Arun Jagtap : माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय ६७) यांचे आज २ मे रोजी पहाटे निधन अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना अरुण काका जगताप यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. नगर शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेले अरुणकाका यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान लक्षणीय होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण अहिल्यानगरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते व्याही होते. अरूण जगताप यांनी अनेक पदे भुषवली अरूण जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविले. अहिल्यानगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आमदार अरुण जगताप हे सलग दोनवेळा अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानपरिषदेवर ते निवडून गेले होते. अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली होती भेट ५ एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार जगताप यांच्या तब्ब्येतीबाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून माहिती घेतली होती. उपचारादरम्यान माजी आमदार जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Newsworldmarathi Ahilyanagar: शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या बहिणीकडूनही राज्यातील महायुती सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. महायुती सरकारने निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले. त्यांना २१०० रुपये दर महिना अनुदान देऊ. परंतु, सत्तेत निवडून येताच महायुती सरकारने २१०० रुपये तर दिले नाही. किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपयांचे अनुदानही बंद केले. आता फक्त ५०० रुपये प्रती महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना १५०० नाही, आता ५०० रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार करण्यात आली. शेतकरी सुनीता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात फसवणूक करून विश्वासघात केल्याची तक्रार दिली आहे. यावेळी कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी केल्या. तक्रार अर्जात नेमकं काय? महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने २१०० रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपये अनुदानही बंद केले. आता फक्त ५०० रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, लाडक्या बहिणींना २१०० रुपये पणं नाही, अन् १५०० रुपये पणं नाही. आता ५०० रुपये देऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी ५ मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

अनेक दिवसानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात; बहिणीसोबत रंगला दिलखुलास संवाद

Newsworldmarathi Beed :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे आज पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज परळी वैद्यनाथ येथील तहसील कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परळीतील न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. या समारंभात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. परळीतील कार्यक्रमात झालेल्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांत मनमोकळा संवाद रंगल्याचं पाहायला मिळालं. मागील काही महिन्यांपासून बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त असलेल्या धनंजय यांच्या प्रकृतीची पंकजा मुंडेंनी विचारपूस केली. तसंच काळजी घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी मुंडे बहीण-भावात राज्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मामाने मोबाईल घेतल्याच्या रागातून तरुणीने मारली इमारतीवरून उडी

धक्कादायक…! मामाने मोबाईल घेतल्याच्या रागातून तरुणीने मारली इमारतीवरून उडी मुंबई : मुंबईच्या डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाने मोबाईल हातातून काढून घेतल्याच्या रागातून एका महाविद्यालयीन तरुणीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी डोंबिवलीमध्ये घडली आहे. समीक्षा वड्डी ( वय-२०) असं आत्महत्या केल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश प्रधान यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रधान हे काटई-बदलापूर पाइपलाइन रोड येथील खोणीगाव येथे एका इमारतीत कुटुंबासह राहतात. प्रधान यांची भाची असलेली समीक्षा मंगळवारी रात्री मोबाईलवर बराच वेळ बोलत होती. तिने अभ्यास करावा म्हणून मामाने तिच्या हातातील मोबाईल काढून घेतला. तिचा मोबाईल काढून घेतल्याने रागाच्या भरात समीक्षा गॅलरीत गेली आणि काही कळायच्या आत तिने तडक ११व्या मजल्यावरून उडी मारली ती खाली पडताच मोठा आवाज झाला. त्यावेळी इमारतीतील रहिवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्वरित खाली धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या समीक्षा हिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Ashadhi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे १९ जूनला प्रस्थान; किती मुक्काम? वाचा एका क्लिकवर…

