Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधील राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आला असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वाती चिटणीस यांनी अधिकृतपणे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सादर केल्याने प्रभागातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
स्वाती चिटणीस या युवा नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून संघटन कौशल्य, लोकसंपर्क आणि सामाजिक कार्यातील त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग हा त्यांच्या कार्याचा प्रमुख आधार मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद राहिला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची विश्वासार्ह आणि कार्यक्षम कार्यकर्ती अशी ओळख निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक ४० मधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही पाहायला मिळते. सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, युवकांशी संवाद तसेच स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. यामुळेच त्यांच्या उमेदवारी अर्जाची प्रभागात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
अर्ज दाखल करताना स्वाती चिटणीस म्हणाल्या की, “पक्षाने मला संधी दिल्यास त्या संधीचे निश्चितपणे सोने करेन. प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन.” त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या स्वाती चिटणीस यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये त्या सातत्याने भेटीगाठी घेत असून नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा भर असल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास वाढत आहे.
आज टिळेकर नगर परिसरात स्वाती चिटणीस यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत भेटीगाठी घेतल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. या संवादादरम्यान स्वाती चिटणीस यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व विकासात्मक कार्याची माहिती नागरिकांना दिली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन स्वाती चिटणीस यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, तसेच प्रभागातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि व्यापारी वर्गाच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीगाठी दरम्यान नागरिकांनीही आपल्या अपेक्षा, सूचना व समस्या मोकळेपणाने मांडल्या. स्वाती चिटणीस यांनी त्या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या या संवादात्मक आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
Newaworldmarathi Pune: महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवत राज्यात नंबर एकचा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाकडून मिळालेल्या या विजयाबद्दल प्रभागातील प्रमुख दहा चौकांमध्ये नागरिकांना लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा आनंदोत्सव गुलटेकडी चौक, संत नामदेव शाळा चौक, संत ज्ञानदेव शाळा चौक, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, सिटी प्राईड थिएटर सातारा रोड, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस चौक, मार्केट यार्ड प्रेमनगर चौक, डॉ. आंबेडकर नगर चौक, संदेश नगर भिमाले कॉम्प्लेक्स तसेच ज्योती हॉटेल चौक, समता नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २१ (ब) ओबीसी महिला राखीव गटातील प्रमुख दावेदार सौ. समृद्धी अरकल-शेरला यांच्यासह संदीप शेळके, महेश कारंडे, ईश्वर वायाळ, बापू कांबळे, गणेश शेरला, महेश सकट, बसवराज गायकवाड, अविनाश गायकवाड, अनिल निळुलर, बाळासाहेब शेलार, चितामणी जगताप यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना स्वतः लाडू बनवत व वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात तसेच उंटावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “जय श्रीराम” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाजपाच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
Newsworldmarathi Pune: माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रचारासाठी त्यांची कन्या पूर्वा बिडकर या सक्रियपणे मैदानात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक २४ मध्ये त्या नागरिकांशी थेट संवाद साधत असून, वडील गणेश बिडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांची माहिती त्या नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. घराघरांत जाऊन संवाद साधत पूर्वा बिडकर नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेत आहेत.
Oplus_16908288
प्रभाग २४ मधील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत नागरी समस्यांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा केली जात आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून, भविष्यातही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पक्षाकडून ठोस प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास पूर्वा बिडकर यांनी व्यक्त केला.
माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभाग २४ मध्ये विविध विकासकामे मार्गी लावली. रस्ते सुधारणा, नागरी सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या कामांचा लेखाजोखा मांडत पूर्वा बिडकर नागरिकांशी संवाद साधत आहेत. “वडिलांनी केलेल्या कामांची हीच खरी पावती आहे. नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा आम्हाला पुढील कामांसाठी बळ देणारा आहे,” असे त्या म्हणाल्या.
Oplus_16908288
यावेळी पूर्वा बिडकर यांनी नागरिकांना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सक्षम असून, नागरिकांनी साथ दिल्यास प्रभाग २४ चा अधिक वेगाने विकास करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जनसंवाद मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आपल्या समस्या मांडत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
Newsworldmarathi Pune: इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अप्रतिम आशिष ढेंगे याने रायफल शूटिंग या खेळात उल्लेखनीय यश मिळवत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक किमान ४०० पैकी ३६५ गुणांची अट असताना, अप्रतिमने ३७४ गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे शाळा, शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रायफल शूटिंगसारख्या अत्यंत एकाग्रता, संयम आणि अचूकतेची मागणी करणाऱ्या खेळात अप्रतिमने दाखवलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळावरील प्रचंड आवड यामुळेच त्याला हे यश मिळाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक फटक्यावर लक्ष केंद्रित ठेवत आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नांचे हे फळ असल्याचे क्रीडा प्रशिक्षकांचे मत आहे.
