Pooja Khedkar : नावं बदलून १२ वेळा UPSC दिली? पूजा खेडकरचा खुलासा, म्हणाली, आईचं नाव कायदेशीररित्या जोडलं”

0
Newsworldmarathi Pune: वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर तब्बल १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचा, नाव व जातीच्या गैरवापराचा आरोप होत असताना तिने अखेर यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. खास मुलाखतीत बोलताना पूजा खेडकर म्हणाली, “मी लहानपणापासून ‘पूजा खेडकर’ हेच नाव वापरलं आहे. २०१४ मध्ये मी कायदेशीररित्या गॅझेट नोटिफिकेशनद्वारे माझ्या नावात माझ्या आईचं नाव समाविष्ट केलं – ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’. हे नाव मी अधिकृतपणे वापरलं असून, UPSCकडून त्यासाठी २०१७ मध्ये परवानगी देखील मिळाली होती.” खेडकर पुढे म्हणाली, “शालेय कागदपत्रांमध्ये चुकीने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ असं नाव नोंदवण्यात आलं होतं, त्यामुळे सुरुवातीच्या अर्जांमध्ये तेच नाव वापरावं लागलं. मात्र, नंतर मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाव बदललं आणि सर्व अर्जात प्रतिज्ञापत्रासह ते वापरलं.” यूपीएससीचे नियम पाळून मीच प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा पुनरुच्चार करत खेडकर म्हणाली की, “नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी केवळ माझ्या आईचं नाव जोडल्याचं सत्य स्पष्ट केलं आहे.” या प्रकरणावरून चर्चेत आलेल्या खेडकर यांनी आपली बाजू प्रथमच स्पष्ट करत, झालेल्या आरोपांना कायदेशीर उत्तर दिलं आहे.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबाबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
Newsworldmarathi Pune: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शिंदे म्हणाले, खगोलशास्त्रज्ञ, लेखक असलेले डॉ. नारळीकर हे खऱ्याअर्थाने देशाचा गौरव, भुषण होते, ते देशाची संपत्ती होते. त्यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यासारखी माणसे दुर्मिळ असतात, त्यांच्या कार्यातून नवीन पिढीला निरंतर ऊर्जा, प्रेरणा मिळाली पाहिजे, याकरिता त्यांच्या नावाला साजेचे कार्य राज्यशासनाच्यावतीने करण्यात येईल, डॉ. जयंत नारळीकर यांना पद्मभूषण, पद्मविभुषण, महाराष्ट्र भुषण अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. खगोलशास्त्राचे ज्ञान अतिशय सोप्या भाषेत पोहचविण्याचे काम त्यांनी केले, हिमालयाऐवढे कर्तृत्व असलेले व्यक्तिमत्व, उच्च विचारसरणी असतानादेखील साधा स्वभाव होता, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, डॉ. नारळीकर यांच्या मुली गीता नारळीकर आणि लिलावती नारळीकर, जावई अलोक श्रीवास्तव, हरी चक्रवर्ती उपस्थित होते.

संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना

0
Newsworldmarathi Pune: संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या गायनाच्या छंदाला गेली 23 वर्ष सोमेश्वर फाऊंडेशन मार्फत सनी निम्हण प्रेरणा देत आहेत. याबद्दल समाधान आहे, अशी भावना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेची महाअंतिम फेरी आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाली.यावेळी कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे, संयोजक सनी विनायक निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुढे बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, पुणे आयडॉलच्या माध्यमातून पुणे शहरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची इच्छा दिवंगत नेते विनायकराव निम्हण यांची होती. त्यानुसार गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते. मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण आहे. परंतु स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी पुणे आयडॉल ही स्पर्धा सुरू केली अन् गेल्या 23 वर्षांपासून ही अशीच सुरू आहे. सनी निम्हण यांनी त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा दोन्ही घेतला आहे. या स्पर्धेत पुणे शहरात व्यतिरिक्त इतर शहर आणि राज्यातून देखील स्पर्धक आलेले आहेत. यातच या स्पर्धेचे यश आहे. धीरज घाटे म्हणाले, सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. येथे गेली 23 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. प्रास्ताविक पर भाषणात सनी निम्हण म्हणाले, पुणे आयडॉल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 725 स्पर्धकांमधून 18 स्पर्धक निवडण्यात आले. त्यांची निवड करताना परीक्षकांचाच कस लागला आहे. पुणे आयडॉल ही केवळ स्पर्धा नसून आपले गायन कौशल्य सादर करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ बनले आहे. पुणे आयडॉल स्पर्धेतील चारही गटाच्या प्रथम विजेत्यास 15 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ गायक राजेश दातार, गायक जितेंद्र भुरुक आणि मंजुश्री ओक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि महेश गायकवाड यांनी तर उमेश वाघ यांनी आभार मानले. पुणे आयडॉलचे विजेते लिटिल चॅम्प 1. भार्गव जाधव 2. परी तेलंग युवा आयडॉल 1 अभितांश श्रीवास्तव 2 नीव कनानी जनरल आयडॉल 1 पियुष भोंडे 2 निखिल गर्गे ओल्ड इज गोल्ड 1 सुनील यादव 2 मनोज मोरे

