ड्रीम युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन स्वच्छता अभियान ग्रुपच्या देशी वृक्षाची लागवड

0
Newsworldmarathi Pune: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भव्य पाऊल उचलत शिंदवणे घाट परिसरात २२०० देशी वृक्षांची सामूहिक लागवड करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महाराष्ट्र राज्य वन विभाग, ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, द फॉरवर्ड फाउंडेशन आणि ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सौजन्य ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तर नियोजन द फॉरवर्ड फाउंडेशनने केले. या वृक्ष लागवडीच्या संवर्धनाची जबाबदारी ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन पार पाडणार आहे. या उपक्रमात प्रमोद रासकर (वन संरक्षक), ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सामाजिक दायित्व विभागाच्या प्रमुख सीमा सुमन, प्रा. के. डी. कांचन, ऋतुजा कांचन सरपंच (उरुळी कांचन), सुदर्शन चौधरी (पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), अलंकार कांचन, मयूर कांचन, संतोष आबासाहेब कांचन, सौ. शोभा महाडीक (सरपंच शिंदवणे), शिवाजी महाडीक, जगदीश महाडीक, विद्याताई यादव, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, तसेच शिंदवणे, उरुळीकांचन ग्रामपंचायतींचे कर्मचारी वृंद आणि सागर बाळासाहेब कांचन यांची यंत्र सामुग्री असा उत्साहात सहभाग नोंदविला. या हरित महायज्ञात ५०० हून अधिक पर्यावरणप्रेमींनी घाम गाळत सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक लोकसहभागातून उभारलेले हे हरित पाऊल भविष्यात शिंदवणे घाट परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी सुनील माने यांची फेरनिवड

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी सुनील माने यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ता म्हणून काम केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांच्या सूचनेनुसार तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता मा.आ.जितेंद्र आव्हाड यांनी सुनील माने यांची फेरनिवड केली आहे. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी ही निवड घोषित केली आहे.

पुण्यात आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे वृक्ष पुनर्रोपण अभियान

0
Newsworldmarathi Pune: विकासकामांच्या निमित्ताने झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असताना, आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने झाडांना दुसरे जीवन देण्यासाठी वृक्ष पुनर्रोपण अभियान हाती घेतले आहे. गेल्या ४० वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनने आतापर्यंत ५० हून अधिक संस्थांच्या माध्यमातून असंख्य नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या पुढाकाराने हा हरित उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिपक्व झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करून नवजीवन देण्याचे ध्येय या अभियानामागे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगरपालिका (PMC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज रस्ते व इतर विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्याने पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एक परिपक्व झाड चार व्यक्तींना पुरेसा प्राणवायू पुरवते, तसेच वर्षाला १० ते ४० किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास ८० टक्के झाडे यशस्वीपणे जिवंत राहतात, असा अनुभव फाऊंडेशनने नोंदवला आहे. आत्तापर्यंत पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात २१०० हून अधिक परिपक्व झाडांचे पुनर्रोपण करण्यात यश आले आहे. मात्र, आगामी १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सामाजिक संस्था, कंपन्या व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन फाऊंडेशनने केले आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना विविध मार्ग खुले आहेत. झाडांच्या पुनर्रोपणासाठी निधी दान करता येईल, एका झाडाचे दोन वर्षांसाठी दत्तक प्रायोजकत्व घेता येईल किंवा झाडांसाठी जागा उपलब्ध करून देता येईल. तसेच या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून हरित चळवळीला बळकटी देता येईल. “विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे नेता येईल,” असा संदेश देत आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने नागरिकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी : [www.rmdfoundation.org.in/tree-transplantation](http://www.rmdfoundation.org.in/tree-transplantation) 👉 वृक्ष पुनर्रोपण अभियानात सहभागी व्हा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा.

गुंतागुंतीच्या प्रभागरचनेने प्रशासनालाही डोकेदुखी; एका प्रभागात खासदार, चार आमदार; सीमारेषा अस्पष्ट

