लंडनमध्ये वंजारी समाजाचा पाचवा मेळावा उत्साहात संपन्न; विठ्ठल मंदिरासाठी MIT कडून ५० लाखांचे दान
Newsworldmarathi Team: यूकेमध्ये वास्तव्यास असलेल्या वंजारी समाजाचा पाचवा सामूहिक मेळावा लंडनमध्ये उत्साहात पार पडला. समाजातील एकतेचा, सांस्कृतिक जिव्हाळ्याचा आणि बंधुत्वाचा भक्कम परिचय देणारा हा सोहळा अनेक दृष्टीने लक्षवेधी ठरला.
या मेळाव्याला MIT चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि यूकेमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणारे माऊली श्री अनिल खेडकर विशेष उपस्थित होते.
मेळाव्याचे आयोजन खेडकर कुटुंबीय, श्री रुस्तम खेडकर आणि वंजारी समाजातील सर्व सदस्यांच्या पुढाकारातून पार पडले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, सजावट, सेवा आणि व्यवस्थापन संघटीत स्वयंसेवक टीमने अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
श्री नाना नागरगोजे, श्री वैभव आव्हाड आणि श्री प्रवीण सानप यांच्या अथक मेहनतीमुळे व प्रेमळ पाहुणचारामुळे संपूर्ण मेळावा अविस्मरणीय ठरला. या निमित्ताने युनायटेड किंगडममधील मराठी व वंजारी बांधवांमध्ये स्नेह, आपुलकी आणि एकतेचे दृढ बंध निर्माण झाले.
या कार्यक्रमात डॉ. राहुल कराड यांनी ‘MIT’ च्या वतीने विठ्ठल मंदिराच्या उभारणीसाठी ५० लाख रुपयांची रक्कम भक्तिभावाने दान दिली.“पंढरपूरच्या विठ्ठलाचे तेज आता संपूर्ण जगभर पसरत आहे,” अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
वंजारी सेवा संघाच्या वतीने आयोजक व सर्व स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. दिपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते.
डॉ. दीपक टिळक यांचा परिचय
डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. दीपक टिळक यांना अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai: विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय, राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानर्थी प्रा. डॉ. मिलिंद भोई, शंतनू जगदाळे, तपस्वी गोंधळी, मनीष गवई, विशेष निमंत्रित सदस्य अश्विनी एकबोटे, आमदार संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, सुहास कांदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, युवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उपस्थित होते. विधान भवन मुंबई येथे ही बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युवकांचे विचार, त्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण, सुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.
बैठकीत आमदार आणि निमंत्रित सदस्यांनीही सूचना मांडत समृद्ध धोरणासाठी योगदान दिले.या समितीतील तज्ञ सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, श्री प्रवीण निकम यांनी युवा धोरणामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींचा कच्चा मसुदा यावेळी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केला.
शारीरिक मानसिक व भावनिक दृष्ट्या सक्षम असणारा युवक हा या युवा धोरणाचा पाया आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी यावेळी केले.
शिक्षण, रोजगार, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांच्या गरजा ओळखून, देश-विदेशातील युवकांबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून, प्रत्यक्ष संवादातून उपाययोजना आखल्या जातील.
नवे सुधारित युवा धोरण यामध्ये शिक्षण, रोजगार, उद्योजकता, बौद्धिक व सामाजिक विकास, स्टार्टअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याबरोबरच जबाबदारीची जाणीव, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण रुजवणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील योजना, युवा प्रशिक्षण केंद्र, युवा पुरस्कार, वसतीगृहे, महोत्सव, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, युवा निधी आणि युवा प्रतिष्ठा निर्देशांक आदी बाबींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पुणेकरांसाठी मध्यवर्ती भागात खासदार जनसंपर्क कार्यालय राहणार २४ तास खुले
Newsworldmarathi pune: पुणेकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहोळ यांना राजधानी दिल्लीत पाठवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहिल्याचवेळी त्यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रायलाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. मंत्री म्हणून काम करतानाही खासदार मोहोळ यांनी विधानसभानिहाय जनता दरबाराव्दारे पुणेकरांशी संवाद ठेवला. पुणेकरांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्याशी कायम संवाद राखण्यासाठी आता शहराच्या मध्यवर्ती भागात २४ तास खुले असणारे खासदार जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे. जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या या कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज शनिवारी ( दि.१२) होणार आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन होणार आहे. जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण दुपारी ३ः३० वाजता तर अहवाल प्रकाशन कार्यक्रम दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. पुणेकरांच्या समस्या, अडी-अडचणी राज्यमंत्री मोहोळ यांच्यापर्यंत पोचाव्यात या हेतूने हे कार्यालय २४ तास खुले असणारे आहे. पुणेकरांच्या आणि नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या योजनांची महिती मिळेल आणि लाभ घेण्यासाठीचीही प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या विविध लागणारे विविध प्रकारचे दाखले आणि ओळखपत्र मिळवण्याची सुविधा, या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याचा महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुण्यासाठीच्या दीर्घकालीन हिताच्या योजनांची आखणी व पायाभरणी केली. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारने अभूतपूर्व मदत केली. आता मंत्रिपदामुळे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करण्यासाठी योगदान देता येत आहेत. या बरोबरच विकसित पुण्याच्या दिशेनेही ठोस पावले टाकायला सुरूवात केली आहे. या सर्व वाटचालीत पुणेकरांची भक्कम साथ आवश्यक आहे. त्यासाठीच जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे’.
कोंढवा-येवलेवाडीत रात्रपाळीत साफसफाई
Newsworldmarathi Pune: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून हद्दीत रात्रपाळीत साफसफाई, स्वच्छताविषयक कामकाज सुरू करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्या पुढाकाराने कोठीनिहाय सेवकांना स्वच्छतेबाबत आणि सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
या वेळी आरोग्यनिरीक्षक अभिजित सूर्यवंशी, प्रशांत कर्णे, साहिल धोत्रे आणि कोठीकडील मुकादम, रात्रपाळीतील सेवक उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सर्वच साफसफाई कर्मचाऱ्यांकडून हे काम हाती घेतले आहे.
पुण्यात नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू; अंधश्रद्धेचा संशय
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही दुर्दैवी घटना केडगाव गावात घडली असून, अवधूत मेंगवडे असं मृत बालकाचं नाव आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन मेंगवडे हे आपल्या कुटुंबासह केडगाव येथे वास्तव्यास आहेत. किरकोळ कारणावरून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे भांडण सुरू झाले. भांडणाचा राग आला असताना पत्नीने नवऱ्यावर हल्ला करण्यासाठी त्रिशूल उचलले. मात्र, तो त्रिशूल चुकून बाजूला असलेल्या भावजयेच्या कडेला लागला आणि तिथेच असलेल्या ११ महिन्यांच्या अवधूतच्या पोटात घुसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. निष्पाप पुतण्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ही घटना अंधश्रद्धेमुळे घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भांडणाच्या प्रसंगी त्रिशूलचा वापर आणि त्यामागील हेतू याची चौकशी सुरु असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार; खलिस्तानी हात असल्याचा संशय
Newsworldmarathi Team: प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने नुकतेच कॅनडामधील ब्रॅम्पटन शहरात ‘Kap’s Café’ सुरू केले होते. आपल्या पत्नी गिन्नी चतरथ हिच्यासह मोठ्या थाटात या कॅफेचे उद्घाटनही करण्यात आले होते. उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडीओ कपिलने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.
मात्र, या नव्या उपक्रमाला काही काळानंतर मोठा धक्का बसला आहे. ‘Kap’s Café’वर अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी कॅफेवर तब्बल १० ते १२ गोळ्या झाडल्या असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कॅफेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून या घटनेनंतर काही स्टोरीज शेअर करण्यात आल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर जे लोक मेसेज किंवा डायरेक्ट मेसेज (DM)द्वारे पाठिंबा देत आहेत, अशा सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच, वेळीच हस्तक्षेप करणाऱ्या कॅनडा पोलिसांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
या हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, कॅनडातील सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास करत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कपिल शर्माच्या कॅफेवर हल्ला झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.
त्यांच्यासह सचिव गणेश पाटील, मृदुला देशपांडे (उपसचिव, मृद व जलसंधारण विभाग), रणदिवे (मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास, पुणे) प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला अपर्णा पाठक, कोमल धस, शिरीष कुलकर्णी, रमेश भिसे, संतोष राऊत, लतिका राजपूत, अरुण शिवकर, मंगल कुलकर्णी, कल्पेश कुलकर्णी, अश्लेषा खंडागळे, तसेच सुनिता मोरे यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीस राज्यातील दुष्काळी भागांमध्ये अद्यापही मूलभूत पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित करताना मंत्री संजय राठोड म्हणाले, “दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे. जलसंधारणात लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.”
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जलसंधारणाच्या योजनांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले. “काम करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी आपण छोटे-छोटे युनिट तयार करू. उपसभापती कार्यालयाकडून अशा १५ विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांची यादी दिली जाईल. त्या संस्थांना पुढील कामात सहभागी करून घेतले जाईल,” असे त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर, जल व मृदसंधारण क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या गावांची सादरीकरणे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. राज्यभरातील कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी एक राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रस्तावही डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.
विशेष म्हणजे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. “सामाजिक संस्थासाठी नियमावली बनवून सर्वसमावेशक धोरण ठेवावे. त्यामध्ये लाडक्या बहिणी, एकल महिला यांना जल व मृदसंधारणाच्या कामात सहभागी करून घेता येईल. यामुळे त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त होईल,” असे त्या म्हणाल्या.
तसेच भटक्या व विमुक्त समाजासाठी विशेष उपक्रम तयार करून त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय, “चौथ्या महिला धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करताना, त्यानुसार विभागाच्या योजना व धोरणे तयार करावीत,” असेही त्या स्पष्टपणे नमूद केले.
या बैठकीत पुढील काळात केवळ योजना सादरीकरणापुरते मर्यादित न राहता “क्रियान्वयन, मूल्यांकन आणि लोकसहभाग” या तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक बैठका घेण्यावर एकमत झाले. भविष्यात पावसाचे प्रमाण, भूजल पातळी, शाश्वत सिंचन योजना आणि गावस्तरावर महिला पाणी समित्यांचा सहभाग यावरील सादरीकरणांची मालिका घेण्याची कल्पनाही बैठकीत मांडण्यात आली.
कात्रज – हडपसर मेट्रो त्वरित सुरू करा; आमदार योगेश टिळेकर यांची मागणी
Newsworldmarathi Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. हडपसर-सासवड रोड, हडपसर-लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या
आहेत. या मार्गामुळे हडपसरमधून शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात कात्रज ते हडपसर ही मेट्रो मार्गिका प्राधान्याने सुरू करावी, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.
सावता महाराज समाधी सोहळा…
संत सावता महाराज यांचा समाधी सोहळा २० जुलैला अरणमध्ये होत आहे. काशी कापडी समाजाला पालखीचा मान असतो. पालखीचे नियोजन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाने करावे, अशी मागणी पंढरपूर येथे हरताळे दिंडी मठात संत सावता महाराज धर्मदाय न्यास व भाविकांनी केली आहे. याचा खर्च मंदिर व्यवस्थापनाने करावा, असा आदेश सभापतींनी द्यावा, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.
विधान परिषदेत केलेल्या मागण्या…
अहिल्या-सावित्री सृष्टी उभारावी
पुण्यात महाज्योतीचे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाला निधी द्यावा
हडपसर ते यवत या उन्नत मार्गाची व्याप्ती वाढवावी
उड्डाण पूल भैरोबानालापासून यवतपर्यंत न्यावा
मुख्य रस्त्यांची दुरूस्ती तातडीने व्हावी
पुण्यातील ढोल-ताशा पथकांना दिलासा; पारंपरिक वाद्यांवर खटले नाहीत; सहआयुक्त रंजनकुमार शर्मा
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्रातील सण-उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांची मिरवणुकीत महत्वाची भूमिका असते. अशा पारंपरिक वाद्यांबाबत पुण्यातील पथकांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. पुणे शहराचे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ढोल-ताशा वाजवण्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. भूतकाळात जर अशा प्रकारचे खटले दाखल झाले असतील, तर ते थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ढोल-ताशा महासंघाच्या बैठकीत शर्मा यांनी पथकांच्या सरावाच्या वेळेबाबतही मार्गदर्शन केले. रात्री १० नंतर ढोल-ताशांच्या सरावामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस नियंत्रण कक्षात येतात. त्यामुळे, सर्व पथकांनी सराव वेळेआधी सुरू करून तो रात्री १० पूर्वीच संपवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पारंपरिक वाद्यांचा सन्मान राखत, सार्वजनिक शांततेचेही भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. या निर्णयामुळे पारंपरिक वाद्यप्रेमी आणि ढोल-ताशा पथकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

