Newsworldmarathi Pune: कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणारी आणि त्यांच्या मनातील स्वप्नांना पंख देणारी हरिहरेश्वर – श्रीवर्धन सहल प्रभाग क्रमांक २८ साठी अविस्मरणीय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका प्रिया गदादे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गदादे आणि प्रेम गदादे यांच्या पुढाकारातून आयोजित झालेल्या या सहलीने महिलांच्या मनात आनंदाचा आणि समाधानाचा वर्षाव केला. रोजच्या संसाराच्या चक्रात, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडलेल्या या महिलांना स्वतःसाठी वेळ काढणेही कठीण. त्यामुळे ही सहल त्यांच्या आयुष्यात एक ताजेतवाने करणारी पर्वणी ठरली.
पहाटेच उत्साहाने निघालेल्या या सहलीची सुरुवातच महिलांच्या आनंदाने झाली. बसमध्ये झालेल्या गप्पा, गाणी, हशा–टवाळक्या यांनी वातावरण अधिक रंगतदार झाले. अनेक महिलांसाठी ही सहल म्हणजे आयुष्यातील पहिल्यांदाच केलेला प्रवास होता. काहींनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, तर काहींनी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गटासोबत बाहेर पडण्याचा अनुभव घेतला. प्रवासादरम्यान नव्या ओळखी जुळल्या, जुन्या मैत्री घट्ट झाल्या आणि एकात्मतेची जाणीव अधिक दृढ झाली.
या सहलीचे आयोजन करताना गदादे कुटुंबाने घेतलेली काळजी सर्वांच्या नजरेत भरली. प्रवास, भोजन, सुरक्षा, व्यवस्था—प्रत्येक गोष्टीची काटेकोर आखणी केल्यामुळे महिलांचा अनुभव अधिक सुंदर झाला. “आमच्यासारख्या कष्टकरी बायकांसाठी एवढं सुंदर आयोजन कोणी करेल असं वाटलंच नव्हतं,” अशी मनापासूनची भावना अनेकांनी व्यक्त केली. गदादे परिवाराची आपुलकी, त्यांचा जिव्हाळा आणि महिलांसाठीचा आदर याने सर्वांना भारावून टाकले.
प्रभाग क्रमांक २८ मधील महिलांकडून या सहलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक महिला कामामुळे, घरच्या परिस्थितीमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे कधीच सहलीला जाऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला. “गदादे कुटुंबामुळे आमचं स्वप्न साकार झालं,” अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
Newsworldmarathi Pune: मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
नवले पूल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा अपघात व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
‘नवले पुलाजवळील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ची संख्या कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती गडकरी यांना दिली. त्यानंतरही नुकत्याच झालेल्या अपघातानंतर अधिक प्रभावी व तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच या अपघातानंतर पुण्यात महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, पोलिस व महामार्ग प्राधिकरणासोबत घेतलेल्या बैठकांमध्ये निश्चित झालेल्या उपाययोजनांबाबतचा अहवालही गडकरी यांच्याकडे सादर करत याबाबत केंद्रीय स्तरावर तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी केली,’ असे मोहोळ म्हणाले.
बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे
– अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर ठोस चर्चा
– एनएचएआयमार्फत रस्त्याची रचना.
– खेड-शिवापुर टोल नाक्यावर वाहनांचा लोड तपासणे
– टोल नाक्यावर आरटीओ मार्फत वाहनांची यांत्रिक तपासणी.
– वेगमर्यादेवर नियंत्रण आणणे.
– बॅरिकेडिंग व सिग्नल यंत्रणेत सुधारणा.
– धोकादायक ठिकाणांची पुनर्रचना.
– ठरावीक अंतरावर रम्बलर स्ट्रीप्सची संख्या वाढवणे
– सर्व यंत्रणांमधील समन्वय वाढविणे.
“नवले पूल येथील अपघात थांबावेत, यासाठी मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेत या संदर्भातील बैठकांचा अहवाल सादर केला. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.”
मुरलीधर मोहोळ,
केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ३९ मध्ये गेल्या काही वर्षांत नगरसेविका वर्षा साठे आणि भाजप नेते भीमराव साठे यांनी केलेल्या विकासकामांचा मोठा बोलबाला आहे. रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, अंगणवाडी सुविधा, नागरिक उपक्रम अशा विविध स्तरांवर साठे दाम्पत्याने घेतलेल्या पुढाकारामुळे स्थानिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. आता नव्याने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागातील कामांना अधिक गती मिळणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात दिसत आहेत.
