पीएमपी भाडेवाढ कमी करून महिलांना सवलत द्यावी; माजी नगरसेविका राणी भोसले यांची मागणी
Newsworldmarathi Pune: पीएमपी प्रशासनाने अलीकडेच प्रवास भाडेवाढ केल्यामुळे महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला आहे. यामुळे ही भाडेवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी माजी नगरसेविका राणी भोसले यांनी पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे निवेदानाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने एसटी प्रवासात महिलांना सवलत देऊन स्तुत्य पाऊल उचलले आहे. तशीच सवलत पीएमपी प्रवासातही महिलांना मिळावी, जेणेकरून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील, असे भोसले यांनी नमूद केले.
कात्रज लेक टाऊन सोसायटी ते पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर या मार्गावर सुरू असलेल्या बससेवेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, लक्ष्मीनगर सोसायटी परिसरातील रस्त्याच्या कामामुळे सद्यःस्थितीत ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. परिणामी, परिसरातील महिला व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही भोसले यांनी निवेदनात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दीपा मुधोळ-मुंडे यांनी संबंधित मागण्यांवर वरिष्ठस्तरावर लवकरच चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
या मागण्यांमुळे सामान्य प्रवाशांच्या अडचणी दूर होतील व महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात उद्या रेड अलर्ट; मंगळवार पर्यंत मुसळधार…
Newsworldmarathi Pune : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हवामानविषयक माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो शुक्रवारी (२३ मे) तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतरित झाला आहे. अद्याप या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झालेले नसले, तरी या हवामानातील बदलामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे, २४ ते २८ मे या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः रविवार (२५ मे) रोजी संपूर्ण राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून, ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी ठेवावी, तसेच निचऱ्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Election Commission : आता मतदान केंद्राच्या बाहेर ठेवता येणार मोबाईल; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Newsworldmarathi Mumbai: Election Commission : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच यापुढे उमेदवारांचे मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे, असंही या निर्णयात नमूद केले आहे.
मोबाईल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वाढता वापर लक्षात घेता तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील. प्रचाराच्या संदर्भातही बदल करत मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत मनाई करण्यात आली आहे. मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली, भारत निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची सौम्य वाढ; पुण्यात ४ तर मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण
Newsworldmarathi Mumbai: राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून, २३ मे रोजी एकूण ४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण, पुण्यात ४, कोल्हापूर व रायगड येथे दोन, तर ठाणे व लातूर येथे एक असे रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे २२ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १८३ वर पोहोचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,८१९ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यांपैकी २१० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत १८३ रुग्ण सापडले आहेत.
त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
सर्दी, खोकला आणि तापसदृश लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडबाधित रुग्ण आढळल्यास त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच काही उपनगरातील रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी
Newsworldmarathi Mumbai : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागली. त्यानंतर छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते दिले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. अखेर याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळांकडील हे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवले होते. आता पुन्हा एकदा भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंडे यांच्याकडे असलेले मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयही भुजबळ यांना देण्यात आले आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यांनी शुक्रवारी आपल्या दालनात येऊन विभागाचा आढावाही घेतला. दरम्यान, छगन भुजबळ यांना शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील सातपुडा बंगला देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचे खाते मिळणार असल्याची राजकीय चर्चा सुरु होती. आता त्यांना धनंजय मुंडेंचेच खाते मिळाले आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांचा रविवारी कसब्यात जनता दरबार…
Newsworldmarathi Pune : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून या दुसऱ्या टप्प्यात दुसरे अभियान कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी, दि. २५ मे, २०२५ रोजी सकाळी १० वाजता राबविण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील साठे कॉलनीमधील श्री शिवाजी मराठा सोसायटी या ठिकाणी हे अभियान होणार असून यात नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ केले आहे.
खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर मोहोळ यांनी विधानसभा निहाय खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार सुरू केले असून या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू झाला असून कोथरूडनंतर आता कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. मोहोळ यांना भेटण्यासाठी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नोंदणी सुरु होणार आहे. तर त्यानंतर टोकन नंबरद्वारे मोहोळ हे थेट नागरिकांना भेटतील. समस्या मांडण्यासोबतच नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध होणार आहे. शिवाय महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी खासदार या नात्याने पुणेकरांचे प्रश्न समजून घेणे आणि ते सोडविणे हे माझे कर्तव्यच आहे. आजवर झालेल्या ७ अभियानांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून कसबा विधानसभा नागरिकांनीही आपले प्रश्न आणि समस्या घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. आजवर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात चांगले यश मिळाले आहे. शिवाय या अभियानावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही समाधानकारक आहेत.’
बीडमध्ये पवनचक्की वादातून पुन्हा गोळीबार; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…
Newsworldmarathi Beed: बीडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बीडमध्ये गुंडाराज सुरूच आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीच्या वादावरून झाली होती, त्यावरूनच पुन्हा एकदा राडा झाला आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडूनच गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्लँटच्या परिसरात हा गोळीबार करण्यात आला आहे. पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोरटे त्याठिकाणी आले होते. यातील एका चोरट्यावर पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाआहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली गुन्ह्याची ही आणखी एक घटना आहे. लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. तर याच ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य ठेवण्याचा यार्ड आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पवनचक्कीच्या यार्डमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून सुरू आहे. या अगोदर देखील चोरीच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. चोरीच्या घटनांमुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्यात आले होते.