Newsworldmarathi Pune : वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यंदा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान १८ जूनला देहूतून पंढरपूरकडे होणार असल्याची माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली आहे. हा सोहळा ६ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख, दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते. यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला बुधवार, १८ जूनला पालखी सोहळ्याचे देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. देहूमधून १८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर इनामदारवाड्यात मुक्काम असेल. गुरुवारी (दि. १९) इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम. शुक्रवारी (दि. २०) पिंपरीतील एच. ए. मैदान, कासारवाडी, शिवाजीनगरमार्गे पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम. शनिवारी (दि.२१) तेथेच मुक्काम. रविवारी (दि.२२) हडपसरमार्गे लोणी काळभोर येथे मुक्काम. सोमवारी (दि.२३) यवत येथील भैरवनाथ मंदिरात मुक्कामी. मंगळवारी (दि.२४) वरवंड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्काम. बुधवारी (दि.२५) जूनला वरवंड येथून भागवत वस्ती, पाटसमार्गे उडंवडी गवळ्याची येथे मुक्काम. गुरुवारी (दि.२६) बऱ्हाणपूर, मोरेवाडी मार्गे बारामती येथील शारदा विद्यालयाच्या पटांगणात मुक्काम. शुक्रवारी (दि.२७) बारामतीतून मोतीबाग, काटेवाडी, भवानीनगर साखर कारखाना मार्गे सणसर येथे मुक्काम. शनिवारी (ता. २८) सणसरमार्गे बेलवंडी येथे पोहोचेल. तेथे पहिले गोल रिंगण. त्यानंतर बेलवंडी, लासुर्णे, आंथुर्णे मार्गे निमगाव केतकी येथे मुक्काम. रविवारी (दि.२९) निमगाव केतकीहून तरंगवाडी ओढामार्गे इंदापूरला सोहळा दाखल. इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण. त्यानंतर इंदापूर येथील नवीन पालखी तळावर मुक्काम. सोमवारी (दि.३०) इंदापूरहून गोकुळीचा ओढा, बावडामार्गे सराटी येथे मुक्काम. मंगळवारी (दि.१ जुलै) सराटी येथे नीरास्नान झाल्यानंतर सोहळ्यीचे अकलूज येथे माने विद्यालयात दाखल होणार आहे. तेथे तिसरे गोल रिंगण होईल. बुधवारी (दि.२) अकलूजहून माळीनगर येथे पोहोचल्यानंतर पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर बोरगाव श्रीपूर येथे मुक्काम. गुरुवारी (दि.३) बोरगाव येथून दुपारी तोंडले बोंडले येथे पोहोचणार. तेथे पालखी सोहळ्याचा धावा. त्यानंतर पिराची कुरोली येथे मुक्काम. शुक्रवारी (दि. ४) बाघडवस्ती, भंडी शेगावमार्गे बाजीराव विहीर येथे आगमन. तेथे दुसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर वाखरी तळावर सोहळा मुक्कामी. शनिवारी (दि. ५) दुपारी एकनंतर पंढरपूरकडे मार्गस्थ. पादुका अभंग आरती. उभे रिंगण झाल्यानंतर पंढरपुरातील नवीन संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी जाणार आहे.

CM Fadnavis : अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वर्षा ‘वर; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सपत्निक गृहप्रवेश

Newsworldmarathi Mumbai : CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘वर्षा’ निवासस्थानी गृहप्रवेश केला. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील गृहप्रवेशावरून राजकारण रंगले होते. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच, वर्षा बंगल्यावर ते राहायला कधी जाणार, अशी चर्चा रंगली होती. विरोधकांनी सातत्याने त्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. तसेच फडणवीस यांनी मात्र ‘वर्षा’ बंगल्यावर जाणे टाळल्याने या चर्चेला वेगळे वळण लागले होते. वर्षा बंगल्यावर काही अद्भुत असल्याचे बोलले गेले. दरम्यान, मुलगी दिविजा हिची १० वी परीक्षा आहे. वर्षा निवासस्थानी डागडुजीचे काम बाकी आहे. ते काम आणि मुलीची परीक्षा संपल्यानंतर राहायला जाणार, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पूजाअर्चा करत गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशाची चांगलीच गुप्तता पाळण्यात आली होती. पत्नी अमृता फडणवीस यांनी गृहप्रवेशाचे फोटो एक्स माध्यमावरून सर्वत्र व्हायरल केले आहेत.

Maharashtra Day : PM मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…

Newsworldmarathi Mumbai : Narendra Modi : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्याला आज १ मे २०२५ रोजी ६५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या निमित्ताने आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत, महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून शुभेच्छा “भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुंबईतील हुतात्मा चौक स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १ मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अजित पवारांची ‘उद्घाटन’घाई; खासदार मेधा कुलकर्णींची नाराजी

Newsworldmarathi Pune : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी राज्यभर ओळखले जातात. त्यांचा दिनक्रम पहाटेपासूनच सुरू होतो आणि ते वेळेचं काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नेत्यांची तारांबळ उडते. अशीच एक घटना आज पुण्यात पाहायला मिळाली. एका सार्वजनिक कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवारांनी नियोजित वेळेच्या आधीच पार पाडले. यामुळे कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना नाराजीचा सामना करावा लागला. मेधा कुलकर्णींनी थेट अजित पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. मात्र अजितदादांनीही यावर नेहमीप्रमाणे संयम राखत, “परत उद्घाटन करा” असा हलकाफुला सल्ला देत प्रसंगावर विनोदी शैलीत मात केली. नेमकं काय झालं? पुण्यात पहाटेपासून अजित पवार यांनी कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला. परशूराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवार यांनी पहाटे उद्धाटन केलं. पहाटे साडेसहा वाजता या इमारतीच्या उद्धाटनाची नियोजित वेळ होती. त्यासाठी मेधा कुलकर्णीही वेळेत उपस्थित राहिल्या, मात्र अजित पवारांनी दहा मिनिटं आधीच उद्घाटन उरकून घेतलं होतं. वेळेआधीच कार्यक्रम झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दादांनी पुन्हा सोबत उद्घाटन करण्याचं सुचवत तणाव निवळून टाकला.

अमूल दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ…

Newsworldmarathi Pune : मदर डेअरीनंतर आता अमूलनेही दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने बुधवारी किंमतवाढीची घोषणा केली. ही वाढ आजपासून म्हणजेच १ मे २०२५ पासून लागू होईल. अमूलने विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. या वाढीचे कारण म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा खर्च तसेच इथर उत्पादन खर्चात वाढ असल्याचे म्हटले जाते. दुधाच्या किमती वाढवणारी ही सलग दुसरी मोठी डेअरी कंपनी आहे. यामुळे सामान्य माणसावरचा भार आणखी वाढेल. काल मदर डेअरीनेही किमती वाढवल्या होत्या. अमूलने दूध दर वाढीची बुधवारी, ३० एप्रिल रोजी घोषणा केली. ही वाढ सर्व प्रकारच्या दुधावर लागू असेल. ५०० मिली पॅकवर १ रुपयांची वाढ होईल. अमूल हा भारतातील सर्वात मोठा दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत बदल केल्यानंतर आता ग्राहकांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. हा बदल सर्व प्रकारच्या दूध प्रकारांना लागू हा बदल जवळजवळ सर्व प्रकारच्या अमूल दूध प्रकारांना झाला आहे. कंपनीने म्हटले की, ‘अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल स्लिम अँड ट्रिम, अमूल चाय माझा, अमूल ताजा आणि अमूल गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.’ याचा अर्थ असा की आता तुम्हाला अमूलचे दूध खरेदी करण्यासाठी थोडे जास्त पैसे द्यावे लागतील

जातीनिहाय जनगणन म्हणजे सामाजिक न्यायासाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया…

0
Newsworldmarathi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जाती आधारित माहितीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशात सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करणारा आणि प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. दशकानुदशके काँग्रेसने सत्तेत असताना या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर विरोधात असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला. मात्र आता, मोदी सरकारने टाकलेल्या निर्णायक पावलामुळे समाजातील सर्व स्तरांतील मागास, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळेल, त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल. जातनिहाय जनगणना का महत्वाची ? • सर्व समाजघटकांचा खरा सामाजिक व आर्थिक डेटा उपलब्ध होईल • योजनांचा लाभ उपयुक्त ठिकाणी व योग्य प्रमाणात पोहोचेल • वंचित, मागास व उपेक्षित घटकांपर्यंत विकास पोहोचवणे शक्य होईल • सामाजिक समतेसाठीची पावले अधिक गंभीर आणि प्रभावी ठरतील • डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया सक्षम होईल