0
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेत मोठी गफलत झाल्याचे चित्र समोर आले आहे. एका प्रभागाच्या हद्दीत दोन ते चार विधानसभा मतदारसंघ आणि तितकीच क्षेत्रीय कार्यालये जोडली गेल्याने नागरिक व प्रशासकीय यंत्रणा गोंधळून गेली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ (पुणे स्टेशन-जयजवाननगर) मध्ये तर तब्बल चार विधानसभा मतदारसंघ आणि चार क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानासाठी सोयीस्कर व सुबोध रचना करण्याऐवजी, भौगोलिक सीमांचा विचार न करता प्रभाग आखणी केली गेल्याचे स्पष्ट होत आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अस्तित्वात असलेल्या जुन्या प्रभागांचे अक्षरशः तुकडे करून आजूबाजूच्या प्रभागांत मिसळण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या प्रभागाची हद्द व त्याचा मतदारसंघ कोणता हे ओळखणे अवघड झाले आहे. डोंगर, टेकड्या, नाले, नद्या व राष्ट्रीय महामार्ग या नैसर्गिक व भूगोलिक सीमांचा विचारही प्रभाग आखणी करताना पाळला गेला नाही. यामुळे एका प्रभागात विविध भागांचा कृत्रिम संगम झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ या स्टेशन-जयजवाननगर प्रभागात पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, कसबा व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर ढोले पाटील, येरवडा, विश्रामबागवाडा व घोले रोड अशी चार क्षेत्रीय कार्यालये या प्रभागात आली आहेत. प्रशासकीय पातळीवर या कार्यालयांचा ताळमेळ साधणे कठीण ठरणार आहे. त्यातच या प्रभागाच्या हद्दीत बंडगार्डन, कोरेगाव पार्क, फरासखाना, समर्थ पोलिस व येरवडा अशी पाच पोलिस ठाणी आहेत. एक खासदार व चार आमदारांचा समावेश असल्याने या प्रभागात राजकीय व प्रशासकीय गुंतागुंत अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे एका प्रभागाच्या सीमारेषेत अनेक विधानसभा, अनेक कार्यालये व पोलिस ठाणी एकत्र आल्याने नागरिकांची गफलत वाढली आहे. मतदारांना नेमके आपले मतदान केंद्र कोणत्या हद्दीत येते, हे समजणे कठीण होणार आहे. प्रभाग रचनेतील या विसंगतींमुळे प्रशासनालाही निवडणूक व्यवस्थापनात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे प्रभाग रचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. सुबक, सुटसुटीत व पारदर्शक प्रभाग रचनेच्या अपेक्षा असताना, गोंधळलेली व गुंतागुंतीची आखणी पुढील काळात निवडणूक प्रक्रियेत मोठे संकट ठरू शकते.

पर्युषण पर्वानिमित्त ‘भगवान महावीरांच्या पाच पाळण्या’च्या दर्शनाची संधी

0
Newsworldmarathi Pune: जैन समाजाचा प्रमुख धार्मिक उत्सव असलेल्या पर्युषण पर्वानिमित्त पुण्यातील भाविकांना भगवान महावीर यांच्या पाच पाळण्यांचे एकत्र दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सुजय गार्डन येथील जयंत शहा यांच्या निवासस्थानी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाळणे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील भगवान महावीरांचे पाळणे सजवून भाविक दर्शनासाठी घरी घेऊन जातात. यंदा श्री गोडजी मंदिर, कात्रज मंदिर, सुजय गार्डन मंदिर, लेक टाऊन मंदिर आणि पद्मावती नगर मंदिर येथील पाळणे एकत्र आणून दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. २०१५ साली सात पाळण्यांचे असेच एकत्र दर्शन घडले होते. यंदा पुन्हा अशाच पद्धतीने २५, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाच पाळण्यांचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली असून त्यात भजन, भावगीते, तसेच आचार्य आणि गुरु महाराजांचे प्रवचन यांचा समावेश आहे. दर्शनासाठी सर्व भाविकांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “भगवान महावीर जयंती आणि पाळणे याला जैन समाजात विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांना एकाच ठिकाणी अनेक मंदिरांतील पाळण्यांचे दर्शन घेता येईल. हा उपक्रम भाविकांसाठी आध्यात्मिक समाधान देणारा ठरेल.”

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह सीमावर्ती भागात करणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

0
Newsworldmarathi Pune: सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये गणेशोत्सवात सहभागी होण्यास येता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील ३३, ६, १९, १, १०१ इन्फन्ट्री आणि ७१ इन्फन्ट्री युनिटच्या सैनिकांना अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह येथे गणेशोत्सवात श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्यास देण्यात आल्या. सीमावर्ती भागात दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा या बटालियनच्या सैनिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. सलग १५ वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत. सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सिमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील सैनिकांनी व्यक्त केली आहे.

