्थिक वर्षाकरिता ४१०.३० कोटी रुपयांच्या निधी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) खर्चासाठी ३९६० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

अखेर पुणे शहरात पाणी कपात… जाणून घ्या कोणत्या भागात कधी होणार पाणी कपात

Newsworldmarathi Pune : तापमानाचा पारा ४०च्या वर गेल्या शहरात पाण्याची मागणी २५ टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच, धरणातून शहरातील उचलण्यात येणारे पाणी मर्यादीत असल्याने पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाण्याची कपात करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरापासून ही सुरूवात करण्यात आली आहे. या भागात आता आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या परिसरात महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध असलेले पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरात मोठया प्रमाणात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याने सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार (दि,५ मे) पासून केली जाणार आहे. या भागात चक्राकार पध्दतीने पाणी दिले जाणार आहे. वार आणि पाणी पुरवठा बंद असणारा भाग सोमवार बालाजीनगर : बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी,गुरूदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पीटल परिसर कात्रज : उत्कर्ष सोसायटी परिसर, गुजर वस्ती, कात्रज तलावा लगतचा पूर्व भाग, चौधरी गोठा कोंढवा : साईनगर, गजानन महाराज नगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी, सावंत कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी. मंगळवार सनसिटी : सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, सनसिटी परिसर, समर्थ नगर, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पीटल परिसर, विठ्ठलवाडी, विठठलनगर जुनी धायरी : संपूर्ण जुनी धायरी, उज्वल टेरेस, बारंगणी मळा, दळवीवाडी, पारी कंपनी रस्ता कात्रज : राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, नवीन पोस्ट आफिसचा भाग कोंढवा : कामठे पाटील नगर, खडीमशिन चौक, सिंहगड कॉलेज, हब टाऊन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, प्रभाग ३७ बुधवार वडगाव हिंगणे : वडगाव बुद्रूक, वडगाव हिंगणे, पेरूची बाग, धावडी, जाधवनगर, वडगाव गावठाण, जाधवनगर, खोरड वस्ती, सुदत्त संकूल, समर्थ नगर, संतोष मागील परिसर, हिंगणे, महादेवनगर, आंनद विहार, राजीव गांधी वसाहत कात्रज : वघजाईनगर, भांडेआळी, सुखदा-वरदा सोसायटी, सम्राट टॉवर, आंबामाता मंदीर पाठीमागील परिसर. शिवशंभोनगर गल्ली १, माऊलीनगर, सिल्वहर ओक सोसायटी, बलकवडे नगर कोंढवा : सुखसागर नगर २, शिवशंभोनगर ( कात्रज- कोंढवा रस्ता) स्वामी समर्थ नगर गुरुवार धनकवडी : सर्वे नं. २,३ धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे. नं. ३४,३५,३६, ३७सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर तळजाई पठार सर्व्हे नं.४,५,७,८, गणेशदत्त सोसायटी, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, अविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप कात्रज : सुखसागरनगर भाग १, मॅजेस्टीक टॉवर, रोहितदास महाराज मठ, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग) निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २. कोंढवा : सावकाशनगर, काकडे वस्ती, शिवशंभोनगर (काकडे वस्तीचा भाग) गोकुळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग), वृंदावननगर. शुक्रवार आंबेगाव पठार : आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते सर्वे नं. ३०, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर कात्रज : वसवडेनगर, पोलीस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर. आगम मंदिर संतोषनगर अन्जलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, साईनगर कोंढवाः कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल व्यू सोसायटी, मरळ नगर, कांतिन अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (भाऊ कामठे गल्ली) कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण. आचल फार्म शनिवार कात्रज :, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखील नवीन वसाहत कात्रज कोंढवा : राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११ कोंढवा : राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११ रविवार कात्रज : महादेवनगर भाग १, आनंद नगर, विद्या नगर, महावीर नगर कोंढवा : शिवप्लाझा पिसोळी रस्ता, एच अॅड एम सोसायटी, पारगे नगर, १५ नंबर, आंबेडकर नगर संपूर्ण, पुण्यधाम आश्रम रस्ता, हगवणे नगर, अशरफ नगर पूर्ण

प्रशांत दराडे यांना छत्रपतीची उमेदवारी एक निष्ठेच फळ

Newsworldmarathi Baramati: श्री छत्रपती सहकारी कारखाना भवानीनगर या ठिकाणी प्रशांत दराडे यांना पृथ्वीराज जाचक यांनी उमेदवारी देऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. शेतकरी कुटुंबातील प्रशांत दराडे यांना ही संधी दिल्याने जाचक यांचे कौतुक करण्यात येत आहे. श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात समन्वय साधत ‘श्री जय भवानी माता’ सर्वपक्षीय पॅनल जाहीर करण्यात आला. लासुर्णे, सणसर, उद्धट, अंथुर्णे, सोनगाव व गुणवडी या गटांमधून प्रत्येकी दोन ते तीन उमेदवार तर ‘ब’ वर्ग, अनुसूचित जाती-जमाती, महिला राखीव, ओबीसी व भटक्या-विमुक्त प्रवर्गातून प्रत्येकी एक उमेदवार निवडण्यात आले. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर जागावाटप निश्चित करण्यात आले.

आयसीएसई बोर्डाच्या निकालामध्ये अविषा जॉन पुण्यामध्ये द्वितीय

Newsworldmarathi pune : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्यातर्फे घेतलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत अविषा जॉन हिला 99.4% गुण मिळवून पुणे शहरात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अविषा जॉन हि बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या 3 वर्षीय फाउंडेशन आणि स्पेशल कॉम्प्रिहेन्सिव कोर्सची विद्यार्थिनी आहे. अविषा तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासू वृत्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाते. बाकलीवाल ट्युटोरियल्समध्ये तिने घालवलेल्या तीन वर्षांत ती सतत टॉप परफॉर्मर राहिली आहे. तिचे उत्तम गुण हे तिच्या मेहनतीचे आणि संस्थेने दिलेल्या कठोर मार्गदर्शनाचे फलित आहेत. पुढील वाटचालीत अविषा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा मानस बाळगते आणि आपल्या उज्वल भविष्याकडे ठामपणे वाटचाल करत आहे. सीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ८०३ शाळांमधील दोन लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ५० हजार २४९ म्हणजेच ९९.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स : तपासात मोठा ट्विस्ट

Newsworldmarathi Pune : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधातील खंडणी व बदनामी प्रकरणात आता मोठा राजकीय वळण आले आहे. तपासाच्या धागेदोऱ्या माजी विधान परिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचले असून, वडूज पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहेत. त्यांना शनिवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा उगम एका महिलेच्या आरोपांपासून झाला असून, तिच्या म्हणण्यानुसार जयकुमार गोरे यांनी २०१६ पासून व्यक्तिगत आकस ठेवून त्रास दिला, तसेच अश्लील फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणात पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव तपासात पुढे आल्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले आहे.राजकीय वर्तुळात हे पाऊल रामराजेंना मोठा धक्का मानले जात आहे. पुढील तपासात आणखी कोणती नावे पुढे येतात, याकडे राज्याचे राजकारण लक्ष ठेवून आहे.