जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

0
Newsworldmarathi Pune : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला. राज्य शासनाच्या सर्व योजना गतीने राबवाव्यात, प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधान मंत्री जन मन योजनेंतर्गत घरकुलांचा पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने लाभ देण्यास अडचण असल्याच्या बाबतीत शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी महसूल अधिकाऱ्यांशी समन्वयाने काम करावे. उपलब्ध शासकीय जागांचे प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत. अग्रीस्टॅक पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करणे, त्यांची माहिती भरण्याचे काम प्राधान्याने करावे जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात गतीने कृषीच्या योजनांचा लाभ देता देता येईल. शेतकरी नोंदणीसाठी सामान्य सुविधा केंद्राचाही उपयोग करा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीबाबत आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने तालुकानिहाय किती ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या. उपलब्ध जागेवर प्रकल्प उभारण्याची व्यवहार्य तपासणी करून तात्काळ कामे सुरू होतील, असे पाहावे, असेही ते म्हणाले. अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी ई-हक्क प्रणालीचा वापर तात्काळ सुरू करावा. ई-पीक पाहणीचे १०० टक्के काम गतीने होईल हे पाहावे. जमीन महसूल कर वसुलीच्या अनुषंगाने ई- चावडी प्रणालीचा प्रभावी उपयोग करावा, डिजिटल पंचनामा प्रणालीद्वारे पंचनामे करावेत. सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी डॅशबोर्डचा वापर करावा. राज्य शासनाने दिलेल्या सात सूत्री कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले, घरकुलांसाठी जागा उपलब्धता तसेच निधी उपलब्ध असलेल्या परंतु जागेअभावी काम सुरू न झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जागा उपलब्ध करण्याबाबत महसूल आणि गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. जल जीवन मिशनच्या कामांसाठी जागेबाबत प्रश्न त्वरित सोडवावेत, असेही ते म्हणाले. यावेळी ई मोजणी, विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादन, स्वामित्व योजना, ई क्यूजे कोर्ट, सेवा हक्क अधिनियमानुसार उपलब्ध करून देण्याच्या योजना आदीबाबत आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागासाठी सध्याची आर्थिक तरतूद पाहता प्रस्तावित नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास 20 ते 25 वर्षे लागू शकतील असे प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांद्वारे निधी उभारण्याचा विचार आहे; निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता भासणार नाही, असेही ते म्हणाले. यशदा येथे आयोजित कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळविण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पांबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकचे महासंचालक प्रमोद मांदाडे, यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून आणि समर्पण भावनेतून बाळासाहेब विखे- पाटील आणि स्व. गणपतराव देशमुख यांनी 25 वर्षांपूर्वी पाणी परिषदेची स्थापना केली, असे सांगून मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, ही समर्पण भावना ठेवली तर आपण राज्य दुष्काळमुक्त करू शकतो. उपलब्ध साधनांमध्ये राज्याचे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली कसे आणता येईल, अधिकाधिक साधनांचा वापर करुन राज्य दुष्काळमुक्तीकडे कशी वाटचाल करील याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. हाच विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असेही ते म्हणाले. श्री. विखे- पाटील पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता चौकटीबाहेर जाऊन तसेच व्यापक दृष्टिकोन ठेऊन विचार करण्याची गरज आहे. वरिष्ठांनी केवळ व्यवस्थापनाचे काम न करता नियमितपणे आपल्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन क्षेत्रपातळीवर येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर करावेत, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांची शेतीच्या उपलब्धतेवर आणि अडविलेल्या पाण्यावर त्यांची शेती फुलवू शकलो तर त्यांच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करू शकतो. पाणी वितरणाच्या यंत्रणा सक्षम करुन उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी कसा करता येईल, यादृष्टीने व्यापक दृष्टीकोनातून विचार करावा, अशाही सूचना श्री. विखे- पाटील यांनी दिल्या. *जुन्या नियमांचा विचार करण्यासाठी समिती स्थापन करणार* पाटबंधारे विभागातील कालबाह्य झालेल्या कायदे व नियमांचा विचार करुन त्याबाबत शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येईल, असेही जलसंपदामंत्री म्हणाले. तसेच कृष्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याच्या स्तरावर पाणी क्षेत्रात काम केलेले वरीष्ठ अनुभवी व्यक्तींचे सल्लागार मंडळ स्थापन करण्याचीही गरज आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक महानगरपालिकेने, अ वर्ग नगरपालिका आदींना किमान त्यांचे 30 ते 40 टक्के वापर झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणे गरजेचे राहील, असे धोरण आणावे लागेल. शहरांनी नद्यांमध्ये थेट मलनिस्सारणाचे पाणी न सोडता त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करावे लागेल. पाटबंधारे खात्याचे काम केवळ पाणी पुरविण्याचे नसून ते सुव्यवस्थित राखण्याचे दायित्वदेखील संबंधित संस्थांवर सोपवावे लागेल. पाटबंधारे विभागाच्या आहेत त्या यंत्रणा कशा प्रकारे सक्षम करता येतील यासाठी संबंधित मंडळांच्या अधीक्षक अभियंता अधिनस्त कार्यकारी अभियंता यांनी बैठका घेऊन आराखडा तयार करावा. त्याबाबत विभागनिहाय आढावा घेण्यात येईल, अपर मुख्य सचिव श्री. कपूर म्हणाले, महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांमुळे राज्याचे परिवर्तन होऊ शकेल. याकडे केवळ किती सिंचन क्षमता वाढेल या एकाच दृष्टीकोनातून पाहता येणार नाही, येणाऱ्या पाण्यामुळे जमीन सुजलाम् सुफलाम् झाल्यामुळे आर्थिक परिवर्तन होऊन शेतकरी आत्महत्यासारखा प्रश्नावर मात होऊ शकते. समृद्धता आल्यामुळे सामाजिक व्यवस्थांवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रात वैनगंगा- नळगंगा- पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचे पुढील सहा महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करुन काम सुरू करण्यावर भर दिला जाईल. मराठवाड्यामध्ये नदी जोड प्रकल्पातून सुमारे 55 टीएमसी पाणी उपलब्ध करुन द्यायचे आहे. त्याचेही लवकर कार्यादेश देण्याबाबतचे काम, उल्हास आणि वैतरणामधून पाणी उपसा करुन 67.5 टीएमसीची मोठी योजना करण्यात येणार असून अंतिम विस्तृत प्रकल्प अहवाल प्रगतीपथावर आहे. तसेच दमनगंगा वैतरणा, दमनगंगा एकदरे या योजना अंतिम टप्प्यात आहेत, असेही यावेळी श्री. कपूर यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री श्री. म्हस्के पाटील, महाराष्ट्र पाणी परिषदेचे सदस्य या. रा. जाधव, डॉ. दी. मा. मोरे, सेवानिवृत्त पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक डॉ. एस. ए. नागरे यांनी मनोगत केले. प्रास्ताविक श्री. कपोले यांनी केले. पाणी परिषदेच्यावतीने नदीजोड प्रकल्पाबाबत तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी प्रकल्पाबाबतचे सविस्तर सादरीकरण केले. कार्यशाळेस जलसंपदा विभागाचे कृष्णा व गोदावरी खोऱ्यांचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र पाणी परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

