लोहगाव-खराडी रस्त्याच्या कामासाठी आमदार बापू पठारे यांचे थेट आमरण उपोषण…
Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव-खराडी परिसराला जोडणाऱ्या केवळ ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी आमदार बापू पठारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज सकाळी ८.३० वाजता त्यांनी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांसह या रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनाला सुरुवात केली. फॉरेस्ट पार्क आणि गोठण ओढा मार्गे जाणारा हा रस्ता लोहगाव-वाघोली मार्गाला जोडतो. मात्र, अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असून, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज अपुऱ्या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याबाबत वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पठारे यांनी केला आहे. विभागाचे अधिकारी ‘बघू, करू’ असे उत्तर देतात, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे पठारे यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
पठारेंच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं आहे?
लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील केवळ ३०० मीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ८.३० वाजता त्याच लोहगाव येथील ३०० मीटर रस्त्यावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं पठारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हत्या की आत्महत्या…! मासिक पाळीत जेवण बनवल्याने विवाहितेची हत्या? नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ
Newsworldmarathi Jalgao : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय-२६) असं जीवनयात्रा संपविलेल्या विवाहितेचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील किनोद येथे गुरुवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, गळफास घेऊन तिने जीवन संपविलेले नसून विवाहितेचा सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे विवाहितेने जीवन संपवलं की हत्या करण्यात आली? यावरून संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री कोळी या जळगाव तालुक्यातील किनोद याठिकाणी पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह राहत होत्या. पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर गायत्री शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. दरम्यान, गुरुवारी (दि.१) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
गायत्रीने गळफास घेतल्याचे समजताच तिचे पती, सासू आणि नणंद फरार झाले होते. गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती गायत्रीच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे.
नातेवाईकांचा आरोप काय?
गायत्रीचा भाऊ सागर कोळी याने सांगितले की, गायत्रीला मासिक पाळी आली असताना तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून घरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. घरात घडलेल्या वादानंतर तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. मात्र, वडील बाहेरगावी गेले होते. असं असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करत गायत्रीच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले, असा आरोप गायत्रीच्या भावाने केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी
Newsworldmarathi pune मे महिन्याच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे, नाशिक आणि गोवा महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उष्णतेपासून बचावासाठी अनेक प्रवासी रात्री प्रवास करत असल्याने रात्रीही महामार्गांवर मोठ्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या. विशेषतः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळा-खंडाळा घाटात ८ ते १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाट पार करण्यासाठी लागणारा वेळ १५-२० मिनिटांवरून २-३ तासांपर्यंत वाढला होता.
खासगी बसचालक राजेंद्र सिंह यांनी मुंबई-पुणे मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांची घोषणा केली असली, तरी सर्व गाड्यांचे आरक्षण भरले असून तत्काळ तिकीटही मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अनधिकृत दलालांकडून जादा दराने तिकीट विक्री होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
मुंबई-नाशिक मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे दिवा, कल्याण फाटा आणि माणकोली येथे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ रस्त्यावर काढावा लागत आहे.
अकरा महिन्याच्या बाळाला बिबट्याने आईसमोरून उचलले…
Newsworldmarathi Dound : दहिटणे (ता. दौंड) येथील भिसे वस्तीवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अकरा महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. अन्वनित धुळा भिसे असे त्या चिमुकल्याचे नाव असून, तो आईसमोर खेळत असताना बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ओढून नेले. आईच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला. या घटनेमुळे गावात मोठा संताप पसरला आहे.
दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचे सतत दर्शन होत असून पूर्वीही पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर यवत पोलीस व वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे. अद्याप बाळाचा ठावठिकाणा लागलेला नाही. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या…
Newsworldmarathi Pune : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत होती. त्याचप्रमाणे शुक्रवारी (२ मे) सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, शुक्रवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,२७८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९५,२९० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९५३ रुपये आहे.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
आजचा सोन्याचा भाव काय?
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,८६०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,१२२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९२,८६०
श्री छत्रपती कारखान्यात पवार-जाचक एकत्र; ‘जय भवानी माता’ पॅनल जाहीर
Newsworldmarathi Bhavaninagar: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात अखेर समन्वय साधला गेला असून सर्वपक्षीय ‘श्री जय भवानी माता’ पॅनल जाहीर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून या पॅनलच्या जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला होता. गुरुवारी पवार, भरणे आणि जाचक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर सर्व जागांवर एकमत झाले.
या पॅनलमधून लासुर्णे (गट क्र. 1) मधून पृथ्वीराज जाचक व शरद जामदार, सणसर (गट क्र. 2) मधून रामचंद्र व शिवाजी निंबाळकर, उद्धट (गट क्र. 3) मधून घोलप पृथ्वीराज व कदम गणपत, अंथुर्णे (गट क्र. 4) मधून शिंगाडे विठ्ठल, दराडे प्रशांत, नरुटे अजित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सोनगाव (गट क्र. 5) मधून काटे अनिल, कोळेकर बाळासाहेब व मासाळ संतोष, गुणवडी (गट क्र. 6) मधून गावडे कैलास, देवकाते सतीश व टिळेकर निलेश यांची नावे निश्चित झाली आहेत. ब वर्गातून अशोक पाटील, अनुसूचित जाती-जमातीमधून मंथन कांबळे, महिला राखीवमधून सौ. माधुरी राजपुरे व सौ. सुचिता सपकळ, ओबीसीमधून तानाजी शिंदे आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष प्रवर्गातून डॉ. योगेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्यास अटक
Newsworldmarathi Beed : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवून आणि त्रासदायक कॉल करून हैराण करणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल काळे (वय २५) असे असून, त्याला पुण्यातील भोसरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (26) यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह एफआयआर नोंदवला.