नवीन कार्यालय हे फक्त जनसंपर्क केंद्र नसून, नागरिकांच्या समस्या वेगाने मार्गी लावण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा म्हणून पाहिले जात आहे. प्रभागात वाढलेल्या लोकसंख्येनुसार दैनंदिन नागरी अडचणी—पाणी, ड्रेनेज, वीज, आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन—यांसंदर्भात नागरिकांना एक निश्चित, उपलब्ध आणि उत्तरदायी केंद्र मिळणे ही मोठी गरज होती. या कार्यालयाच्या माध्यमातून तक्रारींचे नोंदणी, फॉलो-अप तसेच थेट संपर्क अशा सुविधा अधिक सुलभ होतील.
या सोबतच, निवडणुकीचा वातावरण हळूहळू तापू लागलेल्या काळात हे कार्यालय राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. साठे दाम्पत्याने विकासकामांवर लक्ष केंद्रित ठेवून जनमत मजबूत करण्याची रणनीती स्वीकारल्याचे दिसते. भाजपच्या स्थानिक संघटनांमध्येही या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांना एक मध्यवर्ती मंच मिळाल्याने आगामी निवडणूक व्यवस्थापन अधिक गतिमान होणार आहे.
प्रभाग ३९ मधील नागरी विकासाच्या संदर्भात साठे यांच्या कारभाराची तुलना इतर प्रभागांशी केली जात असून, विरोधकांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देत त्यांच्या अपेक्षांवर उतरू शकल्यास, साठे दाम्पत्याची राजकीय पकड आणखी मजबूत होईल, असा सर्वसामान्यांचा अंदाज आहे.
“नगरसेविका म्हणून काम करताना मी प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी काहीतरी सकारात्मक घडवू शकेन याचा प्रयत्न केला. युवक-युवतींसाठी रोजगाराच्या दारात वाढ व्हावी यासाठी अप्पर भागातील‘लाईट हाऊस’ प्रकल्पात अनेकांना संधी दिली. प्रभागातील रस्ते, लाईट्स, पाणी अशा अनेक कामांचा सातत्याने पाठपुरावा केला. पुढेही हीच काम करण्याची ऊर्जा आणि प्रामाणिकता कायम ठेवून प्रभागाचा विकास माझ्या कामाच्या केंद्रस्थानी असेल.”
वर्षा साठे,
माजी नगरसेविका
“सतरा वर्षे भाजपमध्ये कार्यरत राहून मी प्रभागासाठी अनेक विकास उपक्रम हाती घेतले. विशेषतः कोरोनाच्या काळात गरजू नागरिकांना मदत करण्यावर भर दिला. प्रभागात गोरगरीब आणि झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या मोठी आहे; त्यांना शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश राहिला. आगामी काळातही प्रभागाचा सर्वस्तरीय विकास आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे प्राधान्य राहील.”
Newsworldmarathi Pune: कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च अशा परमवीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आलेले कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते गणरायाची आरती देखील झाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांचे स्वागत व यशोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, मंगेश सूर्यवंशी, रोहित लोंढे, यांसह संजय भोसले, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते.
कॅप्टन योगेंद्र सिंह यादव म्हणाले, ‘दगडूशेठ’ हे असे गणपती बाप्पा आहेत, जे भक्ताच्या नावाने ओळखले जातात. देवतांमध्ये गणेशाचे स्थान सर्वोच्च असून करुणा, रिद्धी, सिद्धी, ज्ञानाचे ते प्रतीक आहेत. वेगळ्या प्रकारची शांती दगडूशेठ मंदिरात मिळते. गणपती बाप्पाने जे ज्ञान दिले आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल, असा माझा प्रयत्न आहे. पर्यावरणासह मानवतेला नवी चेतना देणारा दगडूशेठ गणपती ट्रस्ट आहे. भारतवासीयांवर गणेशाची कृपा सदैव राहो आणि सर्वत्र सुख शांती नांदो, अशी प्रार्थना त्यांनी गणेश चरणी केली.
Newsworldmarathi Pune: सानेगुरुजी प्राथमिक शाळा, सिंहगड रोड येथे बालदिन उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणाऱ्या या दिवसाची सुरूवात मुलांना विविध प्राण्यांचे मुखवटे देऊन झाली. कुणी हत्ती, कुणी सिंह, कुणी मांजर तर कुणी ससा बनून मुलांनी खेळाच्या मैदानात धाव घेतली. मिकी माऊस, पाळणा आणि विविध खेळण्यांमुळे शाळेचे वातावरण उत्साहाने भरून गेले.
यानंतर झालेल्या गोष्टीच्या तासात जादूगार संजय रघुवीर यांचे जादू प्रयोग पाहून मुले थक्क झाली. हे प्रयोग चमत्कार नसून हातचलाखी व वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्याचे त्यांनी मुलांना समजावून सांगितले. खेळ-धम्माल संपल्यावर विद्यार्थ्यांनी खाऊचा आस्वाद घेतला.