मात्र, गुरूवारी मध्यरात्री लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याच्या यार्डमध्ये काही चोरटयांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात चोरट्याला गोळी लागली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास नेकनूर पोलीस करीत आहेत.
हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे किळसवाणे कारनामे उघड, बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढायचा अन्…
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या सासरकडील मंडळीसोबत दोषी असणाऱ्या निलेश चव्हाणचे पितळ आता उघडं पडलं आहे. हगवणे कुटुंबाप्रमाणे चव्हाण याने देखील आपल्या पत्निचा अमानुष छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर त्याने स्पाय कॅमेराच्या साहय्याने स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात २०१९ मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल करण्यात आला आहे.
स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे स्पाय कॅमेराच्या साहय्याने व्हिडीओ
निलेश चव्हाणचे ३ जून २०१८ मध्ये लग्न झालं. जानेवारी २०१९ मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काही तरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं. त्यावेळी त्याने तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळी ही निलेशने तिला उडवाउडवीची उत्तर दिली.
दरम्यान, त्यानंतर तिच्या मनात असलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी तिने त्याचा लॅपटॉप उघडला. त्यामध्ये तिला त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिच्या निदर्शनास आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास नेहमी भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेत तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी २०१९ मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
निलेश चव्हाणवर पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा दाखल
वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल झाला आहे. वैष्णवी यांचा मुलगा हगवणे याने निलेश याच्याकडे दिला होता. त्यावेळी निलेश ने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती. त्यामुळे वारजे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे.
तसेच, चव्हाणवर हिंजवडी मध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हची केस आहे. २००९ मध्ये याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात अदखल पत्र गुन्हा दाखल आहे. निलेश याचा हगवणे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होता. आपल्याकडे जी तक्रार दिली आहे. त्यावरून कलम लावले आहेत. असही पोलिस उपआयुक्त कदम यांनी यावेळी सांगितलं आहे.
इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गरजूंसाठी कपडे
Newsworldmarathi Pune : समजाप्रती आपली बांधिलकी जपत इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाने गरजूंसाठी जुने पण वापरण्यायोग्य कपडे संकलन उपक्रम राबवला. गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे वर्षातून दोन वेळा राबवला जातो. यंदाही संघाने कपड्यांचे संकलन करून ते गुड विल इंडिया या सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केले. ही संस्था हे कपडे आदिवासी, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवते.
संघटनेचे संचालक अनिल रेळेकर यांनी सांगितले की, “या उपक्रमातून केवळ गरजूंची गरज भागते असे नाही, तर सामाजिक संवेदनशीलतेचा सकारात्मक संदेशही समाजात जातो.” समाजसेवेची जाणीव ठेवत संघाचे सदस्य सातत्याने या उपक्रमात सहभागी होत असतात.
या उपक्रमात जयंत पाटणकर, देवदास गरूड, मारुती पाटील, अनिल रेळेकर, बाबूराव कोले, प्रदीप मलशेट्टे, दत्तात्रय साळेकर, हरीश देशमाने, संजय भोसले, किशोर पवार, मोहन कातुलवार, प्रतिमा पिंगळे, प्रफुलता वडके, संजय गोडबोले, शंकर सूर्या, प्रदीप भालेराव, अरुण थोरात, संजीवनी भावसार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संघटनेचा हा उपक्रम इतरांनीही आत्मसात करावा, अशी भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली आहे. इच्छापूर्ती संघाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
Monsoon Update : पुण्यात पावसाने १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; ‘या’ महिन्यात सर्वाधिक नोंद, जाणून घ्या….
Newsworldmarathi Pune: Monsoon Update : पुण्यात यंदाच्या मे महिन्यातील गत १२ वर्षाच्या पावसाचे विक्रम मोडीत काढले आहेत. १ ते २२ मे दरम्यान ११८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. २०१५ मध्ये १०६ मिमी पाऊसाची नोंद झाली होती. याचा विक्रम आता मोडीत काढला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात मार्च ते मे या उन्हाळी हंगामात सरासरीपेक्षा ५७४ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
दरम्यान, आगामी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याने आणखी उच्चांक होण्याची शक्यता आहे. गुरुवारीही (दि. २२) पाऊस शहर वे परिसर व जिल्हयात पाऊस पडला. पुढील या सहा दिवस ऑरेंज, यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
साधारणतः पुण्यात मे महिन्यात सरासरी ३१.४ मिमी पाऊस पडतो.पावसाला अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे १०० मि.मीहून अधिक पाऊस पडला आहे. शिवाजीनगरमध्ये मे महिन्यात एका दिवसात ४०.५ मिमी, चिंचवडमध्ये १०१ मिमी आणि एनडीए परिसरात १०३ मि.मी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.
तसेच गिरीवन येथे २२ मि.मी, भोर ९.५, तळेगाव ढमढेरे ७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोरेगाव पार्क, मगरपट्टा, तळेगाव, हवेली, एनडीए, पुरंदर, हडपसर, वडगावशेरी, कुरवंडे, नारायणगाव, बल्लाळवाडी, शिवाजीनगर येथेही हलक्या, मध्यम पावसाची नोंद झाली आहे.
येत्या २३ ते २४ मे ऑरेंज अलर्ट असून विजेच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार आहे. तसेच २५ ते २८ मे दरम्यान, पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळयात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.