आरोपी काळेचे मोबाईलचे लोकेशन शोधून काढले. ते पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने काळेला ताब्यात घेतले. पोलि १०। खाक्या दाखविताच आरोपी अमोल काळे याने आपणच मुंडे यांना अश्लील मॅसेज व कॉल करत असल्याचे कबूल केले. यानंतर त्याला अटक केली आणि मुंबईला आणण्यात आले.
अमोल काळे हा विद्यार्थी असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याचे समजते. त्याने अश्लील भाषा का वापरली, तसेच छळ करण्याच्या वर्तनामागील त्याचा हेतू काय याचा तपास सध्या करण्यात येत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
महाराष्ट्र व गुजरात देशाच्या जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Newsworldmarathi Delhi: भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य आज दिवस आहे. या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
शाह पुढे म्हणाले, गुजरात व महाराष्ट्र यांनी, कोणताही वाद न घालता, एकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत विकासाच्यादृष्टीने स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. पंतप्रधान मोदींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात. व्यक्ती मनोमन ठरवले की फूट निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत करायचा आहे, तर त्याचे आदर्श उदाहरण मोदींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” ची कल्पना साकारून दाखवले आहे.
महाराष्ट्र, ही वीर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, त्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले. सामाजिक सुधारणा, भक्ती चळवळ यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.
महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदर, रिफायनरी, एशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क, पहिली बुलेट ट्रेन, गिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे. वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत.
दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे. या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत. २०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल, असं शहा म्हणाले.
कॅन्सर ते पीएच.डी.: नांदेडच्या आदिवासी भागातील युवकाची धैर्यगाथा
Newsworldmarathi Nanded : “माझ्या नावापुढे एक दिवस ‘डॉ.’ लागेल,” ही वाक्यं उच्चारली तेव्हा वय होतं केवळ १८ वर्षं आणि समोरचं वास्तव होतं स्टेज IV कोलन कॅन्सरचं. पण या शब्दांमागे असलेल्या निशांत श्याम चव्हाण यांच्या मनातील जिद्द आणि स्वप्नं आज प्रत्यक्षात उतरली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी भागातून आलेल्या डॉ. चव्हाण यांनी केवळ कॅन्सरवर मात केली नाही, तर अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवून सध्या पुण्यातील नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
२०१६ मध्ये फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्यांना कोलन कॅन्सरचे निदान झाले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टरांनी त्यांना केवळ तीन महिन्यांचे आयुष्य दिले होते. मात्र, निशांत यांनी हार मानली नाही. तब्बल ८ कीमोथेरपी आणि ५ मोठ्या शस्त्रक्रिया यांचा सामना करत त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले.
या कठीण प्रवासात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि एम.ए. अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर SET आणि NET या महत्त्वाच्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या – तेही उपचार सुरू असतानाच.
अलीकडेच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून “पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील पीक पद्धतीतील बदलांचे तुलनात्मक अध्ययन (२०१०-२०२०)” या विषयावर पीएच.डी. मिळवली. हे संशोधन प्रा. डॉ. पी. आर. मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. चव्हाण म्हणतात, “या प्रवासात मी एकटा नव्हतो. माझ्या पाठीशी उभे राहिलेले डॉक्टर, शिक्षक आणि कुटुंब हे माझे खरे आधारस्तंभ आहेत.”
7 वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला; सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने केले उपचार
पुण्यात सध्या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका परिसरात नरेंद्र शेर बहादुर बिस्ता या अवघ्या 7 वर्षाच्या मुलावर एका भटक्या श्वानाने तीव्र हल्ला केला, ज्यामुळे मुलाचा डावा गाल पूर्णपणे वेगळा झाला. रात्री १०:३० च्या दरम्यान नरेंद्रच्या नातेवाईकांचा मला फोन आला आणि झालेल्या घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता झालेल्या घटनेची माहिती मा. कार्यक्षम आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सांगितली.
त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केल्याने नातेवाईकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांची गरज पाहता त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागणार होते.आमचे सहकारी श्री. रविंद्रजी साळेगावकर यांच्या सहकार्याने आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला व तात्काळ जलदगती उपचारांची व्यवस्था केली.
उत्तरदायी अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून मुलाला तात्काळ दाखल करून घेतले, आवश्यक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन्स दिली आणि दुसऱ्या दिवशी तातडीने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
उपचार पूर्ण झाल्यावर आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुलाला भेट दिली आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
नरेंद्रने इतक्या लहान वयात दाखवलेलं धैर्य आणि जिद्द पाहून विशेष कौतुक वाटलं. खरंच, माणसाच्या जिद्दीचे दर्शन कुठे आणि कसे घडेल, सांगता येत नाही. नरेंद्रच्या रूपात ती जिद्द प्रत्यक्ष अनुभवली.