महाबँकेचे सरव्यवस्थापक अतुल जोशी यांचे निधन

0
Newsworldmarathi pune :बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक अतुल चिंतामण जोशी (वय ५८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ ते महाबॅंकेच्या सेवेत होते. या कालावधीत पुण्या-मुंबईसह गोवा आणि कोकणातील भिरा या ठिकाणी जोशी यांनी विविध अधिकारपदे भूषवली. सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे हरहुन्नरी अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. महाबँकेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. बँकेच्या फुटबॉल संघातून ते अनेक वर्षे फुटबॉल देखील खेळले. नूतन मराठी विद्यालयाच्या नूमवीय या माजी विद्यार्थी संघटनेसमवेत त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशातील सर्वोत्कृष्ट 30 हेअरस्टायलिस्टमध्ये पुण्याचे हेअरस्टायलिस्ट

0
Newsworldmarathi Pune : गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट या राष्ट्रीय पातळीवरील हेअरस्टायलिस्ट स्पर्धेत रिच बिट सलून (वाकड) येथील रोहित सुरवरसे आणि अमो युनिसेक्स सलून (खराडी) येथील श्वेता आचार्य हे टॉप तीस फायनलिस्टमध्ये निवडले गेले आहेत. ही पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. केसांचा रंग तसेच केसांची निगा राखणारा गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL) चा प्रमुख व्यावसायिक हेअर ब्रँड गोदरेज प्रोफेशनलने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हेअरस्टायलिस्टची हटके प्रतिभा ओळखणे तसेच त्यांच्या व्यावसायिक वाढीस समर्थन देणे हे गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटचा हेतू आहे. मुंबईत झालेल्या या महाअंतिम फेरीत देशभरातून निवडलेले 30 प्रतिभावान सहभागी झाले होते. प्रत्येक फायनलिस्टने रॅम्पवर गोदरेज प्रोफेशनलच्या क्युरेटेड हेअर कलर कलेक्शनचे अत्यंत देखणे सादरीकरण केले. इतर 28 फायनलिस्टसह ग्रँड फिनाले इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या रोहित आणि श्वेता यांनी हेअरकलर्सचे उत्तम प्रदर्शन केले. 30 कुशल व्यावसायिकांच्या या पहिल्या तुकडीला यियान्नी त्सपाटोरी, गोदरेज प्रोफेशनलचे हेअरचे क्रिएटिव्ह डायरेक्टर, आदरणीय मार्गदर्शक शैलेश मूल्या, नॅशनल टेक्निकल हेड आणि नजीब-उर-रेहमान, गोदरेज प्रोफेशनलचे टेक्निकल अँबेसेडर यांच्या नेतृत्वाखाली मास्टरक्लासमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळाली. अभिनव ग्रांधी, महाव्यवस्थापक, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL), म्हणाले, “गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटला मिळालेल्या उदंड प्रतिसादासाठी आम्ही आनंदी आहोत. आम्हाला याचा अभिमान वाटतो. हे व्यासपीठ प्रतिभावान केशरचनाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची केवळ संधी देत नाही तर या क्षेत्रातील शिक्षण तसेच प्रशिक्षणाप्रती आमची बांधिलकी देखील दर्शवते. या उपक्रमाद्वारे, वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधीसह हेअर स्टायलिस्टला सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील सलून व्यावसायिकांना संधी आणि त्यांची प्रगती करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेच्या दिशेने हे आमचे एक पाऊल आहे.”

देशांतर्गत वैविध्यपूर्ण पर्यटनाला चालना मिळतेय : आपटे

0
Newsworldmarathi Pune : “भारताला निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. निसर्गनिर्मित अद्भुत अशी अनेक ठिकाणे भारतामध्ये आहेत. पर्यटकांनी देशांतर्गत असलेल्या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा अनुभव घ्यायला हवा. पर्यटन मंत्रालयाकडून यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, नाविन्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास व प्रसार केला जात आहे,” असे मत केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी गौरी आपटे यांनी व्यक्त केले. कोकणातील कातळशिल्पे पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने कॅप्टन निलेश जर्नी विथ विंग्जच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय पाचव्या पुणे पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पर्यटन मंत्रालयातील अधिकारी स्वाती बारसोडे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार, कॅप्टन निलेश गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, सचिव प्रथमेश कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी निलेश गायकवाड लिखित ‘माझी मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या व देशाच्या समृद्ध पर्यटन वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्लक्षित ठिकाणांबाबत माहिती दिली जात आहे. देशांतर्गत व विदेशातील पर्यटनाचे अनेक पर्याय असलेल्या जवळपास ५० टुरिस्ट कंपन्यांचे स्टॉल्स येथे आहेत. पर्यटनप्रेमींना प्रेरणा आणि महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने हा फेस्टिव्हल पुणेकरांसाठी रविवारपर्यंत (दि. १९) विनामूल्य खुला असणार आहे. तीनही दिवस दर तासाला लकी ड्रॉ, तसेच दिवसांतून तीनवेळा ग्रँड लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. शमा पवार म्हणाल्या, “आपण जगभर प्रवास करतो, पण जर आपल्याला आपल्याच महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती नसेल, तर हे अयोग्य आहे. महाराष्ट्राला पर्यटनाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. परंतु अजूनही अनेक ठिकाणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही किंवा तिथे प्रवासाच्या सोयी उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणांना लोकप्रिय करण्यासह तिथे पायाभूत सुविधांची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनही पुढाकार घेत आहे.” प्रवीण घोरपडे यांनी स्वागत केले. प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले. चंदन पठारे यांनी आभार मानले.

‘संविधान सन्मान दौड २०२५’ मध्ये सुमारे १० हजार नागरिक धावणार

0
Newsworldmarathi Pune : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ‘ चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, बार्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या २५ जानेवारी २०२५ रोजी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची नाव नोंदणी सुरू झाली असून त्याला पुणेकरांसह देश , विदेशातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत विविध अंतरासाठी, विविध वयोगटातील सुमारे १० हजार नागरिक धावतील अशी माहिती ‘संविधान सन्मान दौड’ चे मुख्य आयोजक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी  सांस्कृतीक महोत्सव समितीचे सचिव दीपक  म्हस्के उपस्थीत होते. अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ची माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीाईं फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने या ‘संविधान सन्मान दौड २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्षे असून मागील वर्षी या स्पर्धेत तब्बल ५० देशांचे ५ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. तर यावर्षी सुमारे १० हजार स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे. यंदाची स्पर्धा २५ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथून सुरू होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर पारितोषीक वितरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टी चे महासंचालक डॉ. सुनिल वारे,, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,  पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा,  प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्ट्रार ज्योती भाकरे, डॉ. विजय खरे ( विभाग प्रमुख संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.  या स्पर्धेला आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अण्णा बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभाल्याचे वाडेकर यांनी सांगितले.  दीपक म्हस्के म्हणाले, अमृत महोत्सवी संविधान सन्मान दौड २०२५ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होईल; त्यानंतर आयूका गेट, डॉ. आंबेडकर चौक, औंध रोड बोपोडी, भाऊ पाटील रोड, शाहू चौक येथून यु टर्न पुढे आई आप्पा मंदिर, विद्यापीठ मेन गेट, विद्यापीठ मेन बिल्डिंग आणि समारोप खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे होणार आहे. ही स्पर्धा 16 वर्षांखालील, 18 वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली जाणार आहे. ती प्रामुख्याने 3 किलो मीटर, 5 किलो मीटर आणि 10 किलो मीटर अंतराची असणार आहे. याप्रमाणेच दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार असून ही दौड 2 किलो मीटर अंतराची असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. २१ जानेवारी २०२५ ही नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास एक टी-शर्ट ,सर्टिफिकेट, मेडल, संविधानाची प्रत, नाष्ट्याचे किट, मेडिकल सुविधा देण्यात येणार आहेत, तसेच सर्व वयोगटातील पुरुष आणि महिला गटात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०१११७१०, ९८२२४८३७१४, ९६५७०७५१२३, ९०२१८०८८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुण्यातील ट्रान्सजेंडर कार्यकर्ते सारंग पुणेकर यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील ट्रान्सजेंडर कार्यकर्ते सारंग पुणेकर यांचे बुधवारी निधन झाले. सारंग यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्या पुण्याच्या कवयित्री होत्या आणि त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात तिने पुण्यातील वंचितांसाठी महत्त्वपूर्ण काम केले. ती ट्रान्सजेंडर समुदायातून विद्यापीठाची पहिली विद्यार्थिनी होती. “अज्ञान आणि बहिष्काराच्या संस्कृतींविरुद्ध सर्वसमावेशकतेसाठी लढा देणारा एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ता – सारंग पुणेकर यांच्या दुःखद आणि अकाली निधनाची बातमी मला अत्यंत धक्कादायक आहे. मी सारंग पुणेकर यांच्या शोकाकुल कुटुंबियांना आणि मित्रांप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतो. ” – प्रकाश आंबेडकर

पुणे- नाशिक महामार्गवरील अपघातात 9 जण जागीच ठार

Newsworldmarathi Pune : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ घडलेला हा भीषण अपघात अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या घटनेत चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, ज्यामुळे जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करता आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यामुळे मॅक्स ऑटो ही चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर जाऊन मॅक्स ऑटो आदळली. या अपघातात आयशर आणि मॅक्स ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या घटनेचे कारण नेमके काय होते याबाबत अद्याप स्पष्टता नाही, पण महामार्गावरील वाहतुकीची नियमबाह्य पद्धत आणि अतिवेग यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा दुर्दैवी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना आणि वाहनचालकांकडून सावधगिरीची गरज आहे. मयत नावे पुढील प्रमाणे 1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे 2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे 5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे 7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर 8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष 9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे

अबब…अकरा कोटीचा घोडा!

Newsworldmarathi Baramati : बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये हैदराबादच्या नवाबांनी तब्बल 11 कोटी रुपये किमतीचा सोनेरी रंगाचा घोडा आणल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली आहे. या घोड्याचे वैशिष्ट्य त्याचा चमकदार सोनेरी रंग, त्याची अभिजात रचना आणि अप्रतिम देखावा आहे. हैदराबाद येथील नवाबाने बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल 11 कोटीचा घोडा आणला आहे. या घोड्याचा रंग सोनेरी असून या घोड्याला पाहण्यासाठी कृषी प्रदूषणामध्ये एकच गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा घोडा विशेष प्रजातीचा असून, त्याला देशभरात उत्कृष्ट घोड्यांपैकी एक मानले जाते. प्रदर्शनात या घोड्याचे दर्शन घेण्यासाठी प्रेक्षकांची रीघ लागलेली आहे. कृषी प्रदर्शनातील हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, या घोड्याने संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी असा दुर्मिळ अनुभव असतो, ज्यामुळे हा घोडा चर्चेचा विषय बनला आहे. मालेगावच्या घोडेबाजारामध्ये या घोड्याची किंमत तब्बल 11 कोटी ठरविण्यात आल्याचे बोलले जाते. देशातील हा एकमेव घोडा असल्याचेही सांगण्यात आले आहे.मारवाडी जातीचा हा घोडा असल्याचे सांगण्यात आले आहे याचबरोबर अशा प्रकारचे घोडे भारतामध्ये फार पाहायला मिळत नाहीत

26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार हप्ता

0
Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींना दिल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप वाटप झालेला नाही. तथापि, मंत्रिमंडळाने जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी ₹3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाभार्थींना दिलासा मिळेल आणि योजनेंतर्गत आर्थिक सहाय्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित होईल. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्थैर्य आणि सक्षमता प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. जुलै 2023 मध्ये महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दिला जातो. आतापर्यंत 2 कोटी 46 लाख महिलांना दरमहा ₹1500 प्रमाणे मदत देण्यात येत आहे. डिसेंबर महिन्याचे हप्ते 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या निधीची उपलब्धता कायम असून, महिलांविषयी सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार हे प्रयत्न करत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेल्या ₹2690 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, हा हप्ता येत्या 26 जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यावर जमा केला जाईल. या निर्णयामुळे महिलांना योजनेचा लाभ वेळेत मिळण्याची अपेक्षा आहे.