मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी विकास रसाळ
Newsworldmarathi Pune: राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकाची आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ मुदत संपल्याने (ऑगस्टअखेर) शासनाने बरखास्त केलेले आहे. तर प्रशासकपदी राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी सोमवारी (दि.१) मुंबई बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
रसाळ यांनी पदभार स्वीकारताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे, सहसचिव महेंद्र म्हस्के, उपसचिव डॉ. एम. वही. साळुंखे आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या बहुचर्चित राष्ट्रीय कृषी बाजार करण्याच्या धोरणाचा राज्यात अंमल करण्यासाठी ही सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. राज्यांमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील उलाढाल सर्वाधिक आहे, अशा पाच बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजारात समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आग्रही आहेत. त्यामध्ये मुंबई बाजार समितीचा अग्रक्रम लागतो. या बाजार समितीची राष्ट्रीय बाजारात समावेश करून अन्य बाजार समित्यांनाही त्यामध्ये घेतले जाण्याची चर्चा आता वाढली असून गणेशोत्सवानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले
तांत्रिक अडचणीमुळे दिल्लीला जाणारे विमान पुन्हा पुण्यात उतरले
Newsworldmarathi Pune: पुणे विमानतळाहून सकाळी दिल्लीकडे जाणारे स्पाइसजेटचे विमान तांत्रिक बिघाडामुळे परत पुण्यात उतरवण्यात आले.
विमान उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच पायलटला तांत्रिक अडचण जाणवली. त्यानंतर पायलटने एटीसीकडे पुण्यात परतण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच विमान सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरवण्यात आले.
प्रवाशांनी या घटनेला ‘इमर्जन्सी लँडिंग’ असे म्हटले असले तरी विमानतळ प्रशासनाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मेडे कॉल आलेला नव्हता, त्यामुळे ही नियमित लँडिंग मानली जाते,” असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले
‘पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन
Newsworldmarathi Mumbai: पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज (रविवार) पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं.
पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे नोव्हेंबरमध्ये आयोजन; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Newsworldmarthi Pune: “विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ अशी साद घालत ‘खासदार क्रीडा महोत्सव’ उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. मोदीजींची ‘फिट इंडिया’ची संकल्पना साकार होण्यासाठी पुण्यात पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे दीपोत्सवानंतर पुणेकरांना खेलोत्सव अनुभवता येणार आहे,” अशी महिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने डेक्कन जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रमुख समन्वयक व छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, ऑलिंपिक खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेता रेखा भिडे, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते विलास कथुरे, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, कुस्तीगीर संघाचे संदीप भोंडवे, हिंदकेसरी योगेश दोडके आदी उपस्थित होते. संयोजन समितीमध्ये नेमबाज व खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू सुरेखा द्रविड, बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे यांच्यासह पुण्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी ‘फिट इंडिया’ अंतर्गत खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग अशा सर्वांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. भारतीय खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांच्या स्पर्धा होतील. ३३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी बुद्धीबळ व कॅरम, दिव्यांगांसाठी बास्केटबॉल व पोहण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.”
मनोज एरंडे म्हणाले, “खासदार क्रीडा महोत्सवात ३३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यात सुमारे वीस तें पंचवीस हजार खेळाडू सहभागी होतील. संयोजन समितीचे प्रमुख मुरलीधर मोहोळ स्वतः खेळाडू, पैलवान असल्याने त्यांना खेळाडूंबद्दल आपुलकी आहे. ही स्पर्धा चांगली होण्यासाठी त्यांचे सूक्ष्म नियोजन महत्वपूर्ण ठरेल. या स्पर्धेत खेळ, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना सर्वोच्च प्राधान्य असेल.”
मनोज पिंगळे म्हणाले, “देशात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता कधीच नव्हती. मात्र त्यांना सरकारकडून आवश्यक तसे साहाय्य मिळत नव्हते. मोदीजींनी खेळांना महत्व दिले, खेळाडूंना लागणाऱ्या सुविधा दिल्या. त्याचे परिणाम आपल्याला पदकांच्या रूपाने बघायला मिळत आहेत. गेल्या अकरा वर्षात सर्वच खेळांना लोकप्रियता मिळू लागली आहे. देशात क्रीडा संस्कृती प्रभावीपणे रुजत आहे.”
विलास कथुरे म्हणाले की, देशात क्रीडा क्षेत्राचाही झपाट्याने विकास होत आहे. ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा तयार होत असल्याने खेळाडूंना त्यांची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळू लागले आहे. खेळाची संस्कृती महानगरातून गावपातळ्यांवर रुजताना दिसत आहे. त्याचे चांगले परिणाम म्हणजे दुर्गम भागातील खेळाडूही पदकांची कमाई करताना दिसत आहेत.”
प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणारा महोत्सव
“नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील क्रीडा विकासाचा रोडमॅप मांडला. खेलो इंडियासारख्या स्पर्धा सुरू केल्या. खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. तालुका पातळीवरही या सुविधा विकसित होण्यासाठी अर्थसहाय्य द्यायला सुरूवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. खासदार क्रीडा महोत्सव हा देशातील प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेणारा महोत्सव आहे. त्यातूनच देशाला ऑलिंपिक स्पर्धेसारख्या सर्वोच्च जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचे देशवासीयांनी पाहिले.”
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.
दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूचे नगारा वादन झाले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ही मिरवणूक आल्यानंतर बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा पथकांनी केलेले वादन लक्षवेधक होते. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवी अशी वेगवेगळी ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. तसेच कलावंत पथकात वादन करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव यांच्यासह अन्य कलाकार हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ‘श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा’ पथकाने मर्दानी खेळाचे केलेले प्रात्यक्षिक प्रत्येक चौकात भाविक-भक्तांचे आकर्षण ठरले. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा या खेळांचे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. ही लक्षवेधक मिरवणुक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा मिरवणूक रथ उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हाताने ओढण्याची सेवा केली. डोक्यावर भगवा पांढरा कुर्ता परिधान केलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक शिवाजी रस्त्यामार्गे बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोड मार्गे पुन्हा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा ‘रत्नमहाल’ येथे दाखल झाली. त्यानंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. प्रमुख विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते ‘श्री’ची आरती करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
‘‘सर्व गणेशभक्त आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतो तो आजचा सर्वांत आनंदाचा दिवस होता. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचं आज आगमन झालं. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या शुभहस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पुढील दहा दिवसांच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह वेगवेगळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी अधिकाधिक भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनंती.’’– पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला मी सलग दुसऱ्या वर्षी येत आहे. याठिकाणी भक्ती आणि देशभक्ती या दोन्हींचा संगम आहे. यावर्षी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. मला निमंत्रित केल्याबद्दल मी पुनीत बालन यांची आभारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना आपला धर्म, आपली संस्कृती, देशभक्ती जिवंत ठेवायची आहे हे लक्षात असू द्या. हे उत्सव त्याचे प्रतीक आहे. आपल्या सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.’’– जया किशोरी, प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या.
‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन
Newsworldmarathi Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाईने ती उजळून निघाली आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात आले आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात आली आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे.
प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात आला आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल.
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘‘श्रीगणेशा’’
Newsworldmarathi Pimpri: उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वत्र गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकीत संस्था सुरू करण्याचा ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील देत ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा हा ‘‘ड्रीम प्रोजेक्ट’’ आता दृष्टीक्षेपात आला आहे.
शहरातील मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय गायरान जमिनीवर आयआयएमची शाखा उभारली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात आणखी भर पडणार असून, औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. याआधी त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा सुरू करण्यासाठी आमदार लांडगे पुढाकार घेतला होता आणि त्याला यश मिळाले. आता आयआयएम-नागपूरची शाखा सुरू करण्याचे स्वप्न साकार होत आहे.
औद्योगिक नगरीत आयआयएमची शाखा सुरू झाल्यास रोजगार, संशोधन आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. देशभरातील विद्यार्थी पिंपरी-चिंचवडमध्ये येतील, उद्योगजगताशी थेट संपर्क साधला जाईल आणि शहराची शैक्षणिक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
“पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबई-पुणे कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आयआयएमसारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. आता महसूल मंत्री यांनी जागेला मान्यता दिली आहे. IIM चे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांनी पुढाकार घेतला आहे. आता ‘आयआयएम’ च्या कामाला आता गती मिळेल.– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
लहानग्यांनी साकारली सर्वांगसुंदर ‘बाप्पा’ची मूर्ती; हर्षाली माथवड यांचा पुढाकार
Newsworldmarathi Pune: स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार, रंग देत लहानग्यांनी शाडू मातीच्या सर्वांगसुंदर अशा गणेशमूर्ती साकारल्या. सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजिली होती.
कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने कोथरूडमधील डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत लहानग्यांसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडविण्याची कला शिकवली. गणेश मूर्ती बनविण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश, तसेच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण, स्वतःच्या हातांनी मूर्ती घडविण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या तिन्हींचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.
“गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करणे ही आजची गरज आहे. कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्कारांची शिकवण मिळाली. नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे समाधान आहे. पुढेही अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन,” अशी भावना हर्षाली माथवड यांनी व्यक्त केली.
अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.
मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर ७ पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता मंडळाचे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहर्तावर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.’’ प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना देण्यात आला आहे. गणपती बाप्पाचे सेवेकरी म्हणून आमच्या सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे.– पुनीत बालन उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
Newsworldmarathi Pune: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे. या वर्षीही दि. २८ ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळीत हे आरोग्य शिबीर होणार आहे.
या शिबिरात सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन अशा महत्वाच्या तपासण्या होणार आहेत. या तपासण्याचे अहवालही मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरासाठी गणेशभक्त थेट आरोग्य शिबीरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात तसेच अधिदेखील ऑनलाईन पद्धतीने नाव रजिस्टर करून आपले नाव नोंदवू शकतात, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक – https://bit.ly/Aarogyashibir
भक्तांना चांगलं आरोग्य लाभावं, हा आपल्या अध्यात्माचा पाया आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगलं आरोग्य लाभावं या हेतूने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अधिकाधिक गणेश भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, ही विनंती!पुनीत बालन उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