लाखो रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

0
Newsworldmarathi pune: डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतिबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत. आता उपचारांमध्येही ‘ए आय’ चा वापर होत आहे. डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले आहे, त्यांच्याकडून सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. माणिकबाग, सिंहगड रस्ता परिसरात आरोग्यसेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, अनिल गोसावी, पीडिसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट, प्रसन्न जगताप, प्रशांत जगताप, अशोक हरणावळ तसेच वैदयकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरची प्रतिकूल परिस्थती असताना डॉ. दुधभाते जिद्दीने शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्याबाबत अजित पवार यांनी कौतुक व्यक्त करत पुढे ते म्हणाले, ” डॉ. दुधभाते गरिबीतून आल्याने ते गोर गरीब लोकांना सवलतीच्या दरांत सेवा देत आहेत. येथील प्रत्येक नेत्र वैद्यकीय साधनांच्या किमती एक ते पाच कोटींच्या दरम्यान व त्या अमेरिकन बनावटीच्या आहेत. डॉ. दुधभाते नेत्रालाय हे सर्वांना हक्काचे नेत्रालाय झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोफत नेत्रतापसणी करून काम करून सामाजिक भानही जपत डॉक्टरच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे. येथे लाखो लोकांचे नेत्रविकार दूर करण्याचे काम हे नेत्रालय करेल, अशा शुभेच्छा दिल्या. चेन हॉस्पिटल सुरू करणार : डॉ. दुधभाते डॉ. दुधभाते म्हणाले, “सन 2011 मध्ये सिंहगड रास्ता परिसरात नेत्रालाय सुरू केले होते. त्यानंतर आता 14 वर्षात स्वतःच्या या भव्य नेत्रालयाच्या वास्तूचे उदघाटन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू शकलो. आम्ही येथे अत्याधुनिक सेवा देणार आहोत. खासकरून कांटूरा लॅसिक तंत्रज्ञान येथे आहे. गेली 4 वर्षे आम्ही 500 मोफत नेत्र तापसणीद्वारे 5 लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली. येथेही गरिबाला परवडेल अशा सेवा देणार आहे. कमीत कमी 5 हजार रुपयांमध्ये येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असून येत्या काळात दुधभाते नेत्रालयाच्या चेन हॉस्पिटल सुरू करण्याची मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांचे आईवडील धोंडीबा व पार्वती दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अनिल दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर विषयी : प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी तीन मजली अद्ययावत उपचार असलेल्या रुग्णालयाची उभारणी केली आहे. डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान, तपासणी व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे हे केंद्र खास ठरणार आहे. पुणेकरांसह ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे उच्च दर्जाची नेत्रसेवा मिळणार आहे. सिंहगड रोड परिसरातील आरोग्यसेवेत भर घालणारे हे रुग्णालय पुणेकरांसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.

विठ्ठल नागनाथ काळे ठरला दोन राज्यांचा ‘उत्कृष्ट’ अभिनेता

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्याचा ५८ वा चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्यात अभिनेता विठ्ठल नागनाथ काळे याला ‘बापल्योक’ या मराठी भाषेतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे महाराष्ट्र शासनाचे एकूण तीन पुरस्कार मिळाले. तर पणजी येथे झालेल्या १० व्या गोवा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विठ्ठल नागनाथ काळे याला ‘काजरो’ (द बिटर ट्री) या कोंकणी भाषेत असलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवणारा विठ्ठल काळे हा पहिलाच अभिनेता ठरला आहे. कोंकणी भाषा येत नसतानाही त्या भाषेचा अभ्यास करून त्याने ही भूमिका साकारली आहे. काजरो या कोंकणी चित्रपटाला ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठलने बापल्योक, पुनःश्च हरिओम, लाईक आणि सब्स्क्राईब, घर बंदूक बिर्याणी, राक्षस, हॉटेल मुंबई या चित्रपटांमध्ये, तसेच मानवत मर्डर्स या वेबसीरीजमध्ये लक्षवेधी अभिनय केला आहे. विठ्ठलने दोन्ही राज्य, निवड समिती, परीक्षक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्माते यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. पुरस्कारांमुळे माझ्यावर जबाबदारी आणखीन वाढली आहे, अशाच उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