भारत माता की जय च्या जयघोषात रिपाइंची ‘भारत जिंदाबाद रॅली’

0
Newsworldmarathi Pune : पाहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी ‘भारत जिंदाबाद रॅली’  चे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  ‘भारत जिंदाबाद रॅली’ ला सुरुवात झाली. भारत माता की जय..,   पाकिस्तान मुर्दाबाद..,  भारतीय सैन्याचा विजय असो.., अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.   रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी फक्त तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते.  रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा  गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, संदीप धाडोरे, महादेव दंदी, लियाकत शेख, विनोद टोपे, शामशुद्दीन शेख, अविनाश कदम, कपिल जगताप, फिरोज खान, हबीब सैय्यद, भारत भोसले, चांदणी गायकवाड, सविता शेलार, शाम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश बहुले, के. जी. पवळे,  हनुमंत गायकवाड, उद्धव चिलवंत, दादा वारभुवन, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, राजेश गाढे, वैभव पवार,  स्वप्नील जाधव,  रोहित कांबळे, अप्पा वाडेकर, रामभाऊ कर्वे,  दीपक इसावे,  गोविंद साठे, शशांक माने, सुशील मंडल, तानाजी तापकीरे,  विशाल ओव्हाल, अरविंद शिंदे, आनंद लवटे, आनंद कांबळे, विशाल ओव्हाल, गौतम कदम, संजय बनसोडे, विक्की वालके, फक्कडराव शेळके, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, निर्मला कांबळे, शोभा गायकवाड, आरती देटे, नंदा गायकवाड, अनिता कांबळे, सुनिता गायकवाड, शांता कांबळे, भारताबाई कराळे, सूरज जाधव, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, बाळासाहेब शेलार, रावसाहेब झेंडे, अंकिता भालेराव, शिवाजी गायकवाड, निलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, बाळासाहेब खंकाल यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.  भर पावसात निघालेल्या या ‘भारत जिंदाबाद रॅली’ मध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बंड गार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर व रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने ‘भारत जिंदाबाद रॅली’ चा समारोप झाला.

कोथरूडसह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या; आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
Newsworldmarathi Pune: हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, पावसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना ना. पाटील यांनी यावेळी दिली. कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती ना. पाटील यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून; त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच,मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावी. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या. यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर नामदार पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना ना. पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

Solapur Crime : मायेनं जवळ गेलेल्या चिमुकलीची बापाकडून हत्या; दफन केलेला मृतदेह बाहेर काढला, असं काय घडलं?

Newsworldmarathi solapur: बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अटक करण्यात आली आहे. ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे असे नराधम बापाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रावणी ही आपल्या वडिलांसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात राहत होती. आरोपी ओगसिद्धला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. पत्नी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत होती. तर दोन मुली आणि मुलगा गावातील आजोळी राहण्यास गेले होते. घटनेच्या दिवशी मयत श्रावणी वडिलांजवळ मायेने झोपण्यासाठी गेली होती. दरम्यान, नराधम बापाने आधी चिमुकलीचा गळा आवळून हत्या केली, नंतर घराशेजारी खड्डा खोदून तिचं प्रेत पुरलं. शुक्रवारी सकाळी आजोबा रेवणसिद्ध यांनी नात श्रावणी कुठंय. अशी चौकशी केली. तसेच गावात आणि आजोळी शोध घेतला, पण काही श्रावणी मिळाली नाही. त्यावेळी वस्तीवर जमलेल्या नातलगांच्या लक्षात आलं की, घराशेजारील खड्ड्यात नव्याने माती टाकलेली आहे आणि चिखलात पावलांचे ठसे उमटलेले दिसतात. मात्र, नातलगांचा संशय वाढल्याने ओगसिद्ध याच्यावर दबाव टाकला. त्यावेळी त्याने “मीच गळा दाबून खून केला आणि तिला पुरलं” अशी थेट कबुली दिली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या निर्घृण हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

भीमनगर वासियांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

0
Newsworldmarathi Pune: एरंडवना येथील शिला विहार कॉलनी मधील भीम नगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डर कडून फसवणूक झाली आहे. या संदर्भयकडे लक्ष वेधून  घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीम नगर वासियांचा बिऱ्हाड मोर्चा धडकला.  रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बिऱ्हाड मोर्चात देविदास ओव्हाळ, जावेद शेख, हरी बागडे,  सुनिल डमरे,  दादू गायकवाड,  सुदाम शिंदे, उमा साठे, स्नेहल गायकवाड,  रेश्मा पल्ला,  रईसा शेख,  निशिकांत पोळ,  प्रतीक डंबाळे,  प्रभू सुनगर,  सिकंदर मुलाणी यांच्यासह स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.  भीम नगर येथील 216 कुटुंबीयांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत करण्याचा बोगस प्रस्ताव भक्ती एंटरप्राइजेस मार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये यापूर्वीच बिल्डरसह 20  जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे येथे फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच योजनेच्या मंजुरीसाठी स्थानिक मूळ रहिवाशां ऐवजी बाहेरची बोगस लाभार्थी तयार करण्याचा गंभीर प्रकार बिल्डर कडून करण्यात आलेला आहे व त्याद्वारे स्थानिक नागरिकांना भीम नगर पासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर सक्तीने पुनर्वसन करण्याचा घाट सध्या बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणामार्फत घातलेला आहे.  हा अन्याय असल्याने याविरुद्ध भीम नगर झोपडपट्टी धारक मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत.  यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, झोपडपट्टी धारकांची एसआरए च्या नावाखाली होत असलेली लुगडणूक व फसवणूक याचे उत्तम उदाहरण म्हणून भीम नगर कडे पाहता येईल, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांनी व त्यांच्या संस्था संघटनांनी एकत्रित लढा उभारावा. सक्तीचे पुनर्वसन रद्द करून आम्हाला आहे त्या ठिकाणी राहून द्यावे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनवणी पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील नियोजित कार्यक्रमामुळे सांगली येथे असल्याने त्यांचे निवेदन पाटील यांचे स्वीय सहाय्यक राहुल देशपांडे यांना देण्यात आले.

महाराष्ट्रात चाललंय काय? पुण्यानंतर नाशिकमध्ये विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांची मारहाण अन पैशांचा तगदा….

Newsworldmarathi Nashik : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भक्ती अथर्व गुजराती (वय-३७) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील अथर्व गुजराती यांची पत्नी भक्ती यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. भक्तीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे सराफी व्यवसाय करतात. आपल्या मुलीने आत्महत्या केली, असे समजताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना ५ वर्षाचा मुलगा आहे. भक्ती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या फरार पतीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण सध्या ताजे असतानाच नाशिकमध्ये एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत भक्ती यांना सासरच्यांनी मारहाण केली, का पैशांचा तगदा लावला. भक्तीने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिस करीत आहेत.

निलेश चव्हाण अजून फरार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात मोठा तपास उलगडत आहे. तिच्या आत्महत्येनंतर झालेल्या पोलिस तपासात सासू-सासरा, पती, नणंद आणि मोठा दीर यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, हगवणे कुटुंबीयांकडून सतत छळ होत होता. विशेषतः जमीन खरेदीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी करत तिला मानसिक त्रास दिला जात होता. वैष्णवीने या छळाला कंटाळून आत्महत्या केली, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी एकूण 12 साक्षीदारांची चौकशी केली असून, काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ कस्पटे कुटुंबाला मिळू नये, यासाठी हगवणे कुटुंबीयांनी बाळ लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या प्रकरणात भावनिक गुंतागुंत वाढली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी नीलेश चव्हाण अद्याप फरार असून, तो नेमका कुठे आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. पोलिसांचे तपास पथक त्याचा शोध घेत आहे, मात्र अद्याप तो सापडलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अधिक कठोर तपासाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

राज्यात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण व्हावे : मंत्री उदय सामंत

0
Newsworldmarathi Pune: समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास केंद्र हे एक मुख्य साधन असून कौशल्यावर आधारित पिढी तयार होण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण झाले पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जनसेवा फाउंडेशन, पुणे संचलित “हीरा-कांचन” निराधार पुनर्वसन केंद्र येथे “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्र”चे उद्घाटन आज उदय सामंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.  जनसेवा फौंडेशनच्या कात्रज येथील भिलारेवाडी येथील निराधार केंद्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना शहा, खजिनदार राजेश शहा, विकफिल्ड उद्योग समुहाचे अश्विनी मल्होत्रा, पुरूषोत्तम लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते आणि समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी जनसेवा फौंडेशनच्या “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्रा”ची पाहणी करून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीतूनही मुबलक उत्पादन घेऊन शेतकरी आपला विकास साधू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे वडिल आहेत. शेती पूरक उद्योगांना कौशल्य विकासाच्या कक्षेत आणल्यास शेतकऱ्यांच्या मुलांना मुबलक संधी उपलब्ध होतील. शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा कशी करता येते, याच्या मूर्तीमंत उदाहरणाची प्रचिती आज जनसेवा फौंडेशनच्या “एस. पी. मल्होत्रा कौशल्य विकास केंद्रा”ला भेट दिल्यावर आली, असे गौरवोद्गार सामंत यांनी यावळी काढले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा फौंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले. प्रा. जे.पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. जनसेवा फौंडेशनचे खजिनदार राजेश शहा यांनी आभार मानले.