Oplus_16908288
बालदिनाच्या औपचारिक उद्घाटनासाठी मैदानात सर्व विद्यार्थी जमले. संस्थेचे सचिव मा. शिवाजी खांडेकर, संतोष पवार, तुषार मानकर, अतुल पासलकर, मनोज पोळेकर, नितीन मोरे, सूरज ननावरे आणि माजी विद्यार्थी प्रशांत सकट यांच्या उपस्थितीत फुगे आकाशात सोडण्यात आले. माजी विद्यार्थी म्हणून या पाहुण्यांनी शाळेबद्दलची जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली.
२००४–०५ च्या चौथीतील माजी विद्यार्थ्यांच्या गटाने सर्व मुलांसाठी रायटिंग पॅड व खाऊचे वितरण केले. या पॅडचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ (स्व. अजिंक्य नारायण खाटपे) देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापिका काटे मॅडम यांनी केले. नगरसेविका प्रियाताई गदादे यांनी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन बंदावणे सरांनी केले. नियोजनात ससे सर, खेडकर मॅडम आणि सांस्कृतिक प्रमुख गोवळकर मॅडम यांनी कार्यभार सांभाळला.
Newsworldmarathi Pune:निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की पुण्यातलं वातावरण तर आपोआपच तापतं. नगरपालिका–नगरपंचायतींच्या अर्जाची मुदत संपली, त्यात PMC च्या आरक्षण सोडतीनं तर पुणेकरांचं राजकारण आणखी पेटवलंय. कोण कुठून उभं राहणार, कोण कुणाला चॅलेंज देणार… प्रभागांत वाऱ्यापेक्षा वेगानं चर्चा सुरू आहेत.
अशात सगळ्याचं लक्ष वेधून घेतोय एकच नाव हेमंत बागुल यांनी. ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांची सध्या सोशल मीडियावर पोस्टर्सचं तुफान सुरू आहे. “हेमंत बागुल प्रभाग २७ नवी पेठ–पर्वती या प्रभागातून इच्छुक आहेत. हेमंत बागुल सध्या सोशल मिडियावर पोस्टरबाजी करताना दिसत आहेत. मात्र या पोस्टर वर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. हा प्रभाग म्हणजे भाजपचा जणू बालेकिल्ला. आता हेमंत बागुल यांचा अजून पक्ष निश्चित नाही त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
आबा बागुल यांनी सहा टर्म काँग्रेसच्या नगरसेवक म्हणून धुमाकूळ घातला होता. नंतर अपक्ष लढले, त्यानंतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत. पण अलीकडच्या नवरात्री महोत्सवाला चंद्रशेखर बावनकुळे आणि माधुरी मिसाळ हजर होते त्यामुळे हेमंत बागुल भाजप कडून लढणार का असेही चर्चा आहे.
“प्रभाग २७ मधल्या लोकांशी माझं नातं खूप जुने आहे. कोणत्या पक्षातून लढायचं, हे मित्र–कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवेन. पण निर्णय एकच — प्रभागाचा विकास!”
प्रभाग क्रमांक ४० मधील काकडे वस्ती ते ह.भ.प. पुंडलिक दादा टिळेकर चौक या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. २३ कोटी रुपयांच्या वा प्रकल्पामुळे कोंढवा परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
कार्यक्रमात बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी प्रभागातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. “देशात-राज्यात भाजपचे सरकार आणि महानगरपालिकेतही भाजपची सत्ता असल्यासच विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकते, असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्याउमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
मी त्यांनी केले.
टिळेकर यांनी पुढील काळात आणखी अनेक कामे प्राधान्याने
पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. आपल्या मनोगतामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “योगेश टिळेकर यांच्यासारख्या कार्यक्षम व्यक्तीला विधान परिषद सदस्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळेच राज्य शासनाचा मोठा निधी या भागाला मिळाला आहे.” त्या पुढे म्हणाल्या की कात्रज-कोंढवा रोड लवकरच पूर्ण होत असून बाधितांना रोख मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने हा रस्ता नागरिकांसाठी लवकरच खुला होईल.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, राणी भोसले, चीरसेन जगताप, वृषाली कामठे, राजाभाऊ कदम, सुनील कामठे, रायबा भोसले, चेतन टिळेकर, करण मिसाळ, अभिजीत शहा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Newaworldmarathi Pune: भवानी पेठेत क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाही आध्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आणि मातंग एकता आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने जयंतीपूर्व संध्येला दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. परिसरात दीपमाळा उजळून निघाल्याने वातावरणात भक्तीभाव आणि ऐतिहासिक परंपरेची अनुभूती निर्माण झाली.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनी लहुजी वस्तादांच्या कर्तृत्वाची आणि सामाजिक परिवर्तनातील भूमिकेची आठवण करून देत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे इंदिराताई बागवे, विठ्ठल थोरात (समन्वय – महाराष्ट्र राज्य), अरुण गायकवाड (सेक्रेटरी – महाराष्ट्र राज्य), यासेर बागवे (युवा नेते), राजश्री अडसूळ (अध्यक्षा, पुणे शहर),अनिल हातागळे (अध्यक्ष, लहुजी समता परिषद), रवीअप्पा पाटोळे (स्वीकृत सदस्य) यांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जेथे फाउंडेशनचे मा. कान्होजी जेधे, मा. नाना करपे (काँग्रेस), मा. जुबेर दिल्लीवाले, गोविंद जाधव, हुसेन शेख, सुनील साळवे, जयदीप शेलार, कुमार आडगळे, राहुल चिदम आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दीपोत्सवाला मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या माध्यमातून लहुजी वस्तादांच्या शौर्यपरंपरेला, सामाजिक समतेच्या मूल्यांना आणि क्रांतीशील विचारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीने व परिसरातील नागरिकांच्या सहभागाने जयंती उत्सव अधिक भव्य आणि यशस्वी ठरला.
Newsworldmarathi pune: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच पक्षांमध्ये संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेण्याची गरज अधिक अधोरेखित झाली असून, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता यासाठी कटिबद्ध आहे. साठे दाम्पत्यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सेवा अधिक वेगाने होतील असा वविश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
बिबवेवाडी अप्पर डेपो परिसरातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहराध्यक्ष भीमराव साठे आणि माजी नगरसेविका वर्षा साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी साठे दाम्पत्याच्या कामाचे दोन्ही मंत्र्यांनी कौतुक केले.
Oplus_16908288
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “भाजपचा कार्यकर्ता हा तळातून तयार झालेला असतो. वर्षा साठे आणि भीमराव साठे यांचे काम आम्ही जवळून पाहिले आहे. अनुभवी आणि जनतेशी सातत्याने जोडलेला कार्यकर्ता कसा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीमराव साठे.” त्यांच्या कार्यातून सेवा, संघटन आणि नेतृत्वगुण स्पष्टपणे दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “साठे दाम्पत्याने गेल्या दहा-बारा वर्षांत नगरसेवक नसतानादेखील अतिशय नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट काम केले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व सर्वसामान्यांसाठी घेतलेले परिश्रम लक्षणीय आहेत. पुढील दोन महिन्यांत त्यांच्या कार्याची फलश्रुती आणि या कार्यालयासमोर मोठी उत्सुकता पाहायला मिळेल, याबद्दल मला विश्वास आहे.” नवीन कार्यालयातून गोरगरिबांच्या तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक तत्पर राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजप राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य बाबाशेठ मिसाळ, आमदार सुनील कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, रंजना टिळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, रूपाली धाडवे, आनंद रिठे,, महेश वाबळे, बाळा ओसवाल, रघु गौडा, वीरसेन जगताप, राजेंद्र शिळीमकर, वृषाली कामठे, संगीता ठोसर, मनीषा कदम, गणेश मोहिते, अविनाश खेडेकर, स्वामीभक्त दिनकर उर्फ बाळा कसबे आदी उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस या भागात कडक थंडीचा इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात तापमान घसरत असून नागरिकांना बोचऱ्या गारठ्याचा अनुभव येत आहे.
शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान जळगाव येथे ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुण्यातील किमान तापमान ११.२ अंशांवर स्थिरावले. दिवसा थंडगार हवा आणि सायंकाळनंतर बोचरी थंडी या दुहेरी परिणामामुळे अनेक भागात शेकोट्यांचा आधार घेतला जात असून उबदार कपड्यांची खरेदीही वाढली आहे.
दरम्यान, कोकण पट्टा वगळता सर्वत्र थंडीचा कडाका कायम आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली असून अनेक भागात तापमान १० ते १२ अंशांच्या आसपास नोंदवले जात आहे. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतही थंडीची लाट कायम आहे. राजस्थानमधील सिकर येथे सर्वात कमी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
⸻
शनिवारी दणक्यात गारठलेले जिल्हे
• जळगाव : ८.७°
• अहिल्यानगर : ९.६५°
• बीड : १०.५°
• गोंदिया : १०.६°
• यवतमाळ : १०.८°
• पुणे : ११.२°
• मालेगाव : ११.२°
• वाशिम : ११.६°
• परभणी : ११.७°
• अमरावती : १२.७°
• सातारा : १२°
• महाबळेश्वर : १२°
• छ. संभाजीनगर : १२.६°