पुणे हे जागतिक बाजारपेठेचे केंद्र व्हावे : अरुण फिरोदिया यांचे मत

0
Newsworldmarathi Pune: “भारतात ज्ञानाची मोठी शक्ती आहे. अनेक परदेशी लोक इथे येऊन ज्ञान ग्रहण करतात व जगाला सेवा पुरवतात. भारतीयांनी आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखून घेत प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे. जगाकडून शिकण्यासह जगाला शिकवण्याची जिद्द आपल्याकडे हवी. भारतीय ग्राहकांचे समाधान करणारे उत्पादन जगात यशस्वी ठरते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी केले. पुणे सर्वार्थाने समृद्ध असून, पुण्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय सल्लागार व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्सच्या (आयएमए) संचालक मंडळाचे ग्लोबल चेअर सीएमए सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, आयटी तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी, देशमुख यांच्या पत्नी माधुरी देशमुख आदी उपस्थित होते. अरुण फिरोदिया म्हणाले, “लोकांकडून, ग्राहकांकडून शिकत गेल्याने माझ्या मनात अनेक नवनव्या कल्पना विकसित होत गेल्या. आपण जे काही करू त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास आपल्याकडे हवा. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बाहेर पडा व शिकत राहा. विविध ठिकाणचे लोक, बाजारपेठ समजून घ्या. त्यासाठी देशाटन करत राहा. भारतात शिकून जगभरासाठी काम करा. जिद्द आणि उमेदीने संघर्षाशी दोन हात करून सुनील देशमुख यांनी आयुष्याला प्रेरणादायी यशोगाथा बनवली आहे. त्यांचा हा यशस्वी जीवनप्रवास तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे अशा यशोगाथा व्यवस्थापनासह इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हव्यात. बिकट वाटेला न घाबरता धैर्याने यशशिखरे संपादन करत राहावीत.” डॉ. पराग काळकर म्हणाले, “यशस्वी माणसेच इतरांना प्रेरणा मार्ग दाखवतात. नांदेडच्या छोट्याशा गावातून सुरु झालेला सुनील देशमुख यांचा प्रवास जागतिक स्तरावर गेला. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामागे आपले परिश्रम, जिद्द असते. त्यांची ही यशोगाथा तरुणांसाठी ऊर्जादायी आहे. यशाच्या शिखरावर पोहचूनही आपल्या मातीशी, गावाशी आणि माणसांशी नाळ जोडून ठेवणारा हा माणूस आहे. तरुणांनी देशमुखांचा हा आदर्श घेऊन जीवनात यशाकडे वाटचाल करावी. छोट्या अपयशाने खचून न जाता झालेल्या चुकांचे अवलोकन करून पुन्हा नव्या ऊर्जेने प्रयत्न करावेत.” डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “आयुष्य हे खूप सहज असते. आपण त्याला किचकट करतो. शिका, कमवा आणि परत करा या तीन मूल्यांवर आपले आयुष्य आधारलेले असते. दादा वासवानी यांनी दिलेल्या तत्वांवर वाटचाल केली, तर सदृढ समाजाची जडणघडण होईल. लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवा पिढी वाचण्यासाठी पुस्तकांबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करते. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने विविध भाषांमध्ये हे पुस्तक जावे.” सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रशांत शुक्ला, मानसी शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रचिती अंकाईकर यांनी आभार मानले.

पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

0
Newsworldmarathi Pune: काश्मीर खोऱ्यात तब्बल ३४ वर्षांनंतर पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवास गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सध्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून पुढील वर्षापासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात व्यक्त केला. काश्मीरमधील लाल चौकात २०२३ पासून दीड आणि पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गतवर्षी तीन ठिकाणी हा उत्सव साजरा झाला. यावर्षी पुन्हा तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. केसरीवाडा गणपतीची मूर्ती लाल चौक गणपती मंडळांकडे तर अखिल मंडईच्या शारदा गजाननाची मूर्ती श्रीनगरमधील इंदिरानगर मंडळाकडे आणि साऊथ काश्मीरमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मूर्ती सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळांचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्यासह अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात, केसरी गणपतीचे अनिल सपकाळ, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळांचे विनायक कदम, जोगेश्वरी मंडळांचे प्रसाद कुलकर्णी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह काश्मीरमधील मोहित भान, संदीप रैना, सनी रैना, अमित कुमार भट, संदीप कौल, शिशान चकू, उदय भट हे गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीनगरमधील लाल चौकातील गणपती यार मंडळाचे मोहित भान म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वी पुनीत बालन यांच्यासमवेत काश्मीरमध्ये पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि पहिल्याच वर्षी दीड आणि पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. गेल्या वर्षी तीन ठिकाणी आम्ही उत्सव साजरा केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही हा उत्सव साजरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी पुढील वर्षी पाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे आमचे नियोजन आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने काश्मीरी पंडित पुन्हा पूर्वीसारखे सुखा समाधानाने तिथे रहावेत अशीच आमची प्रार्थना आहे.’’
‘‘पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव १७५ देशात साजरा होतो, पण आपल्या काश्मीरमध्ये १९८९ नंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नव्हता. ही कसर गेल्या दोन वर्षांपासून भरून काढण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना पुण्यातील मंडळांनी आणि काश्मिरमधील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळंच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आता भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मिरमध्येही होणार याचं समाधान वाटतं. त्यासाठी सहकार्य करणारे पुण्यातील मंडळं आणि काश्मिरमधील कार्यकर्ते या सर्वांचे मनःपूर्वक आभार!’’
– पुनीत बालन उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती