शंकर महादेवन यांनी गायलेले “बाप्पा मोरया” गाणं उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते प्रकाशित

0
Newsworldmarathi Pune: पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं “बाप्पा मोरया” हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच युवा उद्योजक श्री. पुनीतदादा बालन यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आलं. या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल. या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभं राहिलं आहे. “बाप्पा मोरया” या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, गीताचे बोल आणि संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे. गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पुनीत बालन यांनी “बाप्पा मोरया” या गीताला शुभेच्छा दिल्या.

महिलांना आर्थिक स्वातंत्र्य हवे : ॲड वर्षा देशपांडे

0
Newsworldmarathi Pune: समाजामध्ये स्त्री, पुरुष समानता निर्माण करण्यासाठी महिलांना पुरुषांप्रमाणेच आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे. केवळ महिला आणि पुरुष समान असल्याचे न सांगता प्रत्यक्ष त्याबाबत जागरूकता झाली पाहिजे असे मत लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास संस्थेच्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आजही गर्भलिंग निदान केले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ॲड. वर्षा देशपांडे यांना नुकताच संयुक्त राष्ट्र संघातर्फे ‘युएन पॉप्युलेशन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या निमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ॲड. देशपांडे यांचा वार्तालाप गुरवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. शेतीसह विविध क्षेत्रात महिला काम करतात. मात्र, महिलांच्या नावावर शेती नसते. तसेच त्यांना आर्थिक अधिकार आणि मालमत्तेत त्यांचे नाव नसते. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेची केवळ घोषणा करून होणार नाही तर महिलांना आर्थिक अधिकार देणे महत्वपूर्ण आहे तरच ज्या सक्षम होतील. आर्थिक अधिकार नसल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्भलिंग निदान होऊ नये म्हणून देशात विविध कायदे आहेत. मात्र, देशात गर्भलिंग निदान केले जात आहे. जन्मापूर्वी मुलींची हत्या केली जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. देशात दरवर्षी सहा लाख तर महाराष्ट्रात ५३ हजार महिलांची जन्मास येण्यापूर्वी हत्या होते ही बाब चिंताजनक आहे. देशात याबाबत कडक कायदे असतानाही त्याचे पालन का होत नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वात पहिले गर्भलिंगनिदान विरोधी कायदा महाराष्ट्र करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे. यामुळे तरुणांचे लग्न होत नसल्याचे ही वास्तव समोर येत असल्याकडे ॲड. देशपांडे यांनी लक्ष वेधले. तनिष्का डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मानाच्या पाचव्या गणपतींनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार; अखिल मंडई मंडळ व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय

0
Newsworldmarathi Pune: वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय या दोन्ही मंडळांनी घेतला आहे. याविषयी माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जन. यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे. मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस सा.७ वा श्री ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो पण गेली काही वर्षे पोलिस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्या मुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी संपवावी. पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होत आहे. किमान त्याआधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासना यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

हुजूरपागा प्रशालेत स्वराज्यसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दिमाखात संपन्न

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या एच.एच.सी.पी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, हुजूरपागा येथे सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी व मावळत्या मंत्रिमंडळाचा निरोप समारंभ उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार रोहित पवार तर अध्यक्षस्थानी म.ग.ए. संस्थेच्या सचिव रेखाताई पळशीकर होत्या. प्रशालेत १९६५ पासून सुरू असलेल्या *स्वराज्यसभा* या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी गुप्त मतदान पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड केली जाते. यावर्षीची निवडणूक ४ जुलै रोजी पार पडली होती. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींचे शालेय मंत्रिमंडळ गठीत करून खातेवाटप करण्यात आले. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाला प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती केतकी पेंढारकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी शाळेतील या लोकशाही उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना संविधान, मतदानाचा अधिकार, समानता आणि महिलांच्या राजकीय सहभागाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभव, मेहनत, पालक व शिक्षकांचा आदर यांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला संस्थेच्या सहसचिव अरुणा भांबरे, सभासद मा. डॉ. सुनिल जगताप, लक्ष्मीकांत मुंदडा, अलका काळे, मार्था गायकवाड, प्रमुख विश्वस्त उषा वाघ यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका पेंढारकर यांनी केले. अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड यांनी तर पाहुण्यांची ओळख रविंद्र तनपुरे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी वीर यांनी केले. स्वराज्यसभा प्रमुख श्रीमती जयश्री सोळंके, पर्यवेक्षक साधना घोडके, राजेंद्र मानेकर, संगीता वाघमारे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

हुजूरपागा प्रशालेत विज्ञान मंडळाची स्थापना

0
Newsworldmarathi Pune: दरवर्षी प्रमाणे यंदाही एच.एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे येथे मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी विज्ञानमंडळ उद्‌घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे *मा. डॉ.अरविंद नातू,वरिष्ठ संशोधक* (आयसर संस्था) यांचा सत्कार म.ग.ए. संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. डॉ.सुषमा केसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विज्ञानमंडळातील सहभागी विद्यार्थिनी व इयत्ता ९वीच्या विदयार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थीनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उत्तम रित्या केले. रासायनिक अभिक्रियेवर आधारित प्रयोगाद्वारे विज्ञान सेल्फी बनवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. ही सायन्स सेल्फी फ्रेम केवळ चेहऱ्याचीच नाही तर आपल्या ज्ञानाची, सर्जनशीलतेची आणि आत्मविश्वासाची फ्रेम आहे. या चौकटीत उभे राहताना आपण विज्ञानाशी जोडले जातो या नवकल्पनेतून विज्ञान मंडळाचे उद्‌घाटन करण्यात आले. निसर्गातील घडामोडींमध्ये विज्ञानाचे गूढ लपलेले आहे. डोळे उघडा निसर्ग कडे बघा प्रश्न विचारा आणि संशोधक व्हा असे मोलाचे मार्गदर्शन नातू सरांनी विद्यार्थिनींना केले. यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोषध्यक्षा मा. डॉ. सुषमा केसकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, केतकी पेंढारकर, उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड, पर्यवेक्षक साधना घोडके, श्रीयुत राजेंद्र मानेकर, संगीता वाघमारे उपस्थित होते. विज्ञान पर्यवेक्षिका श्रीमती जमदाडे प्रतिभा आणि सर्व विज्ञान शिक्षक, वि‌द्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे : अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

0
Newsworldmarathi Pune: संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’ वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’
– पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त.

आज पुण्यात पूरस्थितीची शक्यता; शहराला सावधानतेचा इशारा

0
Newsworldmarathi Pune: शहराला पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला आणि वरसगाव धरणातून रविवारी रात्री ७ नंतर एकूण २८,९०० क्यूसॅक वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहू लागली असून, पाणी रस्त्यांवर आले आहे. भिडेपूल रविवारी दुपारीच पाण्याखाली गेला आहे. शहरासह चारही धरण क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे ९१ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने रविवारी रात्री मोठा विसर्ग सुरू केला. खडकवासलातून १८,३०० क्यूसॅक आणि वरसगावहून ९,५०० क्यूसॅक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी रात्री १२ पासून पुन्हा संततधार सुरु झाली असून, पावसाने सोमवार सकाळीपर्यंत उघडpeek घेतलेले नाही. सूर्यदर्शन नाही, गारठा वाढला: रविवारी दिवसभर पावसाच्या रिपाटपातमुळे शहरात गारठा वाढला आहे. संपूर्ण शहरात थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. भिडेपूल यंदा उशिरा पाण्याखाली: दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाण्याखाली जाणारा भिडेपूल यंदा जुलैच्या अखेरीस पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रावर पोलीस बंदोबस्त गरजेचा: रविवारी नदीपात्रातून पाणी रस्त्यावर आले असतानाही अनेक नागरिकांनी वाहने चालवली. आज परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची गरज आहे. नागरिकांनी नदीकिनाऱ्यांवर गर्दी करू नये, असा इशाराही जलसंपदा विभागाने दिला आहे.

अजित पवारांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी गडकिल्ले सेलतर्फे आरोग्य शिबिर

0
Newsworldmarathi Pune: रक्तदाब, रक्तशर्करा, कोलेस्ट्रॉल, किडनी आणि थायरॉईड मोफत तपासणी शिबिराचा लाभ दत्तनगर, टेल्को कॉलनी चौक, जांभूळवाडी रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी घेतला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या संकल्पनेतून कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर, जना स्मॉल फायनान्स बॅंक व देशसेवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जना स्मॉल फायनान्स चे विभागीय प्रमुख कमल गांधी, आकाश मंत्री , पंकज पवार, नरेंद्र पारखे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे समीर धुमाळ, मनोजकुमार भोसले, शंकर चिकने, वल्लभ कोकाटे, मनीष कोंडे,कुणाल शेलार, विनायक धोत्रे हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोनशे नागरिक ,ज्येष्ठ नागरिक व महिलांनी रक्तदाब, रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल, किडनी फंक्शन आणि थायरॉईड तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल: रामहरी रुपनवर

0
Newsworldmarathi Pune: अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली च्या वतीने सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे अहिल्यादेवी होळकर यांच्यात्रि शताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान ९० महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुढे म्हणाले की, लोककल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही युद्ध टाळून शांतता कायम ठेवली राज्यसमृद्ध झाले पाहिजे अशी ही कर्तृत्ववान महिला यांनी महिला सक्षमीकरण धार्मिक विचार रोजगार निर्मिती सतत लोकहितेचा विचार करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय महिलांना साक्षर करण्यासाठी अथक प्रयत्न जगातील सर्वात मोठी महिलांची फौज उभी करणारी स्त्री म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय प्राणी पक्षी यांची काळजी .अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली नेतृत्व गुण व ज्ञानलालसा मुत्सद्दीपणा व झुंज घेण्याचा खंबीरपणा अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे होता. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने कराड येथे १४६ महिलांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार ने सन्मानित केले व पुणे येथे ९० महिलांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महिलांचा गौरव करणारी एकमेव अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांचे कार्यकर्तुकास्पद आहे, असे रामहरी रुपनवर यांनी केले. कार्यक्रमात डॉ. नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त, पुणे), डॉ. प्रा. महेश थोरवे (संचालक, एमआयटी), बाळासाहेब कर्णवर पाटील (चेअरमन, श्री सद्गुरु साखर कारखाना) यांचीही भाषणे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण काकडे, सुनील शेंडगे, बी.डी. मोटे, अशोकराव पवार, शेषराव शेंडगे, मुकुंद कुचेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले व आभार प्रा महावीर काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा शितल काकडे, नथुराम डोईफोडे, राजगड बाबुराव शेडगे,सुनील शेंडगे, दिनेश शिंदे, वसंतराव हिरवे, अशोकराव शिंदे, हरिभाऊ लबडे, इंद्रजित ताटे, अजित ताटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी एम. डी. दडस, संजय नायकवडी, संजय कवितके, नवनाथ देवकाते, शंकर दातीर, संतोष पांढरे, अरुणा दडस, भाऊसाहेब आखाडे, नानासाहेब मरगळे तुकाराम कोकरे नवल राजकाळे सोमनाथ ओव्हाळ संदीप शेंडगे प्रशांत शेंडगे इत्यादी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय

0
Newsworldmarathi Pune: ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका व ग्रंथालय उपलब्ध होणार आहे. शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात ‘पुनीत बालन ग्रुप’चे कार्य हे उल्लेखनीय असे आहे. त्यांच्या या कामाचे क्षेत्र केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही तर या कामाचा विस्तार काश्मिरपर्यंत झालेला बघायला मिळतो. पुणे हे तर राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका व ग्रंथालयाचे भरमसाठ शुल्क भरणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांनाही चांगले शिकून मोठे होण्याचे स्वप्न साकार करता यावे या दृष्टीने ‘पुनीत बालन ग्रुप’ने पुढाकार घेतला आणि पुण्यात अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरात ७ हजार ५०० चौ. फुट इतकी प्रशस्त अशी दुमजली अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून या बांधकामाचे भूमिपूजन श्री. पुनीत दादा बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट शिरीष केंभावी, श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव बहिरट-पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त संजय सातपुते आणि वृद्धेश्वर चौपाटीचे लाला गायकवाड उपस्थित होते.
विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी बौद्धिक परिस्थिती मात्र गरीब नसते. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिका व ग्रंथालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या वाटेवर अभ्यासिका व ग्रंथालयाच्या माध्यमातून एक दिवा लावण्याची संधी आम्हाला मिळाली. यातूनच देशाची आणि समाजाची अधिक चांगली सेवा करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास आहे.
पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)