अप्रतिम आशिष ढेंगे याच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक, शाळेचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा मोलाचा पाठिंबा आहे. खेळासोबतच शिक्षणातही तो सातत्याने प्रगती करत असून, दोन्ही आघाड्यांवर संतुलन साधत तो पुढे जात आहे.
राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत अप्रतिम आणखी उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शाळा प्रशासन, शिक्षक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अप्रतिमने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे
Newaworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१-ब (महिला राखीव) मुकुंद नगर–सॅलसबरी पार्क या प्रभागातून समृद्धीताई अरकल (शेरला) यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट ध्येय ठेवून आपण ही निवडणूक लढवत असल्याचे समृद्धी अरकल यांनी सांगितले.
प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर भर देत नियोजनबद्ध विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे. प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर समृद्धी अरकल यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते गणेश शेलार उपस्थित होते. या कार्य अहवालामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेली सामाजिक कामे, नागरिकांसाठी राबविलेले उपक्रम तसेच भविष्यातील विकास आराखड्याची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समृद्धी अरकल यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजकार्याची जाण, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि प्रभागासाठी काम करण्याची तळमळ असल्याने त्या निश्चितच प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Newsworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी युती आघाडीच्या बैठकांनी राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे भाजपने आज जवळपास 22 तगड्या चेहऱ्यांना पक्षांमध्ये आणत विरोधकांवर पहिला डाव टाकला आहे. भाजपने पुणे महापालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे सोपवली आहे. या जोडीच्या रणनीतीमुळे आजचे प्रवेश घडल्याची चर्चा आहे. भाजपचे यंदाच्या निवडणुकीत 125 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार
आज प्रवेश केलेल्यांमध्ये सर्वपक्षीय नेते असून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसह ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, अजित पवार गटाच्या सायली रमेश वांजळे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, खंडू सतीश लोंढे, पायल विलास तुपे, प्रतिभा चोरगे, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, इंदिरा तुपे, विकास नाना दांगट, कणव वसंतराव चव्हाण, अमोल देवडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुळशी येथील पदाधिकारी भानुदास पानसरे, गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, किरण साठे, सचिन पानसरे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, प्रवेशवेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले “पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जनसेवेचे उत्तम कार्य केले आहे. भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. आज तुम्ही या परिवारात सामील झाला आहात. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही,”
केंद्र आणि राज्याचा वेगवान विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत आहे. या विकासप्रक्रियेत आता तुमचाही सहभाग असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादा आणि गणेश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावी काम केले आहे. जनतेची सेवा करण्याची तुमची ही पद्धत वाखाणण्याजोगी आहे, असेही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० च्या सर्वांगीण विकासासाठी स्वातीताई चिटणीस सज्ज झाल्या असून, विकासाचा ठोस अजेंडा घेऊन त्या मैदानात उतरल्या आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधांवर भर देण्याचा त्यांचा निर्धार आहे. प्रभागातील समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नियोजित आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले आहे. जनतेशी थेट संवाद साधत विकासाचा दृष्टिकोन पोहोचवण्यावर स्वातीताई चिटणीस यांचा भर असून, प्रभाग ४० मध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
स्वाती चिटणीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, कार्यपद्धती आणि पुढील नियोजन यासंदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी कार्यक्षम आमदार चेतनदादा तुपे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत निवडणूक प्रचाराची नियोजित सुरुवात कशी करावी, तसेच जनतेपर्यंत विकासाचा दृष्टिकोन प्रभावीपणे कसा पोहोचवावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
भेटीदरम्यान प्रचाराचे टप्प्याटप्प्याने नियोजन, जनतेशी थेट संवाद साधण्याच्या पद्धती, तसेच स्थानिक प्रश्न आणि विकासकामे यांचा योग्य समतोल साधण्यावर भर देण्यात आला. नागरिकांचा विश्वास संपादन करत सकारात्मक वातावरणात प्रचार राबविण्यासाठी कोणती रणनीती उपयुक्त ठरेल, याबाबतही आमदार चेतनदादा तुपे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आमदार चेतनदादा तुपे यांनी स्वाती चिटणीस यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आमदार चेतनदादा तुपे यांचे मार्गदर्शन हे केवळ शुभेच्छांपुरते मर्यादित नसून, पुढील वाटचालीसाठी दिशा देणारे आहे. त्यांनी मांडलेले विचार, नियोजनाची स्पष्ट दृष्टी आणि जनतेशी प्रभावी संवाद साधण्याचे मार्ग आगामी प्रचारात निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
Newsworldmarathi Pune: महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून उमेदवारी मिळवण्याकडे लागलेल्या आहेत. दुसरीकडे प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठीवर देखील जोर दिला जात आहे. यामध्ये आजच्या आधुनिक काळातील साधनांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केईएम हॉस्पिटल भागामध्ये सध्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
बिडकर यांनी नगरसेवक तसेच सभागृह नेते म्हणून काम करताना प्रभागाच्या विकासासाठी केलेल्या विकासकामांची माहिती देणाऱ्या एलईडी व्हॅनचा शुभारंभ आज करण्यात आला. या प्रचार रथांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाचा अजेंडा देखील मांडला जाणार आहे.
यावेळी गौरीताई बिडकर, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा अनघा दिवाणजी, कल्पनाताई बहिरट, गणेश यादव, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उद्धव मराठे, लाला दवे, संदीप कडू, योगीराज मालेगावकर, सागर गायकवाड, निखिल बहिरट, राजेंद्र नरवडे, माऊली शिवले, सुनील पाहूजा यांच्यासह प्रभाग क्रमांक 24 मधील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: उबाठा गट आणि मनसे या दोन अंतीम टप्प्यात असलेल्या पक्षांचे जागावाटप अंतीम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खा. संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न असून ज्या मनसेवर शिवीगाळ करत जहरी टीका केली होती त्यांच्याच शिवतीर्थाचे उंबरठे उद्धव ठाकरेंना झिजवावे लागणे हा नियतीचा खेळ आहे असा हल्लाबोलही श्री. बन यांनी केला.
मुंबई ही कोणाची खासगी जहागीर नाही
मुंबई सर्वसामान्य नागरिकांची आहे. ज्या उबाठा गटाने खासगी जहागीर असल्याप्रमाणे मुंबईला ओरबाडले त्यांना ‘मुंबई आमचीच’ असे म्हणताना लाज वाटायला हवी असा प्रहार श्री. बन यांनी केला. मुंबई हे आमचे घर म्हणता पण कुठलेही घर हे नुसत्या चार भिंतींवर उभे रहात नसते तर विचारांवर उभे असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी शिवसेना बांधली होती त्यांचे विचार पायदळी तुडवत उबाठा गटाने सत्तेसाठी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करून घराची भाषा करणे राऊतांना शोभत नाही अशी टीका त्यांनी केली.
फेसबुक लाइव्हवर चालणारे उबाठा सरकार टेस्ट ट्यूब बेबी होते. महायुती सरकारला टेस्ट ट्यूब बेबी संबोधत टीका करणा-या राऊतांना लक्ष्य करत हे सरकार जनतेच्या आशीर्वादातून निर्माण झालेले सरकार आहे, दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेले हे जनतेचे लाडके सरकार आहे असे श्री. बन यांनी सुनावले. घरातून फेसबुक लाइव्हवर चालणारे उबाठा सरकार टेस्ट ट्यूब बेबी होते. 90 जागा लढून 20 जागा जिंकलेल्यांनी खरे बेबी कोण हे ओळखावे असा टोमणाही श्री. बन यांनी लगावला.
शिवतीर्थावर उबाठा गटाचा अधिकार नाही
शिवतीर्थ सार्वजनिक वारसा आहे. या शिवतीर्थावर दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभा झाल्या होत्या.‘शिवतीर्थ आमचेच’ असा दावा करू नका, ज्या दिवशी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा आणि राऊतांनी अफझलखानाची वंशावळ पुढे नेण्याचे काम केले त्याचवेळी शिवतीर्थाचाही अधिकार गमावला अशी सणसणीत टीका श्री. बन यांनी केली.
खरा हरामखोर हा उबाठा गट
निवडणूक आयोगाबद्दल हरामखोर शब्द वापरून लोकशाहीचा अपमान राऊतांनी केला आहे. 2019 ला भाजपा सोबत युतीमध्ये निवडणूक लढून सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसणा-या उबाठा गटाला हरामखोर हा शब्द चपखल बसतो. सत्तेसाठी काँग्रेसकडे गेले, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता का असा सवालही श्री. बन यांनी केला.
काँग्रेसमधील गळतीला कारणीभूत राहुल गांधी आणि सपकाळ…
राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असल्याने काँग्रेस आमदार भाजपामध्ये येण्याची लाट सुरू झाली आहे. पक्षात येणाऱ्यांचे भाजपा मध्ये नेहमीच स्वागत केले जाते असेही श्री. बन म्हणाले.
– मुकुंद कुलकर्णी
कार्यालय सचिव